एका कुटुंबातली तरुणी, चिनू संध्याकाळी कामावरून परतलेली नाही. रात्रभर तिच्या प्रतीक्षेत असलेल्या तिच्या कुटुंबीयांच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मनात यादरम्यान काय काय येतं, याची समाजमन ढवळून त्यातून निघणाऱ्या कटू सत्याची गोष्ट म्हणजे दिग्दर्शक मृणाल सेन यांचा ‘एक दिन प्रतिदिन’ हा चित्रपट. या प्रश्नाला सामाजिक नैतिकतेचा जसा काच आहे, तसाच कौटुंबिक स्वार्थीपणा, असहाय्यतेचा करकचून टाकणारा वेढाही आहे. समाज म्हणून आपण कसे आहोत याचं अंतर्बाह्य दर्शन घडवणारा हा चित्रपट पाहायला हवा नोकरी करणारी एक तरुणी संध्याकाळी रोजच्या वेळी घरी परतत नाही. रात्र होते. उत्तरोत्तर वाढत जाते. तरीही तिचा पत्ता नाही..

ज्यांची यंदा जन्मशताब्दी सुरू आहे, असे अभिजात दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या ‘एक दिन प्रतिदिन’ या चित्रपटाची सुरुवात ही अशी होते. त्याआधी रोजसारखाच हाही एक दिवस, याचं सूचन करणाऱ्या एक-दोन सर्वसाधारण गोष्टी दिसतात. गल्लीबोळातून निघालेला सायकल रिक्षावाला, दंगा करत पोरांचा चाललेला खेळ, त्यात एका पोराचं पडणं, जखम होणं. पोरांनी त्याला त्याच्या घराशी नेणं, त्याच्या थोरल्या भावाने आणि बहिणीने त्याला घेऊन डॉक्टरकडे जाणं. केमिस्टच्या दुकानाच्या आतल्या भागातच दवाखाना. पोराला चारपाच टाके पडणं. मग सर्वाचं घरी येणं.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

आता ते चाळीतलं घर दिसणं आणि मग चाळीच्या वरच्या मजल्यापासून ते खालपर्यंत वाळत टाकलेली पातळं दिसणं आणि पाठोपाठ निवेदकाचे बोल कानावर पडणं.. ही चाळ, म्हणजे पूर्वीचा हा वाडा ब्रिटिशांच्या काळापासून चक्क दोनशे वर्ष इथे उभा आहे. या चाळीच्या मूळ मालकाचा अमुकतमुक पिढीतला तमका वारस आता मालक आहे. तो चाळभर आणि परिसरात फिरत देखरेख करतो आहे. या चाळीत दहा-बारा भाडेकरू बिऱ्हाडं आहेत. मालक सर्वात वरच्या मजल्यावर राहतो आहे. तात्पर्य काय, तर या चाळीला हा असा दोनशे वर्षांचा इतिहास आहे. इतिहास काय केवळ राजेरजवाडय़ांनाच असतो की काय? सामान्यांना नसतो? तर असा इतिहास असलेली ही चाळ आणि त्यातले भाडेकरू. त्यातल्याच कुटुंबातील- म्हणजे खेळता खेळता जखमी झालेल्या त्या मुलाच्या कुटुंबातली तरुणी म्हणजेच त्याची थोरली बहीण, चिनू संध्याकाळी कामावरून परतलेली नाही, त्याची ही गोष्ट आहे.

