हिमालयाएवढं दु:खं उरी लपवून हसत हसत जीव लावणाऱ्या सुधांशूनं कायम मनात घर केलं होतं. त्या दिवशी एक गाणं सतत माझा पाठलाग करत होतं..
अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीतीऽऽ..
‘अशी पाखरे येतो आणिक स्मृती ठेवूनी जाती’.. दूरवर कुठेतरी हे गाणे वाजत होते नि माझे मन उदास झाले. घशात आवंढा दाटून आला. कशी ही दुसऱ्या प्रांतातली अनोळखी पाखरं आपल्याला जीव लावून उडून जातात! कायमचे घर करून आपल्या मनात! हे कसले ऋणानुबंध? काय नाव द्यावं या नात्याला?..
माझ्या एका मानलेल्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं. मुलीचे उच्च शिक्षण पुण्यात झालेले, कर्मभूमीही तीच. मध्यंतरी कंपनीने तिला प्रशिक्षणासाठी जपानला पाठवले. सहा महिने प्रशिक्षण झाल्यावर ती परत मायभूमीला परतली. मुलगी लग्नाळू झाली म्हटल्यावर नातेवाईक योग्य वर सुचवू लागले व एक योग्य जोडीदार निवडून तिचे लग्न ठरलेसुद्धा! आमचा खूप जवळचा कौटुंबिक संबंध होता व मुलीबरोबर लहानपणापासून जवळीक होती, त्यात भावाला सख्खी बहीणही नव्हती म्हणून घरात आत्या म्हणूनच मीच वावरत होते.
लग्नाला दोन दिवस असताना पुण्याहून तिच्या सहकाऱ्यांची गाडी आली. आल्यापासून पाहुणे जरा अंतर राखूनच होते, पण त्यातला एका मोठय़ा डोळ्यांचा, हसरा मुलगा मात्र जवळ येऊन मला म्हणाला, ‘‘आँटी, यू आर xxxx नो?’’ नंतर यांच्याकडे जात म्हणाला, ‘‘अंकल, ईफ आय अ‍ॅम नॉट मिस्टेकन यू आर xxxx नो?’’ प्रत्येकाला तो ओळखत होता. त्याची ती चेहऱ्याकडे पाहत राहून ओळख करून घेण्याची पद्धत पाहून आम्ही हबकून गेलो आणि आमच्यातले नवखेपण क्षणात मिटून गेले.
‘‘वेळोवेळी तुमचे फोटो मी कॉम्प्युटरवर बघत आलोय, तुमच्या फॅमिली गेटटुगेदरचे! अनघाने मला तुम्हा सर्वाबद्दल सांगितलं आहे आणि म्हणून मी तुम्हा सर्वाबद्दल सांगितलं आहे आणि म्हणून मी तुम्हा सर्वाना ओळखतो!’’ एवढं बोलून त्याने आमचं आश्चर्य शमवलं व आपलीही ओळख करून दिली.
‘तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं’ या उक्तीप्रमाणे त्याने सर्वाना एका झटक्यात आपलेसे करून टाकले. मुलांबरोबर मुलं, प्रौढांबरोबर प्रौढ व वृद्धांबरोबर आदराने, प्रेमाने वागून तो आमच्यातलाच एक झाला होता. अगदी बाजार करणाऱ्यांना सोबत करण्यापासून खरकटय़ा बश्या उचलण्याइतपत तो आमचा झाला होता. सगळ्यांच्या तोंडी त्याचंच नाव. शेवटी रात्री जेव्हा झोपण्यासाठी पुण्याचे पाहुणे राखीव असलेल्या हॉटेलमध्ये जाऊ लागले, तेव्हा घरातील मुलांनी आग्रह करून त्याला लग्नघरातच राहायला लावलं. रात्री बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. तोही उगाच आमच्याबरोबर बसून अल्बम चाळत राहिला. भाषा कळत नसल्यामुळे एखादा विनोद झाल्यावर कोणी त्याला काय झालं ते इंग्रजीत समजावून सांगितले की, तोही हसत आपल्या प्रांतातलं लग्न, तिथले रिवाज, त्याच्या भावाच्या लग्नात केलेली धमाल सांगून आम्हालाही हसवत होता.
त्याचं नाव होतं सुधांशू चटर्जी. मूळचा कोलकात्याचा. वडिलांची कपडय़ांची मोठी दोन-तीन शोरूम्स होती. तीन भावंडांत हा लहान म्हणून आपल्या पायावर उभा राहिला. अनघाबरोबर त्यालाही कंपनीनं जपानला पाठवलं होतं.
