मागील लेखातून आपण अहकार चळवळ काय होती? ती का सुरू करण्यात आली? या चळवळीबाबत काँग्रेस आणि गांधीजींची भूमिका नेमकी काय होती? तसेच ही चळवळ मागे का घेण्यात आली? याबबत माहिती घेतली. या लेखातून आपण स्वराज्य पक्षाविषयी जाणून घेऊया. गांधीजींनी मागे घेतलेले असहकार आंदोलन, भारत सरकार कायदा १९१९, तसेच १९२३ च्या निवडणुका अशा विविध महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी १९२३ रोजी सी.आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हा एक प्रकारे राजकीय पक्षच होता. तसेच या पक्षाला काँग्रेस-खिलाफत स्वराज्य पक्ष नावानेही ओळखलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – UPSC-MPSC : असहकार चळवळ; कारणे, स्वरूप अन् महत्त्व

पार्श्वभूमी आणि कारणे :

१९२२ मध्ये झालेल्या चौरीचौरा येथील घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती. त्यामुळे काँग्रेसमधील तसेच इतर राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या एका घटनेमुळेही असहकार चळवळ मागे घेऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. पण, तरीही असहकार चळवळ स्थगित करण्यात आली. याबरोबरच १९२२ मध्ये चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे गांधीजींच्या अनुपस्थितीत नेमकं काय करावं, असा प्रश्न होता. त्यावेळी काँग्रेसपुढे दोन पर्याय होते. एक तर एखादे नवे आंदोलन सुरू करावे किंवा १९१९ च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार १९२३ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाग घ्यावा. असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर जनतेतील नाराजी बघता, नवे आंदोलन सुरू करणे शक्य नव्हते.

यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले. १९२३ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाग घ्यावा आणि विधान परिषदेत जाऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी काँग्रेसमधील काही नेत्यांची इच्छ होती. यामध्ये प्रामुख्याने सी. आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांचा समावेश होता, तर काँग्रेसने विधान परिषदेत सहभागी होई नये, अशी काँग्रेसमधील गांधी समर्थकांची म्हणजे सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद वगैरे नेत्यांची इच्छा होती.

यादरम्यान, डिसेंबर १९२२ मध्ये गया येथे काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले. सी. आर. दास या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तर मोतीलाल नेहरू हे सचिव होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निवडणुकीत भाग घेऊन विधान परिषदेत प्रवेश करावा आणि सरकारच्या धोरणांना विरोध करावा, असा प्रस्ताव मोतीलाल नेहरू यांनी मांडला. परंतु, महात्मा गांधींचे समर्थक सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या नेत्यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आणि हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. परिणामत: सी. आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

स्वराज्य पक्षाची स्थापना :

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सी. आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी १ जानेवारी १९२३ रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. सी. आर. दास म्हणजेच चित्तरंजन दास हे या पक्षाचे अध्यक्ष होते. हा नवा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमधील एक गट म्हणून कार्य करणार होता. महत्त्वाचे म्हणजे या पक्षाला काँग्रेसचे सर्व कार्यक्रम मान्य होते. काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय वाद सुरू झाला होता.

स्वराज्य पक्षाला मिळालेले यश :

नोव्हेंबर १९२३ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीच्या तयारीसाठी स्वराज्य पक्षाला फार कमी कालावधी मिळाला. मात्र, तरीही त्यांना या निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यांनी केंद्रीय कायदेमंडळातील १०१ पैकी ४२ जागांवर विजय मिळवला. तसेच प्रांतीय विधान परिषदांमध्येही त्यांनी विरोधी मतदान करून सरकारला पराभूत केले. तसेच त्यांनी १९१९ चा भारत सरकार कायदा किती पोकळ आहे, हे दाखवून दिले.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील मुस्लिमांनी खिलाफत चळवळ का सुरू केली? याबाबत गांधीजींची भूमिका काय होती?

स्वराज्य पक्षाचे पतन :

५ फेब्रुवारी १९२४ रोजी प्रकृतीच्या कारणावरून गांधीजींची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काँग्रेसमधील दोन गट बघता त्यांना वाईट वाटले. १९०७ मध्ये सुरत अधिवेशनात ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये फूट पडली होती, अशी प्रकारची फूट पुन्हा पडू नये अशी काँग्रेस नेत्यांचीही इच्छा होती. त्यामुळे त्यांनी गांधीजींच्या सल्ल्यानुसार काँग्रेसमध्ये राहूनच आपआपल्या मार्गाने कार्य करण्याचे ठरवले.

दरम्यान, जून १९२५ मध्ये सी. आर. दास यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय चळवळ आणि स्वराज्य पक्षाची मोठी हानी झाली. पुढे हिंदू महासभेच्या निर्मितीनंतर सांप्रदायिकता डोके वर काढू लागली. हळूहळू सांप्रदायिक तत्त्वाच्या आधारावर स्वराज्य पक्षाचेही विभाजन झाले आणि कालांतराने या पक्षाचेही पतन झाले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history why swarajya party formed by cr das in 1923 after left congress spb
Show comments