मागील लेखातून आपण १८५७ च्या उठावामागील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कारणे, त्यापूर्वी झालेले उठाव, तसेच हा उठाव अपयशी ठरण्यामागची महत्त्वाची कारणे आणि स्वरूपांची माहिती घेतली. या लेखातून आपण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना, उद्देश आणि वाटचालीबाबत जाणून घेऊ या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी निवृत्त नागरी सेवा अधिकारी एलेन ओक्टेवियन ह्युम यांनी केली. यात दादाभाई नौरोजी व दिनशा वाचा यांचाही सहभाग होता. ए. ओ. ह्युम हे १८८५ ते १९०६ या काळात काँग्रेसचे महासचिव होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग- ५

डिसेंबर १८८५ मध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन बॉम्बे (मुंबई)तील तेजपाल संस्कृत महाविद्यालयात पार पडले. या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. सुरुवातीला हे अधिवेशन पुणे येथे होणार होते. मात्र, पुण्यात कॉलराची साथ सुरू झाल्याने हे अधिवेशन बॉम्बे (मुंबई) येथे घेण्यात आले. या अधिवेशनात देशभरातून ७२ प्रतिनिधी हजर होते. खरे तर ज्यावेळी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी भारत ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे पहिल्याच अधिवेशनाला ७२ प्रतिनिधींनी हजर राहणे हा एक प्रकारे ऐतिहसिक क्षण होता.

काँग्रेसच्या स्थापनेचा उद्देश

१८५७ च्या उठावातील अपयशानंतर ब्रिटिश सरकारविरोधात सशस्त्र नव्हे, तर संघटनात्मक आंदोलनाची आवश्यकता असल्याची जाणीव भारतीयांना झाली होती. त्यावेळी भारतातील सुशिक्षित वर्ग सशस्त्र क्रांतीच्या भानगडीत पडणारा नव्हता; त्यांना संविधानिक मार्गाने ब्रिटिशांचा प्रतिकार करायचा होता. त्यासाठी एक संघटना असणे गरजेचे होते. दुसरीकडे १८५७ सारखा उठाव पुन्हा होऊ नये याची खबरदारी ब्रिटिशांकडून घेतली जात होती. यातूनच ए. ओ. ह्युम यांनी काँग्रेसच्या स्थापनेची संकल्पना मांडली. तर, दादाभाई नौरोजी यांनी ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ हे नाव सुचवले होते. ब्रिटिश सरकार आणि भारतातील आंदोलकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, जनतेच्या मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे, संविधानिक सुधारणांची मागणी करणे आणि विविध अधिवेशनांच्या माध्यमातून जनतेच्या मनात राष्ट्रवादी विचार निर्माण करणे हे काँग्रेसचे प्राथमिक उद्देश होते.

काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संघटना

१) ब्रिटिश इंडियन असोसिएशन, १८५१ : या संघटनेची स्थापना कलकत्त्यातील जमीनदार संघटना आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या़च्या एकत्रीकरणातून झाली होती. ही भारतातील पहिली राजकीय संघटना होती, असे म्हणायला हरकत नाही. भारतीय नागरिकांचे विशेषत: जमीनदार आणि सुशिक्षित लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडणे हा या संघटनेचा महत्त्वाचा उद्देश होता.

२) इंडियन (नॅशनल) असोसिएशन, १८७६ : १८७५ साली बाबू शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. पुढे याच संघटनेचे नाव बदलून, ते इंडियन असोसिएशन, असे करण्यात आले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे संघटनेचे अध्यक्ष होते; तर आनंद मोहन बोस, शिवनाथ शास्त्री, द्वारकानाथ गांगुली हे सदस्य होते. भारतीय जनतेचे प्रश्न जनतेसमोर मांडणे, ICS मध्ये भारतीयांचा टक्का वाढवणे, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्टे होती. इंडियन असोसिएशन ही बंगालमधील एक महत्त्वाची राजकीय संघटना होती. पुढे ही संघटना राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली.

३) मद्रास महाजन सभा, १८८४ : ज्याप्रमाणे इंडियन असोसिएशन ही बंगालमधील एक महत्त्वाची राजकीय संघटना होती. त्या शप्रमाणेच मद्रासमध्येही मद्रास महाजन सभा ही महत्त्वाची संघटना होती. सुब्रमनियम अय्यर, वीरराघवचरियर, पी. आनंदाचार्लू यांनी मिळून या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेने पुढे स्थानिक प्रतिनिधित्वाची मागणी केली.

४) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, १८८५ : ही संघटना फिरोजशहा मेहता, बब्रुद्दीन तय्यबजी व के. टी. तेलंग यांनी स्थापन केली होती. वरील संघटनांप्रमाणेच जनतेच्या मागण्या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवणे हे या संघटनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग- ६

दरम्यान, वरील सर्व संघटना या प्रादेशिक स्तरावर काम करीत होत्या. आपापल्या राज्यात ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्याचे काम या संघटनांकडून करण्यात येत असे. त्यामुळे या संघटनांचा म्हणावा तसा प्रभाव पडत नव्हता. यातूनच अखिल भारतीय स्तरावर एक संघटना स्थापन करण्याची गरज निर्माण झाली. पुढे काँग्रेसच्या रूपाने ही संघटना अस्तित्वात आली.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history formation of indian national congress spb