मागील काही लेखांतून आपण काँग्रेसची स्थापना, लढाऊ राष्ट्रवादाचा उदय, बंगालची फाळणी, होमरूल आणि गदर चळवळ, मुस्लीम लीगची स्थापना तसेच लखनऊ करार आदी विषयांची माहिती घेतली. या लेखातून आपण चंपारण सत्याग्रहाविषयी जाणून घेऊया.

पार्श्वभूमी आणि कारणे

इ. स. १७५० मध्ये भारतात ब्रिटिशांनी नीळचा व्यापार सुरू केला होता. भारतातील बेरार (आताचा महाराष्ट्र-विदर्भाचा प्रदेश), अवध (आताचे उत्तर प्रदेश) आणि बंगालच्या भागात याचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जात होते. ईस्ट इंडिया कंपनी भारतीय शेतकऱ्यांना नीळची लागवड करण्यासाठी सांगत आणि ही नीळ युरोप, चीनसारख्या देशांमध्ये चांगल्या किमतीत विकत असत. शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदलाही मिळत असे. मात्र, या नीळच्या लागवडीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने एकूण शेतीच्या तीन विशांस भागावर ही नीळची शेती केली जात होती. त्यालाच तीन कठिया पद्धत म्हटल जातं. अशातच १९१५ मध्ये जर्मनीतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम नीळ तयार केली. भारतात उगवणाऱ्या नीळपेक्षा ही नीळ स्वस्त होती. परिणामतः जगभरात भारतातील नीळची मागणी घटू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे पैसेही कमी मिळू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नीळचे उत्पादन बंद केले. मात्र, ब्रिटिशांनी शेतकऱ्यांचे शोषण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर नीळ उत्पादनासाठी जबरदस्ती करण्यात आली. ब्रिटिशांच्या या जुलूम जबरदस्तीमुळे देशभरातील शेतकरी चिंताग्रस्त होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : मुस्लीम लीगची स्थापना का करण्यात आली? त्यामागे नेमका उद्देश काय होता?

चंपारणचा लढा नेमका काय होता?

इ. स. १९१५ मध्ये गांधीजींचे भारतात आगमन झाले होते. चंपारण येथील शेतकऱ्यांना त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्याची माहिती होती. त्यांनी गांधीजींना चंपारणमध्ये येण्याची आणि तेथील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजींनी बाबू राजेंद्रप्रसाद, अनुग्रसह नारायण सिन्हा, नरहरी पारीख आणि जे. बी. कृपलानी यांच्यासह इ.स. १९१७ मध्ये चंपारण येथे पोहोचले. गांधीजींनी चंपारणमध्ये पोहोचताच शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, गांधींच्या या कृतीला चंपारण येथील जिल्हाधिकाऱ्यांनी विरोध केला. गांधीजींना अटक करण्यात आली. तसेच त्यांना १८ एप्रिल १९१७ मध्ये मोतीहारी कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, गांधीजी आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर ब्रिटिशांनी गांधीजींना सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच चंपारणमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. गांधीजीसुद्धा या समितीचे सदस्य होते. गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनाचा हा पहिला प्रयत्न होता, जो यशस्वी ठरला होता. गांधीजींनी सविनय कायदेभंगाची भारतातील पहिली लढाई जिंकली होती.

चंपारण सत्याग्रहाची वैशिष्ट्ये

चंपारण सत्याग्रहाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. :

  • चंपारण सत्याग्रह ही भारताची पहिली अहिंसक चळवळ होती.
  • विरोधकांचा केवळ निषेध करण्याऐवजी त्यांच्या चुकीच्या धोरणांना आणि शोषणात्मक वागणुकीला पहिल्यांदाच तार्किक विरोध करण्यात आला.
  • चंपारण सत्याग्रहात स्थानिक नेते, शेतकरी, महिला यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
  • चंपारण सत्याग्रहात पहिल्यांदाच सविनय कायदेभंग करण्यात आला.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे सत्ताधाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर नैतिक दबाव टाकण्याचे धोरण पहिल्यांदाच स्वीकारले गेले.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘मोर्ले-मिंटो सुधारणा’ कायदा नेमका काय होता?

चंपारण सत्याग्रहाचे परिणाम :

  • चंपारण सत्याग्रहानंतर तीन कठिया पद्धत संपुष्टात आली.
  • ब्रिटिश आणि बागायतदार यांचे शेतकऱ्यांविषयीचे मतपरिवर्तन झाले.
  • महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसक पद्धतीचे महत्त्व वाढले. भारतातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला.
  • या घटनेने भारतीय राष्ट्रीय चळवळीला एक महत्त्वाची दिशा दिली.

Story img Loader