UPSC Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेक जण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये उत्तीर्ण होण्याचे दोन मार्ग आहेत; ते म्हणजे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय. हिमांशू गुप्ता यांनी हे दोन मार्ग पार केले आणि आज ते आयएएस अधिकारी आहेत. मात्र, हिमांशू यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी शाळेत जाण्यासाठी रोज ७० किमी प्रवास आणि वडिलांसोबत चहा विकण्यापासून आज आयएएसपर्यंतचा हिमांशू गुप्ता यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा हाच प्रवास आज जाणून घेऊयात.

उत्तराखंडचे हिमांशू गुप्ता हे २०२० मध्ये आयएएस अधिकारी झाले. त्यांना यूपीएससीमध्ये अखिल भारतीय १३९ वा क्रमांक मिळाला होता. मात्र यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. हिमांशू गुप्ता यांना शाळेत जाण्यासाठी दररोज ७० किमी प्रवास करावा लागत होता. यूपीएससी उत्तीर्ण करुन आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ता यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे. तसेच जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी ते चहा देखील विकत होते. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी हिमांशू चहाच्या दुकानात कामही केले होते. पण, त्यांनी कधीच हार मानली नाही. उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता हे आपल्या मेहनतीच्या बळावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आज ते आयएएस अधिकारी बनले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटी असेल तर यश कसं मिळत हे त्यांच्या सबंध आयुष्यातून समजतं.

यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी

हिमांशू गुप्ता यांनी सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लास लावले नव्हते. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले होते. परंतु, त्यानंतर त्यांनी आयएएस अधिकारी बनण्यासाठी दुप्पट मेहनत केली आणि आणखी तीन प्रयत्न केले. हिमांशू गुप्ता यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली, जेव्हा त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवेसाठी निवड झाली. त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलिस सेवेसाठी निवड झाली. त्यानंतर २०२० मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.

हेही वाचा >> “हा सुधरला तर मिशा काढेन” शिक्षकांनी वडिलांना दिले चॅलेंज; तोच आदित्य आहे आज आयएएस ऑफिसर

जिद्द असेल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. काही लोक म्हणतात की, ज्यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे आहेत तेच आयएएस होऊ शकतात. गरिबीचा सामना करणाऱ्या किंवा कमी पैशात जगणाऱ्या मुलासाठी हे खूप अवघड आहे. पण, असं नाही हे हिमांशूने सिद्ध केलं आहे.