..तर तिचं मध्यमवर्गीय कुटुंब या परिस्थितीला कसं सामोरं जातं? शेजारपाजारचे लोक याकडे कसं पाहतात? हा या गोष्टीचा गाभा. म्हटलं तर ही कौटुंबिक पातळीवरची गोष्ट. जगात जेवढी कुटुंबं तेवढय़ा त्यांच्या गोष्टी. अगदी मेलोड्रामाच्या पुरेपूर शक्यता असलेली. या सर्वच गोष्टींना कौटुंबिक गोष्टींच्या सीमित अवकाशाच्या पलीकडच्या जगाचा संदर्भ असतो. तसाच तो इथेही शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या रूपात आहे. शिवाय नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडल्यामुळे जे काही सामाजिक प्रश्न उभे राहिले (की केले गेले?) तेही या कथेला- चित्रपटाला वेढून आहेत. म्हणजे त्या तरुणीचं काय झालं असेल या काळजीपेक्षा ती रात्रभर होती कुठे आणि करत काय होती, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. त्यातून केवळ सामाजिक पातळीवरची अवघी नैतिकताच ऐरणीवर येऊन ठेपलेली नाही, तर त्या कुटुंबाला त्याहून मोठय़ा समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. कुठली ही समस्या? घरातलं एकुलतं एक कमावतं माणूस असं बेपत्ता होणं, त्याच्या परतण्याच्या काही शक्यता न दिसणं. मग त्या कुटुंबानं जगावं कसं? त्यांच्या चरितार्थाचं काय? मग बेपत्ता झालेली व्यक्ती तरुण मुलगी का असेना..? हा चित्रपट आहे १९८० चा.

चिनूचं कुटुंब सात जणांचं. निवृत्त वडील, तुटपुंज्या मिळकतीत संसाराचा गाडा रेटत मेटाकुटीला आलेली आणि म्हणून सतत चिडचिड करणारी आई, चिनूच्या पाठोपाठ लग्नाला आलेली धाकटी बहीण, नोकरीधंदा नसणारा बेकार भाऊ आणि दोन शाळकरी भावंडं. चिनूची धाकटी बहीण लग्नाची झालीय तर मग चिनूच्या लग्नाचं काय? धाकटी विचारतेच आईला, ‘‘केलास कधी दीदीच्या लग्नाचा विचार? केलीस स्थळं पाहायला सुरुवात?’’ आई करवादल्या सुरात म्हणते, ‘‘लग्न म्हणजे खर्च आला. सोननाणं, मानपान, सर्वच आलं. आणायचे कुठून एवढे पैसे?’’ ‘‘तेवढंच? की आणखी काही?’’ धाकटी पॉज घेते आणि मग म्हणते, ‘‘की ती लग्न करून सासरी गेली तर पुढे आपलं काय होईल ही भीती..’’ आईचा फक्त जळजळीत कटाक्ष. हा संवाद होतो त्याच रात्री, ज्या रात्री चिनू घरी परतलेली नाही. चित्रपटाची गोष्टच मुख्यत: त्या एका रात्रीची आहे.

वेळ पुढे पुढे सरकत राहते. घरातल्यांना आधी किंचितशी काळजी. पण खरं तर राग, संतापच. अर्थातच चिनूच्या या अशा ‘बेजबाबदार’ वागण्याचा. ती न येण्याचं कारण समजून न घेता परस्परच सारं ठरवलेलं. एकतर्फा खटला. आरोपी चिनू!

शेजाऱ्यापाजाऱ्यांना वरवरची काळजी, बाकी सारं गॉसिपच. ‘काय बाई हल्लीच्या पोरी तरी! रात्रभर घराबाहेर राहायचं म्हणजे?’ यात एक महत्त्वाचं पात्र आहे आणि ते म्हणजे सतत पहारा देत असल्यासारखा वावरणारा, भाडेकरूंना सतत तुच्छ लेखणारा आणि संधी शोधून पाणी आणि विजेच्या अतिवापरावरून सुनावणारा घरमालक. तो तर चित्रपटाच्या शेवटी चिनूच्या खटल्याचा निकाल देऊन मोकळाच होतो.

चाळीत एकच असा भाडेकरू आहे ज्याला या कुटुंबावर कुठला प्रसंग ओढवलाय याची जाणीव आहे. तो तत्परतेने मदतीला पुढे होतो. त्याआधी चिनूची धाकटी बहीण चाळीसमोरच्या दुकानात जाऊन चिनूच्या ऑफिसात फोन लावते. कुणी उचलत नाही. ऑफिस बंद झालेलं असतं. चिनूचा भाऊ मित्राच्या सोबतीने पोलीस ठाणं गाठतो. पोलीस तक्रार नोंदवून घेतात, पण तुम्हीही जमेल तिथे शोध घ्या, असं बजावून सांगतात. हॉस्पिटल्समधल्या अपघाताच्या केसेस पाहा, शवागारात जा, असेही सल्ले देतात. भाऊ सर्वत्र शोध घेत राहतो. मध्यरात्री पोलिसांकडूनच अपघातात मृत पावलेल्या एका तरुणीचा मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये आल्याचं कळवण्यात येतं. भावाबरोबर वडीलही निघतात. सोबत तो शेजारी. तिथे आणखी काही लोक आलेले. त्यांच्याही घरातली मुलगी हरवलेली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी या सर्व कुटुंबीयांची वरात निघते. पण तो मृतदेह चिनूचा नसतो. आता कुठे शोधायचं.?

