मागील लेखातून आपण क्रांतिकारी राष्ट्रवाद म्हणजे काय? त्याच्या उदयाची कारणे आणि बंगालमधील क्रांतिकारी चळवळीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीबाबत जाणून घेऊ या. मागील लेखात बघितल्याप्रमाणे क्रांतिकारकांनी जनसामान्यांची क्रांती घडवून आणण्याऐवजी ब्रिटिश अधिकारी, न्यायाधीश यांची हत्या करणे, बॉम्बस्फोट करणे अशी पद्धत अवलंबली होती. त्यानुसार त्यांनी बंगालमध्ये न्यायाधीश किंग्जफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्बहल्ला केला. ज्याप्रमाणे बंगालमध्ये या घटना घडल्या, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनीही ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर महाराष्ट्रात क्रांतिकारी चळवळीची सुरुवात १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी केली होती. त्यांनी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना गोळा करीत एक संघटना तयार केली. त्यांनी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. मात्र, काही महिन्यांतच ब्रिटिशांनी त्यांचा उठाव मोडीत काढला.

पुढे बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये गणेशोत्सव आणि १८९६ मध्ये शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. या दोन्ही उत्सवांनी महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान टिळकांनी पत्रके आणि भाषणे यांच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. त्याशिवाय ‘केसरी’ व ‘मराठा’ या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही टिळकांनी ब्रिटिशांच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

हेही वाचा – UPSC-MPSC : क्रांतिकारी राष्ट्रवाद आणि त्याच्या उदयामागची कारणे

रॅंड हत्या प्रकरण

दरम्यानच्या काळात म्हणजेच १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ब्रिटिश सरकारने वॉल्टर चार्ल्स रॅंड यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली. यावेळी रॅंडने पुण्यात जागोजागी विलगीकरण कक्ष निर्माण केले. तसेच सैनिकांना घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले. रॅंडच्या आदेशानंतर सैनिकांनी युद्धस्तरीय काम सुरू केले. त्यांनी नागरिकांच्या घरांत जबरदस्तीने घुसून तपासणी सुरू केली. यावेळी ते घरातील सामानही अस्ताव्यस्त करीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी रॅंडकडे या घटनेची तक्रार केली. मात्र, रॅंडने यावर कोणतीही कारवाई केली नाही.

रॅंडच्या या धोरणांवर टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून टीका केली. त्यानंतर काही दिवसांतच रॅंडची हत्या करण्यात आली. ही हत्या पुण्यातील चाफेकर बंधूंनी केली. या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. तसेच टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांमुळे चाफेकर बंधू प्रभावीत झाले आणि त्यातून त्यांनी रॅंडची हत्या केली, असा आरोप करीत ब्रिटिशांनी टिळकांनाही अटक केली आणि त्यांना १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

नाशिक कट खटला

विनायक दामोदर सावरकर आणि गणेश सावरकर या दोन भावांनी १८९९ साली ‘मित्रमेळा’ ही संघटना स्थापन केली. मात्र, त्याच्या काही महिन्यांनंतर विनायक सावरकर शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे त्यांची ओळख मदनलाल धिंग्रा, लाला हरदयाळ व शामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकारकांशी झाली. विनायक सावरकर हे इटलीच्या मॅझिनीच्या विचारांनी प्रेरित होते. त्यांनी मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतरही केले होते. तसेच त्यांनी १८५७ च्या उठावावर आधारित ‘भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तकही लिहिले.

पुढे सावरकर बंधूंनी १९०४ मध्ये नाशिकमध्ये अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. या संघटनेचे काही सदस्य हे फ्रान्समधून बॉम्ब बनवायचे प्रशिक्षण घेऊन आले. त्यांनी पुणे, नाशिक व मुंबईत बॉम्बनिर्मितीचा कारखाना सुरू केला. मात्र, ‘अभिनव भारत’च्या कामांची भनक नाशिकचे कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सनला लागली. जॅक्सन हा तसा उदारमतवादी विचारांचा होता. मात्र, तरीही जॅक्सन पुढे जाऊन आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो, या विचाराने अभिनव भारत या संघटनेचे एक सदस्य अनंत लक्ष्मण कान्हेरे याने १९०९ मध्ये जॅक्सनची हत्या केली.

हेही वाचा – UPSC-MPSC : बंगालचे विभाजन; कारणे, परिणाम अन् स्वदेशी चळवळ

जॅक्सनच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ‘अभिनव भारत’च्या ३८ सदस्यांना अटक केली. त्यामध्ये सावरकर बंधूंचाही समावेश होता. या खटल्यात आठ जणांची निर्दोष मुक्तता झाली; तर ३० जणांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या. तसेच या हत्येमागे विनायक सावरकर यांचा हात असल्याचा आरोप ब्रिटिशांनी केला. याबरोबर त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोपही सावरकरांवर करण्यात आला. सावरकरांना दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी २५ वर्षांनुसार ५० वर्षे ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा सुनावली गेली. त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी सातत्याने ब्रिटिशांकडे दयेचे अर्ज केले. त्यामुळे त्यांना १० वर्षांच्या शिक्षेनंतर मुक्त करण्यात आले. मात्र, जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी कोणत्याही क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला नाही. नाशिक कट खटल्यानंतर महाराष्ट्रात कोणतीही मोठी क्रांतिकारी घटना घडली नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history revolutionary activity in maharashtra rand murder case and nashik conspiracy case spb
Show comments