सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने ‘Neighbourhood first Policy’ नुसार नेहमीच पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांतील समस्यांवर द्विपक्षीय चर्चा करण्याची, तसेच या समस्या दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणात सोडवल्या जाव्यात, अशी भारताची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित मुद्द्यांवर भारत कोणतीही तडजोड करणार नाही आणि भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात आणण्याच्या सर्व प्रयत्नांना तोंड देण्यासाठी ठोस आणि निर्णायक पावले उचलली जातील, अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडली आहे. जोपर्यंत ‘Cross Border Terrorism’ (सीमापार दहशतवाद) पाकिस्तानकडून संपवला जात नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंध सामान्य स्थितीत येण्याची शक्यता शून्य राहील.

भारताच्या वायव्य सरहद्द सीमेस एकूण ३३२४ किमीची भू-सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यात गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर अशी भारताची चार राज्ये पाकिस्तानला लागून आहेत. पाकिस्तान हा पूर्वीचा भारताचाच भाग असल्याने दोन्ही देशांदरम्यान भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा सारखाच आहे. भारताचे सद्यस्थितीत पाकिस्तान सोबतचे संबंध जाणून घेण्यापूर्वी पाकिस्तान निर्मितीचा इतिहास बघूया.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-नेपाळ संबंध; सहकार्याची क्षेत्रे

पाकिस्तानची निर्मिती :

पाकिस्तान निर्मितीचे खरे मूळ हे मुस्लिम लीगच्या राजकारणात दिसून येते. डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात ‘मुहम्मद इकबाल’ यांच्या अध्यक्षीय भाषणात पाकिस्तानचा पाया घातला गेला. त्यांनी याच अधिवेशनात सर्वप्रथम पाकिस्तानचा उल्लेख न करता भारतीय मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावे, हा विचार मांडला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे मुहम्मद इकबाल यांना ‘पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर १९३१ साली मुस्लिम लीगने दुसऱ्या गोलमेज परिषदेत मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली. पाकिस्तानच्या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले ते केंब्रिज विद्यापीठात शिकणाऱ्या ‘रहमत अली चौधरी’ या तरुण विद्यार्थ्याने. रहमत अली यांचा मूळ सिद्धांत असा होता की, “हिंदू व मुस्लिम लोक या केवळ दोन जमाती नसून स्वतंत्र वंश, धर्म, संस्कृती व परंपरा असणारी दोन राष्ट्र आहे.” रहमत अली चौधरींच्या दृष्टिकोनामुळे पाकिस्तानचा पाया बळकट होण्यास मदत झाली. दरम्यानच्या काळात मोहम्मद अली जिना मुस्लिमांचे प्रतिनिधी म्हणून उदयास आले होते. त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. याचा काहीसा अंश हा त्यांच्या १४ मागण्यांमध्ये दिसून येतो, जो त्यांनी नेहरू अहवालाला डावलून मांंडल्या होत्या.

भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार जेव्हा १९३७ मध्ये निवडणुका झाल्या, त्यात मुस्लिम लीगचा दारुण पराभव झाला. त्यामुळे लीगचा देशात प्रभाव नसल्याचे सिद्ध झाले. त्यातून मुस्लिम लीगने देशात अशी भावना निर्माण केली की, स्वतंत्र जमात म्हणून भारतात मुस्लिम लोकांचे राजकीय भवितव्य नाही, आपल्याला बहुमतवाल्या हिंदूंच्या गुलामगिरीतच खितपत पडावे लागणार. या वैफल्यातूनच मुस्लिम लीगची द्विराष्ट्राची सुप्त मागणी उफाळून आली.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-म्यानमार संबंध; इतिहास आणि पार्श्वभूमी

लाहोर अधिवेशन (पाकिस्तान निर्मितीचा ठराव) :

मोहम्मद अली जिना यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम लीगचे २७ वे अधिवेशन ‘लाहोर येथे २२ ते २४ मार्च १९४० दरम्यान झाले. या अधिवेशनात ‘पाकिस्तान ठराव’ पारित करण्यात आला. खालिक उझमान, फजल-उल-हक आणि सिकंदर हयात खान यांनी या प्रस्तावाची रूपरेषा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा प्रस्ताव फजल-उल-हक यांनी मांडला आणि खालिक उझमान यांनी त्याला मान्यता दिली. २३ मार्च रोजी ए. के. फज्ल-उल-हक यांनी प्रसिद्ध ‘लाहोर ठराव’ मांडला, जो २४ मार्च १९४० रोजी संमत करण्यात आला.

लाहोर ठरावात पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. ठरावात म्हटले आहे की, ‘भौगोलिक स्थितीवरून एकमेकांना लागून असलेली राज्ये आवश्यक बदलांसह अशा प्रकारे स्थापन करावीत की तेथे मुस्लिम समाज बहुसंख्य होईल. जणू काही भारतातील उत्तर पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेश स्वतंत्र राज्यामध्ये विलीन करून त्यात समाविष्ट केलेले प्रदेश सार्वभौम आणि स्वशासित असावेत आणि त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी ज्या राज्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या पाहिजेत. लाहोर ठरावाद्वारे मुस्लिम लीगची मागणी स्वतंत्र मतदारसंघांच्याऐवजी आता ‘स्वतंत्र राज्य’ अशी बनली. अध्यक्षीय भाषणात जिनांनी आपला ‘द्विराष्ट्र सिद्धांत’ मांडला, ज्याद्वारे हिंदू व मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१९४२ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू झाले. बॅरिस्टर जिनांनी मुस्लिमांना ‘भारत छोडो’ आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे मुस्लिम समाज या आंदोलनापासून संपूर्णपणे अलिप्त राहिला. या काळात भारताला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यादरम्यान राजाजी योजना, लियाकत-देसाई करार, वेव्हेल योजना व कॅबिनेट मिशन प्लॅन यात पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र तयार व्हावे अशी मागणी सफल ठरली नाही. त्याची परिणीती म्हणजे १६ ऑगस्ट १९४६ रोजी जिनांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ‘प्रत्यक्ष कृतीस’ सुरुवात केली. ठिकठिकाणी जातीय दंगली झाल्या.

या दंगली शांत करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी २० फेब्रुवारी १९४७ रोजी भारत स्वातंत्र्यासाठी घोषणा केली. ॲटली यांची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी ३ जून १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ‘माउंटबॅटन योजना’ मांडली. त्यात भारत व पाकिस्तान असे दोन राष्ट्र निर्माण होतील, अशी तरतूद होती. राष्ट्रीय काँग्रेसला असे वाटले की, जर आता ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले नाही तर वेळ निघून जाईल. म्हणून शेवटी राष्ट्रीय काँग्रेसने माउंटबॅटन योजना स्वीकारली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी ‘भारत’ व ‘पाकिस्तान’ असे स्वतंत्र दोन देश निर्माण झाले.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-म्यानमार संबंध; सहकार्याची क्षेत्रे

पाकिस्तान शब्दाची निर्मिती : पाकिस्तान हे नाव पहिल्या चार प्रांतांच्या नावाची इंग्रजी अद्याक्षरे आणि पाचव्या प्रांताच्या नावातील ‘स्तान’ ही शेवटची चार इंग्रजी अक्षरे (P- Punjab, A- Afghanistan K – Kashmir, S Sindh आणि Baluchistan मधील Stan) यांचे मिळून बनते. मुस्लिम समजुतीप्रमाणे पाकिस्तान म्हणजे पवित्र भूमी (land of the pure) असे मानले जाते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc international relation india pakistan relationship history and background part 1 mpup spb