Modern Indian History in Marathi : इ.स. १८५७ मध्ये उत्तर आणि मध्य भारतात एक मोठा उठाव झाला. हा उठाव म्हणजे ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात होती. या उठावामुळे ब्रिटीश साम्राज्याला मोठा धक्का बसला. ब्रिटीश सैन्यातील भारतीय सैनिकांच्या बंडाने या उठावाची सुरुवात झाली. बघता बघता या उठावाचे लोण सर्वत्र पसरले आणि सामान्य नागरिकही या उठावात सहभागी झाले. या उठावालाच ‘भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध’ किंवा ‘शिपाई विद्रोह’ या नावानेही ओळखले जाते. या लेखातून आपण १८५७ च्या उठावामागील राजकीय आर्थिक कारणांबाबत जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ८

१८५७ च्या उठावाची कारणे :

ब्रिटीश सैन्यातील भारतीय शिपायांनी केलेले बंड हे १८५७ च्या उठावाचे तत्कालीन कारण होते. मात्र, १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी राबवलेली राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक धोरणे आणि कंपनीच्या प्रशासनाविरोधात लोकांमध्ये असलेली नाराजी, यातून भारतीय समाजातील विविध गटांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचा उठावाच्या स्वरूपात उद्रेक झाला.

राजकीय कारणे :

लॉर्ड डलहौजीचे खालसा धोरण १८५७ च्या उठावामागचे महत्त्वाचे कारण मानले जाते. लॉर्ड डलहौजीने दत्तक पुत्राचा अधिकार नाकारत अनेक संस्थानिकांच्या राज्याचा समावेश ब्रिटीश भारतात केला. यामध्ये सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूरसारख्या राज्यांचाही समावेश होता. त्यामुळे या संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरोधात नाराजीचा सूर उमटायला लागला. अनेक संस्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झाशीच्या राणीचा उठावातील सहभाग हा त्याचाच परिणाम होता.

या शिवाय १८५६ मध्ये डलहौजीने अवधच्या नवाबावर भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणाचा आरोप करत अवधचा समावेश ब्रिटीश भारतात केला. त्यामुळे अवधमध्ये संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ५० हजारांपेक्षा जास्त सैनिक अवधमधील होते. परिणामत: कंपनीच्या सैन्यातही उठावाचे वातावरण निर्माण झाले.

याबरोबरच ब्रिटिशांनी अनेकांची पदव्या आणि पेन्शन रद्द केले. लॉर्ड कॅनिने मुघल बादशहाचा किताब रद्द करत एकप्रकारे मुघलांची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. तसेच पेशवा दुसरा बाजीराव याचा पुत्र नानासाहेबला मिळणारी वार्षिक पेन्शनही ब्रिटिशांनी बंद केली. त्यामुळे त्यांनी मनं दुखावली गेली आणि त्यांनी उठावात सहभाग घेतला.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ७

आर्थिक कारणे

१८ व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळे तेथील उद्योगांसाठी कच्च्या मालाची आवश्यकता होती. हा कच्चा माल भारतातून पुरवला जाऊ लागला आणि तेथील पक्का माल भारतीय बाजारपेठांमध्ये विकला जाऊ लागला. त्यामुळे भारतातील हस्तउद्योगांचे मोठे नुकसान झाले. ब्रिटिशांच्या या व्यापारी धोरणामुळे अनेक कामगारांचे उपजीविकेचे साधन नष्ट झाले.

ब्रिटिशांचे शेतीविषयक धोरणही उदासीन होते. मुळात शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय होता. मात्र, शेतीच्या विकासापेक्षा कर वसुलीवर ब्रिटिशांनी लक्ष्य केंद्रित केले. कामयधारा, रयतवारी, महलवारी यांसारख्या अन्य महसूल धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला. जे शेतकरी महसूल देत नसत त्यांची जमीन हडपली जाऊ लागली. याद्वारे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्थिक शोषण झाले आणि शेतकरी दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला. त्यामुळे शेतकरी आणि जमीनदारांमध्ये ब्रिटिशांविधात असंतोष होता. एकंदरीतच ब्रिटिशांची महसूल विषयक धोरणे हे देखील या उठावाचे महत्त्वाचे कारण होते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history revolt of 1857 political and economic reasons part 1 spb