लग्नाच्या दहापंधरा वर्षांनंतर नवराबायकोंना त्यांच्या नात्यापलीकडे एखादा हळवा क्षण ‘भेटला’ तर त्याला मिठी मारायचा मोह होऊ शकतो, पण तो मोह का झाला, हे समजून घेण्याची प्रगल्भता दोघांमध्ये आणण्यासाठी पारंपरिक प्रश्न बदलायला हवेत तरच या प्रश्नाच्या खोल तळाशी जाऊन ‘थोडीसी बेवफाई’ समजून घेता येऊ शकते आणि शंका, गैरसमजांची इतिश्री करता येऊ शकते.

‘‘आज सोमवार असूनही निशांत ऑफिसला आला नव्हता, म्हणून मेसेज केला तर ‘नंतर बोलतो’ एवढंच त्यानं कळवलं. अजूनही फोन नाही, आश्चर्यच वाटतंय.’’ घरी आल्यावर ओमनं त्याच्या पत्नीला, इराला सांगितलं. तेवढ्यात बेल वाजली. दारात थकलेला निशांतच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण, राग, दु:ख पाहून काही न बोलता इरानं चहा टाकला.

हेही वाचा : स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?

‘‘कसं सांगू कळत नाही, पण तुमच्याशिवाय कुणाशी बोलणार? कृतिकाला कोणीतरी ‘मित्र’ भेटलाय.’’ निशांतनं बोलून टाकलं.
ओम-इरा ऐकतच राहिले. दोन्ही जोडप्यांची छान मैत्री. ओम-निशांत एकाच ऑफिसमधले सहकारी. इरा बँकेत आणि कृतिका एका कंपनीत स्टाफ ट्रेनिंग ऑफिसर. यंदा कंपनीनं तिला गोव्यातल्या दोन विशेष प्रशिक्षणांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवलं होतं. पहिल्या कार्यक्रमातच कृतिकाला इंदूरचा ‘तो’ मित्र भेटला. त्यांच्या खूप गप्पा झाल्या, मैत्री झाली, हेही तिनं निशांतला सांगितलं होतं. तेव्हापासून ती जरा जास्तच खूश असायची. त्यांच्या फोन-मेसेजेसने निशांत थोडा अस्वस्थ व्हायचा, पण शंका घेण्यासारखं काही नव्हतं.

त्यानंतर गोव्याच्या दुसऱ्या कार्यक्रमाहून परतल्यानंतर त्याला कृतिका नजरेला नजर देणं टाळतेय, थोडी गंभीर, स्वत:तच मग्न जाणवली, तेव्हा त्याला राहवेना. तिच्या फोनचा पासवर्ड शोधणं त्याला अवघड नव्हतं. ‘त्या’ मित्रासोबतचं आक्षेप घेण्यासारखं चॅटिंग मिळाल्यावर त्याने ‘पुराव्या’सह कृतिकाला जाब विचारला. मधल्या काळात त्यांची मैत्री वाढल्याचं तिनं मान्य केलं. आत्ताच्या गोव्यातल्या ट्रेनिंगच्या वेळीही रात्री उशिरापर्यंत त्यांच्या गप्पा चालायच्या. एका क्षणाला दोघांनाही शारीरिक ओढ वाटली, पण निशांतची आठवण येऊन तिनं मोहाचा क्षण नाकारला. पण आपण इथपर्यंत वाहवतच कसे गेलो? याची तिला सतत लाज वाटत होती.
‘‘हे सांगून कृतिका खूप रडली, पण माझा तिच्यावरचा विश्वासच उडाला आहे. ट्रेनिंग प्रोग्राम चार दिवसांचे, ओळखणारंही कोणी नव्हतं. दोन्ही वेळेस एकत्र राहिलेही असतील. कधीतरी तो इथेही आला असेल. पहिल्या प्रशिक्षणानंतर तिच्या डोळ्यांत आलेली चमक पुन्हा पुन्हा आठवत राहते. आम्ही दोघं प्रेमात असताना ती अशीच खूश असायची. आताची चमक मात्र ‘त्या’च्यामुळे आलीय. संताप होतोय माझा. कसं सहन करू? मी कृतिकाला थोडे दिवस माहेरी पाठवलंय.’’ निशांतला राग आवरत नव्हता.

