मागील लेखातून आपण भारतातील लढाऊ राष्ट्रवादाचा उदय आणि त्याची कारणे, बंगालचे विभाजन आणि त्या विरोधात भारतीयांनी केलेल्या आंदोलनांविषयी माहिली घेतली. या लेखातून आपण क्रांतिकारी राष्ट्रवाद म्हणजे काय? त्याच्या उदयाची कारणे आणि बंगालमधील क्रांतिकारी घटनांबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – UPSC-MPSC : बंगालचे विभाजन; कारणे, परिणाम अन् स्वदेशी चळवळ

क्रांतिकारी राष्ट्रवाद

मागील लेखात आपण बघितलं की, बंगालच्या विभाजनाचा निर्णय लोकमताकडे दुर्लक्ष करून घेण्यात आला होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या भावना खूपच दुखावल्या गेल्या. परिणामत: नागरिकांनी या विभाजनाला जबरदस्त विरोध केला. जागोजागी मोठ्या प्रमाणात आंदोलनं आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले. ही आंदोलनं दडपून टाकण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून करण्यात आला. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला, त्या शाळांवर कारवाई करण्यात आली; त्यांचे अनुदान काढून घेण्यात आले. तरुणांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. अनेकांना अटक करण्यात आली; तर काहींवर लाठीचार्च करण्यात आला.

अखेरीस सरकारची दडपशाही आणि नेतृत्वाचे अपयश यामुळे अनेक तरुणांनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग स्वीकारला. कृतीशून्य विरोधाने राष्ट्रवादी उद्दिट्ये साध्य होतील, यावर त्यांचा विश्वास राहिला नाही. त्यांनी जनसामान्यांची क्रांती घडवून आणण्याऐवजी ब्रिटिश अधिकारी, न्यायाधीश यांची हत्या करणे, बॉम्बस्फोट करणे अशी पद्धत अवलंबली. याला तत्कालीन वृत्तपत्रांनीही पाठिंबा दिला. यात बंगालमधील ‘संध्या’, ‘युगांतर’ आणि महाराष्ट्रातील ‘काळ’ ही वृत्तपत्रे आघाडीवर होती. याच काळात शस्त्रबळाच्या वापरावर विश्वास असलेल्या तरुणांच्या अनेक गुप्त संघटना देशभर उभ्या राहिल्या. त्यापैकीच अनुशिलन समिती एक होती.

बंगालमधील क्रांतिकारी घटना

अनुशिलन समितीची स्थापना १९०२ मध्ये कोलकत्ता येथे झाली. परमार्थ मित्रा यांनी ही समिती स्थापन केली. त्यांना पी मित्रा या नावानेही ओळखलं जात. याच काळात पी मित्रा यांची ओळख पुलीन बिहारी दास यांच्याशी झाली. त्यांनी दास यांना ढाका येथे अनुशिलन समितीची शाखा उघडण्याची विनंती केली. त्यानंतर दास यांनी ही विनंती मान्य करत ढाका अनुशिलन समितीची स्थापना केली. अनेक तरुण अनुशिलन समितीशी जोडले गेले. एकट्या ढाक्यात या समितीच्या ५०० पेक्षा जास्त शाखा होत्या. दरम्यानच्या काळात या समितीने मानिकटोला गार्डन येथे बॉम्ब बनवण्याचा कारखाना सुरू केला. तसेच त्यांनी बॉम्ब हल्ल्यांची योजना आखली.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात लढाऊ राष्ट्रवाद वाढण्याची नेमकी कारणं काय होती?

मानिकटोला गार्डन केस आणि अलीपूर बॉम्ब कट प्रकरण

डिसेंबर १९०७ मध्ये प्रफुल्लकुमार चाकी आणि खुदीराम बोस या क्रांतिकारकांनी मुजफ्फरपूर येथील न्यायाधीश किंग्जफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात किंग्जफोर्ड तर बचावला. मात्र, दोन निर्दोष महिलांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. पोलिसांनी खुदीराम बोस यांना पडकून ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशीची शिक्षा दिली; तर प्रफुल्लकुमार चाकी यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

मे १९०८ मध्ये पोलिसांनी मानिकटोला गार्डन येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवायचे साहित्य जप्त केले. तसेच बरिंद्र कुमार घोष, अरबिंदो घोष, भूपेंद्र नाथ दत्ता आणि हेमचंद्र दास कांगो यांच्यासह ३४ जणांना अटक केली. याबरोबरच पोलिसांनी अनुशिलन समिती आणि इतर काही क्रांतिकारी संघटनांवर बंदी घातली. १९१० मध्ये पुलीन दास यांनाही अटक करण्यात आली. शिवाय ‘युगांतर’ या वृत्तपत्रावरही बंदी घालण्यात आली. मात्र, यानंतरही बंगालमधील क्रांतिकारी चळवळ थांबली का? तर नाही. पुलीन दास यांच्या अटकेनंतरही बंगालमध्ये ढाका अनुशिलन समिती सक्रिय होती. आशुतोष दास गुप्ता आणि माखनलाल यांनी समितीचे कार्य पुढे नेले.

हेही वाचा – UPSC-MPSC : काँग्रेसच्या स्थापनेनंतर मांडण्यात आलेला ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांत नेमका काय होता?

दरम्यानच्या काळात पहिल्या विश्वयुद्धाला सुरुवात झाली. १९१४ ते १९१८ हा काळ क्रांतिकारकांसाठी महत्त्वाचा काळ होता. या दरम्यान जर्मनीने क्रांतिकारकांना हत्यारं पुरवली. या हत्याऱ्यांच्या सहाय्याने क्रांतिकारकांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांची हत्या केली. एकंदरीतच ब्रिटिश सरकार बंगालमधील क्रांतिकारी घटना रोखू शकली नाही. ही बाब रॉलेट समितीच्या अहवालातही पुढे आली. या समितीच्या अहवालानुसार १९०६ ते १९१७ दरम्यान ६० सरकारी अधिकाऱ्यांची हत्या आणि दरोड्याच्या ११० घटना घडल्या. बंगालबरोबरच महाराष्ट्र आणि पंजाबमध्येही अनेक क्रांतिकारी घटना घडल्या. या घटनांचा आढावा आपण पुढील लेखात घेऊया.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history revolutionary nationalism in bengal causes and maniktola garden case alipore bomb case spb
Show comments