..आणि पहाटे अचानक चिनू घरी परतते. कसं होतं स्वागत तिचं? जो तो तिच्याकडे एक कटाक्ष टाकत दूर जातो. कुठे होतीस? काय झालं? तू बरी आहेस ना? असं कुणी कासाविशीनं तिला जवळ घेऊन विचारत नाही. खरं तर कुणी काहीच बोलत नाही. कशामुळे हे असं होतं त्यांचं? आणि मग ते सारं चिनूच्याच तोंडून धाकटय़ा बहिणीशी बोलताना येतं. ‘‘विचारलं कुणी मला काही? केली कुणी चौकशी? जो तो नजर फिरवून दूर गेला. मीच काय तो गुन्हा केलाय असा सर्वांच्या नजरेत भाव. माझ्याकडे होतं काही तरी सांगण्यासारखं. पण विचारलं, बोललं कुणी काही?’’ ती बोलत राहाते. त्यातून, काही वेळापूर्वी धाकटी आईशी बोलली होती त्याचं सूचन होत राहतं. तीच भीती.. आता आपलं काय होणार?.. हाच प्रश्न महत्त्वाचा ठरतो प्रत्येकासाठी. हिचं काय झालं असेल? ही कुठे अडकून पडली? कशामुळे? कुणालाच त्याचं सोयरसुतक नाही. आणि याच वेळी चाळीचे मालक आरडाओरडा करत येतात. याआधीही ते येऊन गेलेत. रात्र बरीच सरून गेलेली असताना चिनूच्या घरात तर दिवे जळत असतातच, परंतु काही शेजाऱ्यांच्या घरातही दिवे चालू असतात. जिन्यातले आणि मुख्य दरवाजातलेही दिवे पेटलेले असतात. त्यावरून चाळकऱ्यांना सुनावण्यासाठी तेव्हा ते येऊन गेलेले असतात. परंतु आता त्यांनी वेगळाच पवित्रा घेतलाय. चिनूच्या दारात येऊन ते प्रचंड आरडाओरडा करीत बोलत सुटलेत, ‘‘उद्याच्या उद्या खोली खाली करून इथून निघून जा. इथे सभ्य माणसं राहातात.’’ सभ्य माणसं? कुणालाच काही वाटत नाही. संतापलेली चिनू मात्र धावून जाते, परंतु तिची बहीण तिला अडवते. पकडीतून सुटण्याचा चिनू आटोकाट प्रयत्न करते. पण पकड घट्ट असते. त्यात कुठे तरी ‘झाली एवढी शोभा पुरे झाली, पुढे होऊन ती वाढवू नकोस’ असाच भाव असतो. कारण चुकलंय कोण, तर चिनू. घरमालक काय की आणखी कुणी काय काय बोलणारच..

अखेपर्यंत चिनूला काही सांगण्या-बोलण्याची सोयच कुणी ठेवत नाही. ती रात्रभर कुठे होती ते कळतच नाही. ना घरातल्यांना, ना शेजाऱ्यापाजाऱ्यांना.. आणि अर्थातच ना चित्रपट पाहणाऱ्यांना! बहुधा कथा, पटकथा लेखकाला- इतकंच काय दिग्दर्शकालाही ते माहीत नसावं. नसेलच. मात्र जे काही कळतं ते फार मोठं सामाजिक सत्य असतं! किंबहुना तीच गोष्ट असावी, नव्हे आहे!