‘‘ कृतिकाच्या माहेरचे, माझ्या घरचे, मित्रमंडळी, नातलगांना बोलवून तिचे हे ‘उद्याोग’ जगासमोर आणावेत असं वाटतंय. विचारावं, ‘नवरा म्हणून माझ्या पुरुषार्थात काय कमी होतं म्हणून तू त्या कोण कुठल्या माणसात इतकी वाहवत गेलीस?’ तिला चांगलीच शिक्षा व्हायला पाहिजे. मी पुरावाच दाखवला म्हणून तिनं इतकं तरी कबूल केलं, पण कशावरून त्यांच्यात शारीरिक संबंध आलेच नसतील? आता त्या माणसाची आठवण आल्यावर मी तिच्याजवळ जाऊच शकणार नाही. तिला घरातून हाकलून द्यावंसं वाटतंय. डोकं फुटायची वेळ आलीय. शेवटी तुमच्याशी बोललंच पाहिजे, असं वाटलं म्हणून इथे आलो.’’
हे ऐकून दोघंही सुन्न झाले. थोड्या वेळानं इरा म्हणाली, ‘‘हे फार अनपेक्षित घडलंय, असं व्हायला नको होतं. तुझी तडफड मला समजतेय निशांत, पण तू भलत्याच प्रश्नांत अडकला आहेस असं वाटतंय. एक सांग, जगासमोर कृतिकाची बदनामी करून हा प्रश्न कसा सुटणार आहे? खूप गप्पांच्या पलीकडे काही घडलं नाही असं ती सांगतेय तर तुझा अविश्वास का?’’

हेही वाचा : एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व!

‘‘नाहीये माझा विश्वास. तिनं सिद्ध करावं सगळ्यांसमोर.’’
‘‘ही गोष्ट सिद्ध कशी करणार? तुझी एवढी खात्री असेल तर तुम्हाला घटस्फोटच घ्यावा लागेल.’’ इराने धाडकन बॉम्बच टाकला.
‘‘त्यांचं जुळवायचं सोडून काहीही काय बोलतेस इरा?’’ ओमला झेपेना.
‘‘अरे, ‘त्यांचे शरीरसंबंध आलेच असणार’ हे यानं स्वत:च पक्कं ठरवलंय. कृतिकानं त्यांची मैत्री कधीच लपवली नव्हती. यानं विचारल्यावर तिनं जे घडलं ते प्रामाणिकपणे सांगितलं…’’
‘‘आधी नाही, मी पुरावा दाखवल्यानंतर…’’
‘‘असं तुझा इगो म्हणतोय. ती स्वत:च अजून त्या धक्क्यातून बाहेर आली नसेल. तू तिचा फोन तपासलास याचाही धक्का बसला असणार तिला. कृतिकाला खोटेपणाचा किती राग आहे हे तुलाही माहितीय, पण तिला जराही वेळ न देता तुझा संशयी आत्मा पार यांचे पहिल्यापासूनच संबंध असणार. पुरुषार्थ, कृतिकाला शिक्षा, जगभर बदनामीच करतो इथे पोचला. स्वत:च तयार केलेल्या काल्पनिक प्रश्नांतून बाहेर आलास, तर वेगळे, खरे प्रश्न दिसतील.’’ इराच्या अचानक सात्त्विक संतापानं दोघेही आवाक झाले होते.
‘‘कसले खरे प्रश्न?’’ निशांतला मान्य नव्हतंच.
‘‘तुम्ही दोघं प्रेमात असतानाची तिच्या डोळ्यांतली चमक मधल्या काळात का संपली? तेव्हापेक्षा काय बदललं? ते शोध ना. शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यास तू तिच्याशी? दोघंच लॉन्ग ड्राइव्हला जाऊन किती वर्षं झाली? तिचा वाढदिवस किती वेळा लक्षात राहतो तुझ्या?’’
‘‘जबाबदाऱ्या वाढल्यावर तरुणपणीच्या छोट्या गोष्टी मागे पडणारच ना? पण हे कृतिकानं सांगितलं तुला?’’
‘‘ही प्रत्येकच घराची गोष्ट आहे निशांत. बायकोच्या अपेक्षा छोट्या असतात रे. लग्नापूर्वी प्रियकर असताना नवराही त्या पुरवतो. बिचारी बायको वाट पाहात राहते, पण तुम्हा नवऱ्यांच्या मोठमोठ्या स्वप्नांच्या नादात बायकांच्या अशा छोट्या छोट्या इच्छांचा आयुष्यभर रोज विरस होतो. एखादी बडबडत राहते, एखादी भांडत राहते, एखादी गप्प होते. आपल्याला काय हवंय हे पुन्हा पुन्हा सांगूनही याला कळतसुद्धा नाहीये म्हणून हताश होते. कृतिकासारख्या एखादीला अचानक जुन्या निशांतशी जुळणारा कुणीतरी भेटतो. ‘फक्त निशांतसाठी’ वर्षानुवर्षं अडवलेला आवेग ‘त्या’ मित्रापाशी मोकळा होतो. पण निशांतला त्याच्यासाठी आसुसलेल्या तिच्या हजारो क्षणांची कल्पनाही नसते. महत्त्वच नसतं. ती तिथपर्यंत कशामुळे पोहोचली असेल? हा प्रश्न नसतो, तर स्वत:ची मर्दानगी, त्या मित्राशी तिचे शरीरसंबंध असण्याची खात्री आणि तिला अद्दल कशी घडवायची? एवढेच प्रश्न. गेली दहा वर्षं तुमच्या आयुष्यात काय फक्त शरीरसंबंधच आहेत का रे? प्रेम केलंयस ना तिच्यावर?’’

