Neighbourhood First Policy of India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) इजिप्शियन स्मशानभूमीतील भारतीय माकडे

पोलिश संशोधकांनी अलीकडेच प्राचीन इजिप्शियन पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमीत अनेक पुरावशेषांचा शोध घेतला.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला, साहित्य आणि वास्तुकलाचे ठळक पैलू आणि सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

भारत-इजिप्त संबंध
पुरातत्त्वीय संशोधन काय सुचित करते?

तुमच्या माहितीसाठी :

जगातील चार प्राचीन संस्कृतींमधील दोन प्रमुख संस्कृती म्हणजेच भारत आणि इजिप्त. या दोन्ही देशांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतकेच नाही तर या दोन्ही देशांमधील ऋणानुबंध स्थापन करणारे अनेक पुरावे उघडकीसही आले आहेत.

पोलिश संशोधकांनी अलीकडेच प्राचीन इजिप्शियन पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमीत अनेक पुरावशेषांचा शोध घेतला. या स्मशानभूमीत असलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचा कालखंड रोमनकालीन आहे. त्यामुळे या प्रदेशात तैनात असलेल्या रोमन सैन्यांच्या जीवनाविषयी समजण्यास मदत झाली आहे.

ही प्राचीन इजिप्शियन पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी लाल समुद्रावरील बेरेनिके येथे आहे. या ठिकाणी झालेल्या उत्खननात केवळ पाळीव प्राण्यांचे अवशेषच नाहीत तर रोमन लष्करी अधिकाऱ्यांची पॅपिरसवरील पत्रे देखील उघडकीस आली आहेत.

बेरेनिके हे एके काळी इजिप्तमधील भरभराटीला आलेले बंदर होते आणि हे बंदर विदेशी आयातीसाठी ओळखले जात होते. त्यामुळे या भागात भारत, आशिया, अरेबिया आणि पूर्व आफ्रिकेतील व्यापारी मालाचा सतत प्रवाह असे. कालांतराने हे बंदर रोमन साम्राज्यासाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाले.

या स्मशानामध्ये मांजरी, कुत्री, वासरे आणि विशेषत: माकडांसह २०० हून अधिक प्राण्यांचे सांगाड्यांचे अवशेष सापडले आहेत. या प्राण्यांना खास बनवलेल्या कबरींमध्ये दफन करण्यात आले होते, ही बाब त्या प्राण्यांविषयी वाटणाऱ्या उच्च सहानुभूतीची निदर्शक आहे.

मकाका माकडांचे थडगे विशेषआहेत, या थडग्यांमधील दोन प्रजाती मूळ भारतातील होत्या. त्या हिंद महासागर आणि लाल समुद्रातून आयात केल्या गेल्या, याचे स्पष्ट पुरावे सापडले. या माकडांना स्टेटस सिम्बॉल मानले जात होते आणि त्यांची मानवासारखी काळजी घेतली जात होती.

हा शोधातून प्राचीन रोमन सैनिकांचे जीवन स्पष्ट होते. शिवाय भारतातून निर्यात होणाऱ्या प्राण्यांविषयीही समजण्यास मदत होते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

प्राचीन इजिप्शियन स्मशानभूमीत भारतीय माकडे; नवीन पुरातत्त्वीय संशोधन काय सूचित करते?

२) भारताचे शेजार प्रथम धोरण :

नरेंद्र मोदींच्या यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला भारताच्या जवळपास सर्वच शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखाची उपस्थिती बघायला मिळाली.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील भारत आणि त्याचे शेजारी देश या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

भारताचे परराष्ट्र धोरण
भारताचे शेजार प्रथम धोरण
गुजराल डॉक्टरीन
भारताचे शेजारी देशांशी असलेले संबंध
नकाशा : भारत आणि त्याच्या शेजारी देशांची सीमा

तुमच्या माहितीसाठी :

जागतिक स्तरावरील वाढता संघर्ष आणि अनिश्चितेचा सामना करण्यासाठी भारताला शेजारी देशांबरोबरील मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षात भारताला परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. मागच्या दशकभरात शेजारी देशांबरोबरच्या संबंधांमध्येही अनेक चढउतार बघायला मिळाले आहेत.

आता पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला जवळपास सगळ्याच शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली. त्यांची ही उपस्थिती प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना अधोरेखित करते.

या शपथविधीला पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अनुपस्थिती ही दोन्ही देशातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न अपयशी होत असल्याचे दर्शवते.

चीनसोबतचे संबंध सुधारणे आणि पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचे मोठे आव्हान आता भारतासमोर असणार आहे.

शेजार प्रथम धोरण, हे १९४७ पासून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. आपल्या शेजारी देशांबरोबर सौदार्हाचे संबंध प्रस्थापित करणे, प्रादेशिक सहकार्याला चालना देणे हा धोरणाचा उद्देश आहे. शेजारी प्रथम ही संकल्पना २००८ साली अस्तित्वात आली. भारत आपल्या शेजार प्रथम धोरणांतर्गत सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी :

परराष्ट्र धोरण म्हणजे जगातील इतर देशांशी सुसंवाद साधण्याचा एक मार्ग. हे म्हणजे असे आहे की, ज्याप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या लोकांशी भेटतो, त्यांच्याशी मैत्री करतो, व्यवहार करतो. त्याचप्रमाणे आपला देश इतर देशांशी संवाद साधतो, मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतो, व्यवहार करतो. इतर देशांप्रमाणेच भारताचेही स्वतःचे असे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणावर दोन गोष्टींचा प्रभाव आहे. एक म्हणजे देशाच्या आत काय घडते आहे आणि देशाबाहेर काय घडते आहे. देशांतर्गत घटकांमध्ये इतिहास, संस्कृती, भूगोल व अर्थव्यवस्था यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. हे घटक इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे अमेरिका व सोविएत संघ यांच्यातील शीतयुद्ध, संयुक्त राष्ट्रांची निर्मिती, अण्वस्त्रांची स्पर्धा यांसारखे देशाबाहेरील घटकही आपल्या परराष्ट्र धोरणाला आकार देतात.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : परराष्ट्र धोरण आणि त्याचे निर्धारक

UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : भारताच्या परराष्ट्र धोरणाचे टप्पे

UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना (SAARC)

आंतराष्ट्रीय संबंधासंदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..