विक्रांत भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थी मित्रहो, आज आपण सुविचारांवर आधारित आणखी काही प्रश्नांची नमुना उत्तरे पाहणार आहोत.

Que. “ The simplest acts of kindness are by far more powerful than a thousand heads bowing in prayers.” –  Mahatma Gandhi (150  words, 10  marks)

प्र. ‘‘हजारो व्यक्तींच्या प्रार्थनेपेक्षा दयेच्या प्रेरणेतून केलेल्या साध्या कृती अधिक प्रभावी असतात.’’ – महात्मा गांधी

(१५० शब्द, १० गुण)

उत्तर – बऱ्याच धर्मामध्ये प्रार्थना करण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. प्रार्थना केल्यामुळे मनातील चिंता दूर होण्यास मदत होते, मनाला शांती मिळते, नवीन मार्ग मिळून समस्या सुटतील अशी आशा निर्माण होते. परंतु खरा प्रश्न हा आहे की यातून खरंच समस्या सुटतात का? कारण हे जर खरे असते तर आज जगामध्ये एवढय़ा समस्या दिसल्या नसत्या वा त्या सोडवण्यासाठी सामान्य व्यक्तींना, शासनाला आणि एकंदरीतच समाजाला एवढे कष्ट घ्यावे लागले नसते. नुसते प्रार्थना केल्याने व्यक्ती निष्क्रिय होण्याची शक्यता फार आहे. तिच्यामध्ये आत्मविश्वास येऊन सद्गुण विकास होण्याची शक्यता फार कमी आहे.

या उलट प्रत्यक्ष कृती करणे, तेही दयेने प्रेरित होऊन हा एक प्रभावशाली मार्ग आहे. यामुळे व्यक्तीमध्ये सद्गुण निर्मिती होऊ लागते. ती समानुभूतीचा अनुभव घेऊ शकते आणि त्याद्वारे इतरांचे सुख-दुख जाणून घेण्यास समर्थ होते. त्यामुळे तिला इतरांच्या समस्या उत्तम रीतीने जाणून घेता येतात आणि त्यांना तशी मदत करता येते. यामुळे इतरांशी एक विश्वासाचे आणि माणुसकीचे नाते निर्माण होते की जे इतर कोणत्याही नात्यापेक्षा उत्तम असते. यामुळे समाजामध्ये चांगली मूल्ये आणि तत्त्वे यांवर विश्वास दृढ होऊ लागतो.

आजच्या काळात जिथे समाज माध्यमांवर व्यक्त होणे आणि स्वत:च्या अस्मितांचे प्रदर्शन करणे ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे तिथे प्रत्यक्ष कृती केलेली क्वचितच पाहायला मिळते. अशावेळी सर्वच गोष्टींबाबत शंका निर्माण होते. या सर्वावर मात करायची असेल तर दयेच्या आधारे एकमेकांशी व्यवहार करणे फारच संयुक्तिक ठरते. उदाहरणार्थ महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी दयाभावातून प्रेरित होऊन केलेल्या कार्यामुळे आधुनिक भारताचा पाया घातला गेला.

Que. “To awaken the people,  it is the women who must be awakened.  Once she is on the move,  the family moves,  the village moves,  the nation moves.” –  Jawaharlal Nehru (150  words, 10  marks)

प्र. ‘‘लोकांना जागे करण्यासाठी स्त्रियांना जागे करावे लागेल. एकदा का ती प्रगती करायला लागली की कुटुंब प्रगती करते, गाव प्रगती करते, राष्ट्र प्रगती करते.’’ – जवाहरलाल नेहरू (१५० शब्द, १० गुण)

उत्तर – भारतीय समाजासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेकदा स्त्रियादेखील पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थन वा पुरस्कार करताना आढळून येतात. अशावेळी त्यांच्या क्षमतेनुसार योग्य संधी प्राप्त होणे आणि त्यांचा फायदा घेता येणे हे स्त्रियांसाठी आव्हानात्मक ठरते. या अशा धारणांचा परिणाम तिच्या सामाजिक, शारीरिक, बौद्धिक, प्रगतीवर नकारात्मकरित्या झालेला दिसून येतो. आणि हा परिणाम फक्त तिच्या पुरताच मर्यादित राहत नाही.

लहान मुलांच्या जडणघडणीच्या काळात त्यांच्यावर आईचा फार मोठा प्रभाव असतो. या वयात केले जाणारे संस्कार आणि घडवले जाणारे मन आणि शरीर यांचे पडसाद भावी आयुष्यात फार काळ जाणवत राहतात. अशावेळी जर स्त्री ही पुरुषप्रधान संस्कृतीने निर्माण केलेल्या कृत्रिम बेडय़ांमध्ये अडकून राहिली वा तिने स्वत:ला अडकवून घेतले आणि इतर स्त्रियांनाही अडकवले तर भावी पिढय़ांची योग्य जडणघडण होणार नाही. यामुळे मग कुटुंबाचा सर्वागीण विकास होणार नाही. अशा कुटुंबातून सशक्त चारित्र्य असलेल्या व्यक्ती निर्माण होणार नाहीत. यातून मग गाव वा समूह यांना दिशा दाखवणारे आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लावणारे तरुण युवाबळ देशाला लाभणार नाही आणि परिणामी देशाची हवी तशी प्रगती होणार नाही.

म्हणून देशाची प्रगती साधायची असेल तर सगळय़ात आधी स्त्रीला जागे व्हावे लागेल. तिला पुरुषप्रधान संस्कृतीच्या समाज आणि श्रद्धा यांची जोखाडे फेकून द्यावी लागतील. तरच ती तिच्यासाठी निर्माण केलेल्या संधींचा फायदा घेऊ शकेल. तसेच जर संधी पुरेशा नसतील तर त्यासाठी लढा देऊ शकेल.

जगाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मानवी समाजाच्या प्रगतीचे सुकाणू आतापर्यंत पुरुषांच्याच हातात राहिले आहे. यामुळे आर्थिक, तंत्रज्ञानात्मक आणि भौतिक प्रगती झाली तर आहे पण ती शाश्वत प्रगती नाही. दुसरीकडे भावनिक, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगती मात्र पुरेशी झालेली दिसून येत नाही. यामुळे विनाशकारी शस्त्रास्त्रांची निर्मिती होताना दिसून येते. हवामान बदल होत असतानाही इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. धोरणनिर्मिती मग ती राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, सर्वसमावेशक वाटत नाही. आणि म्हणून आता असा सूर निघत आहे की आता स्त्रियांना नेतृत्वाच्या संधी दिल्या पाहिजेत तरच मानवजातीच्या भवितव्याबाबत खात्री देता येईल.

या पुढील लेखामध्ये आपण सामाजिक मानसशास्त्र या घटकावरील प्रश्नांची चर्चा करणार आहोत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation general studies reasoning questions part 2 amy
Show comments