हेही वाचा : बहीण खरंच लाडकी असेल तर…

‘‘प्रेम केलं म्हणूनच तर सहन होत नाहीये ना?’’
‘‘तुझं ते प्रेम दिसायचं थांबलं, म्हणून तिच्या डोळ्यांतली चमक विझत गेली हे तुला अजूनही कळत नाहीये का? ती एकदा मला म्हणाली होती, ‘निशांत माझ्याशी फक्त ऑफिसचे ताण, पैसे, गुंतवणूक, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या एवढंच बोलतो. मी दिसले, की काहीतरी काम सांगतो, त्याच्या शेजारी जाऊन बसले तरी मोबाइलमध्येच गुंतलेला असतो. क्वचित कधीतरी एखादा हळवा क्षण आलाच, तर नेमका फोन वाजतो. तो बंद करावा हेही त्यावेळी त्याला सुचत नाही. खास माझी म्हणून हा कधी दाखलच घेत नाही. घरातल्या टेबल, खुर्च्या, कपाटांसारखीच बायकोही असते घरात. आता मी त्याला आवडत नसेन का?’’
‘‘कामाच्या ताणात कधीतरी असा वागलोही असेन, पण ‘हे’ विसरायचं कसं? पुन्हा घडलं तर?’’ निशांत अजूनही तिथेच होता.
‘‘चल ठीक आहे, तात्पुरतं गृहीत धरू की त्यांच्यात संबंध आलेच आहेत. कारण प्रत्यक्षात काही घडलं असेल किंवा नसेलही, पण तुझ्या संशयात्म्याला पटणार नाहीचे. तर लग्नापूर्वीची तुझी एक रिलेशनशिप कृतिकाने स्वीकारली होती की नाही? उलट तुला आधार दिला होता,विश्वास दिला होता…’’
‘‘ते आधीचं होतं, कृतिकानं स्वत:ला वेळेवर आवरलं असतं तर हे घडलं नसतं.’’