एकोणीसशे साठनंतरच्या काळात प्रायोगिक रंगभूमीवरच्या अनेक नाटकांत, तसंच समांतर धारेतल्या चित्रपटांत ठोस शेवट दाखवला जात नाही, अशी काहींची तक्रार असायची. खरं तर तिथेही तो असायचा. ‘एक दिन प्रतिदिन’मध्येही आहेच. परंतु ही अशी तक्रार करणाऱ्यांना जो आणि जसा हवा असतो तसा हा शेवट नसतो. उदाहरणार्थ, चिनू रात्रभर घराबाहेर राहिली ते दाखवलंत, पण ती होती कुठे, काय करत होती ते न सांगताच चित्रपट संपवला हा काय शेवट झाला? चित्रपट सुरू होऊन संपतो, परंतु प्रेक्षकांच्या मनाशी एक आणि एकच प्रश्न उरतो. ‘चिनू होती कुठे रात्रभर?’ म्हणजे गोष्ट काय होती त्याकडेच पूर्णत: दुर्लक्ष!

असा प्रश्न विचारणारा प्रेक्षक केवळ प्रेक्षक राहात नाही तर तो येताजाता तमाम गोष्टींचा सामाजिक न्यायनिवाडा करणाऱ्या समाजाचा प्रतिनिधी बनतो. त्या प्रक्रियेत तो, समोरचा माणूस, एखादी कलाकृती किंवा जगातल्या इतर अनेक गोष्टी आपल्याला काय सांगू पाहात आहेत, हेच लक्षात घेत नाही. एक साधं उदाहरण घ्या, एखाद्या नास्तिक माणसाने देव आहे-नाही असं बोलायला सुरुवात केली ना केली त्याच्या आतच आस्तिक माणूस तडकतो. देवाविषयी तो काहीही भलतंसलतं ऐकून घेत नाही. मग बोलणारा आस्तिकाच्या श्रद्धेचा मान ठेवत बोलला तरी. कारण त्याच्या धारणा पक्क्या असतात. तिथे तर्क, रॅशनल विचार वगैरे गोष्टींना थारा नसतो. अशा ठोस धारणा असणारी माणसं सर्वच क्षेत्रांत असतात. मुद्दा इतकाच, की मग अशी माणसं, असा समाज वेगळय़ा नजरेने भोवतालाकडे पाहात नाही. चिनू रात्रभर कुठे होती, काय करत होती किंवा अगदी कोणाबरोबर होती ही गोष्टच नाही या चित्रपटाची! तर एक तरुणी जर एक रात्र घराबाहेर राहिली तर कुणाकुणाच्या मनात काय काय येतं त्याची ही गोष्ट आहे. समाज आणि समाजमन याच्या आत डोकावून पाहणारा हा चित्रपट आहे. तो आपल्यासमोर आरसा धरतो आणि आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत, समाज म्हणून कसे आहोत याचं आपल्याला अंतर्बाह्य दर्शन घडवतो. अतिशय साधी, सोपी मांडणी. तितकीच सरळसाधी शैली हे या चित्रपटाचं खास नोंदण्याजोगं वैशिष्टय़! आरंभी एक घटना दाखवायची आणि ती उलगडून दाखवत एक वेगळंच वास्तव रेखाटत जायचं, असं हे नॅरेटिव्ह आहे. अकिरा कुरोसावा यांच्या ‘राशोमान’ या चित्रपटामध्ये शेवटी धर्मगुरू म्हणतो, ‘‘आपल्याला आपला आत्मा आरशात पाहता येत नाही.’’ इथे ‘एक दिन प्रतिदिन’मध्ये ती सोय आहे.

यासंदर्भात ओशो यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. एक साधू आपल्या तरुण शिष्यासह प्रवास करत असतो. वाटेत नदी लागते. तिथे एक स्त्री असते. ती पुढे आलेल्या साधूला विनंती करते, की मला नदीपल्याड घेऊन चला. साधू दुर्लक्ष करतो. नदीत उतरतो. ती स्त्री शिष्याला विनंती करते. तो तिला उचलून घेतो आणि पल्याड नेऊन सोडतो. दोघे पुढल्या प्रवासात असताना साधू म्हणतो, की तू त्या स्त्रीला उचलून घेतलंस ते मला आवडलेलं नाही. त्यावर शिष्य म्हणतो, ‘‘पण मी तर मघाशीच तिला खाली उतरवलं!’’

ashma1895@gmail.com