सकाळी घरातल्या मंडळींबरोबर उठून तो लग्नाचं सामान गाडीत घालू लागला. एव्हाना त्याला सर्वाची नावं माहीत झाली होती. लग्न लागलं. रिसेप्शन झालं, तेव्हा तो प्रेक्षकांत गप्प बसून होता. नंतर नवरी वरातीबरोबर जाऊ लागली, वातावरण एकदम कातर झालं. जड अंत:करणानं प्रत्येकजण निरोप देऊ लागला. वडिलांच्या गळ्यात पडून ती रडली, तेव्हा सगळ्यांचाच बांध फुटला. हुंदक्यांचे आवाज घुमले. तेव्हा हा कुठंच दिसला नाही. नंतर एका मुलानं त्याला वॉशबेसिनकडे पाहिल्याचं सांगितलं. त्याचे लाल झालेले डोळे व नाकाचा शेंडा पाहून मनात संशयाची पाल चुकचुकली. नंतर जे काही कळलं ते ऐकून मी सर्दच झाले. पण तो स्टेजवरचं अहेराचं सामानं निर्विकार चेहरा ठेवून गाडीत घालत होता. त्या चेहऱ्यामागं लपलेलं अनिवार दु:ख कोणालाच दिसलं नाही..
भाऊ सांगत होता; अनघाबरोबर जपानला गेला तेव्हा त्यानं अनघाची खूप काळजी घेतली. घरची आठवण येऊन अनघा रडायची तेव्हा तो तिचं मन रमवायचा. तिला काय हवं-नको ते बघायचा. जपानहून पाठवलेल्या प्रत्येक ई-मेलवर त्याचं कौतुक असायचं. होताच तसा तो! मनमिळाऊ, सुशील, देखणा, समजूतदार, कोमल हृदयी. त्याचं कौतुक वाचून आई-वडिलांनी ठरवलं की सरळ होकार द्यायचा. चांगला मुलगा आहे. मुलीची छान काळजी घेईल. आई-वडिलांना आणखी काय हवं? सरळ आशीर्वाद द्यायचा नि मोकळं व्हायचं! त्यानंही भारतात परतल्यावर आपल्या घरी हे सांगितलं.. पण कर्मठ विचारांचे वडील राजी होईनात. त्याने खूप गयावया केली, हातापाया पडला, रडला, पण त्यांना पाझर फुटला नाही. त्याला नोकरी सोडून धंदा पाहण्याचा सल्ला दिला. आईनं तर निक्षून सांगितलं की असं परप्रांतीय मुलीशी लग्न करणार असशील तर अगोदर माझी चिता पेटव, मग लग्न कर. अत्यंत पराभूत अवस्थेत तो परतला. मन घट्ट करून त्यानं सांगितलं की, आपल्या नशिबात एकत्र येणं नाही!
काळ गेला. दोघंही स्वत:ला सावरून जगात वावरू लागले. एक दिवस आपलं लग्न ठरल्याचं मनावर दगड ठेवून अनघानं त्याला सांगितलं. त्यानंही दुभंगलेलया मनाला सावरत ते ऐकलं. पण शेवटपर्यंत तो तिला सांभाळतच राहिला.. लग्नातदेखील! कुणालाच पत्ता लागू न देता हसरा मुखवटा चढवून तो राब राब राबला.. त्यांची ही अधुरी प्रेमकहाणी सगळ्यांनाच चटका लावून गेली.
तिसऱ्या दिवशी आम्ही प्रेझेंट्स उघडून पाहत होतो. सुधांशूचं प्रेझेंट उघडलं. सुंदर डबीत अनघाला केव्हातरी आवडलेली, नक्षत्र डायमंड्सची कानातल्यांची जोडी होती. इतक्यात टेलिपथी झाल्यासारखा फोन वाजला. पलीकडे सुधांशूच होता. सगळ्यांची नावं घेऊन चौकशी केल्यावर हळूच चाचरत म्हणाला, ‘‘आँटी.. अनघाचा फोन आला होता? कशी आहे? आनंदात आहे नां ती?’’ त्याचा आवाज कातर झाला होता. माझे अश्रू गालावर ओघळून आले. मी कसंबसं हो म्हणत फोन ठेवला.
हिमालयाएवढं दु:खं उरी लपवून हसत हसत जीव लावणाऱ्या सुधांशूनं कायम मनात घर केलं होतं. त्या दिवशी एक गाणं सतत माझा पाठलाग करत होतं..
अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीतीऽऽ
इथे सुरू होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यातील पाणी..
अनघा दूर जाताना गाडी दिसेनाशी होईपर्यंत दारात उभा राहिलेला सुंधाशू राहून राहून डोळ्यासमोर येत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog maza i did love but
Show comments