‘‘हे घडायला नकोच होतं, पण आताही तू तिच्या भावनिक गरजा समजून घेतल्या असत्यास तरीही हे घडलं नसतं. बाजू दोघांनाही असते निशांत. कोण चूक, कोण बरोबर? ची उत्तरं सापेक्ष असतात. आताचा योग्य प्रश्न आहे. ‘ठीक आहे, हे घडलं, आता पुढे काय?’ फक्त शरीराभोवती फिरणारे दोन हजार वर्षांपूर्वीचे नैतिकतेचे नियम कवटाळून बसायचं की आजच्या परिस्थितीतून घटनांकडे वस्तुनिष्ठपणे पाहायचं?’’ दोघंही विचारात पडले.
‘‘तुमच्या या गोष्टीचे शेवट काय काय असू शकतात? सांग.’’ आज इरा थांबतच नव्हती.

‘‘पारंपरिक पर्याय १ : समाजाच्या भीतीने ते दोघं नाइलाजाने एकत्र राहिले, पण निशांतच्या मनातलं संशयपिशाच्च आयुष्यभर जागंच राहिलं. कृतिकाच्या डोळ्यांत चमक दिसतेय असं नुसतं वाटलं तरी तो बिथरायचा. तिचा अपमान करून अद्दल घडवत राहायचा.
पर्याय २ : निशांतच्या इच्छेप्रमाणे दोघं विभक्त झाले. तरीही ‘माझ्यात काय कमी होतं?’ हा प्रश्न निशांतला छळतच राहिला. घडल्या गोष्टीबद्दल कृतिका अपराधीभावातून कधीच बाहेर येऊ शकली नाही.

हेही वाचा : सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा

पर्याय ३ : आरोप सिद्ध न होताही आपण कृतिकाला शिक्षा दिली. याच्या अपराधीभावात निशांत आणि अन्याय,अपमानाच्या भावनेत कृतिका जळत राहिली.’’
इराचं म्हणणं निशांतला थोडं थोडं समजायला लागलं होतं. ती बोलतच होती. ‘‘बदलता काळ समजून घेतला तर आणखी पर्यायही असतात. काळ बदलला म्हणजे स्त्री-पुरुषांमधला मोकळेपणा वाढला, मानसिकता, भूमिका,अपेक्षाही बदलल्या म्हणजे नियम आणि गृहीतकंही बदलली पाहिजेत. तुमचा दोघांचा भूतकाळ, स्वभाव, बाँडिंग या सगळ्यांच्या पार्श्वभूमीतून ही ‘थोडीसी बेवफाई’ तुला प्रगल्भपणे समजून घेता येईल का? नाइलाज म्हणून नव्हे, दहा वर्षांच्या सहजीवनाच्या तुलनेत ते फक्त ‘काही क्षण’ आहेत हे समजून घेतलंस तर या अवघड वळणापलीकडे कदाचित एखादा अनोखा सुंदर प्रदेशही असू शकेल. तुमच्या आयुष्याची गोष्ट तुम्ही दोघांनीच लिहायची असते निशांत. आपला नवीन पर्याय तुम्हीच शोधायचा, निवडायचा.’’ इरा थांबली.

‘‘तू म्हणतेस ते स्वीकारायला अवघड आहे इरा, पण खरं आहे.’’ निशांत शांत झाला होता.
‘‘स्वत:ला योग्य प्रश्न विचारलेस तर सोपं होईल ते. तुमचं दोघांचं प्रेम फक्त शारीरिक होतं का? तिच्याऐवजी तुला मैत्रीण भेटली असती, तर संशयपिशाच कृतिकाच्या मानगुटीवर बसलं असतं. मग तिनं काय करावंसं वाटलं असतं तुला?’’
ओम न बोलता ऐकत होता. इराला जवळ घेत तो म्हणाला. ‘‘कृतिकाच्या निमित्ताने स्वत:चेही प्रश्न विचारलेस, आपल्याच नात्याकडे नव्याने पाहतोय मी.’’
आणि त्यातून बाहेर पडत निशांतचा हात त्याच्याही नकळत फोन शोधत होता…
neelima.kirane1@gmail.com