संकेत पै
खुशियाँ बाँटने से बढती हैं’ हे जाहिरातीतून लोकप्रिय झालेलं वाक्य, मात्र खरोखरच जेव्हा आपण ते वाक्य आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणतो तेव्हा मिळणारी खुशीआनंद हा शब्दातीत असतो. पण हा आनंद देण्यातून आणि वाटण्यातूनच मिळतो हे सगळ्यांच्या मनापर्यंत कसं पोहोचवायचं?

‘आनंद’ या संकल्पनेत गेल्या काही शतकांमध्ये लक्षणीय बदल घडून आलेले आहेत. इंग्रजीतील Happy अर्थात आनंद या शब्दाचा उद्भव चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, याचा अर्थ होता ‘भाग्यवान’ किंवा ‘योगायोग’! सतराव्या शतकाच्या मध्यात थॉमस हॉब्ज या तत्त्वज्ञाने आनंदाची केलेली व्याख्या आजतागायत स्वीकारली जाते. त्याच्या म्हणण्यानुसार, ‘समस्त मानवजातीला सुख आणि समाधान मिळवण्याची ओढ असते, आणि ते कायमस्वरूपी मिळत राहावं यासाठी त्या अनुभवांच्या शोधात राहणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे आनंद!’

हॉब्जच्या मते, माणसाला सतत आनंदाच्या मागे धावायला लावणारी गोष्ट म्हणजे सुख आणि समाधान याची कधीही न शमणारी भूक! ती फक्त वाढत राहते. मग ती भूक स्थावर मालमत्तेची असो, सत्तेची असो, समाजात मानमरातब मिळवण्याची असो किंवा आनंद देणाऱ्या अनुभवांची असो! आनंदाच्या या व्याख्येचा उगम मात्र ‘आणखी हवे, आणखी हवे’ या न संपणाऱ्या हव्यासातून होतो. हा हव्यास आजही कायम आहे. भाग्य किंवा योगायोगाशी कोणे एके काळी असलेला त्याचा संबंध आता मात्र धूसर झालाय!

हल्लीच्या काळात विक्रेते आणि जाहिरातदारांनी या व्याख्येचा ग्राहकवर्गाला आकर्षित करून घेण्यासाठी पुरेपूर फायदा उचललेला आहे. असे समजते की, ‘अॅमेझॉन’च्या ‘फेस्टिव्ह सेल’ची २०१९ मधली एकूण उलाढाल होती एकोणीस हजार कोटी, आणि २०२३ मध्ये ती जाऊन पोहोचली नव्वद हजार कोटींपर्यंत! म्हणजे जवळपास चारशे टक्के वाढ! ‘अॅमेझॉन’ची स्पर्धक असलेल्या ‘फ्लिपकार्ट’च्या वेबसाइटवर २०२३च्या ‘फेस्टिव्ह सेल’ला एकशे चाळीस कोटी लोकांनी ‘व्हिजिट’ केल्याची नोंद आहे. सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात असणं या माणसाच्या स्वभावाचा फायदा विक्रेते अगदी अचूक घेतात. वस्तूंची किंमत एकदम कमी करणं, ‘एंड-ऑफ-सिझन’च्या नावाखाली भरघोस सूट देणं, सणावारांच्या निमित्तानं काही नवीन सवलतीच्या योजना राबवणं अशा अनेक युक्त्या वापरून खरेदी-विक्री-नफ्याचं चक्र त्यांना अव्याहत सुरू ठेवायचं असतं. कारण हल्ली आनंदाचा थेट संबंध आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंचा संग्रह करण्याशी लावला जातोय! याशिवाय ‘रिटेल थेरपी’सारखी एक नवीनच संकल्पना सध्या रुजू लागलीय! या संकल्पनेनुसार जास्तीत जास्त आनंदी राहण्यासाठीचा थेट मार्ग म्हणजे आपल्या आवडत्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी! या संकल्पनेला वेगवेगळ्या जाहिरातींमधून आणि ग्राहकवर्गाकडूनही उत्तेजन दिलं जातंय!

आनंदाच्या शोधात अथकपणे धावताना वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावर आपल्याला इतर लोकांचं जे वैभवशाली आणि चकाकणारं आयुष्य दिसतं, त्याच्याशी आपल्या आयुष्याची तुलना आपण आपोआपच करू लागतो आणि कधी कधी आपल्याला त्याबद्दल असूयाही वाटते. यामुळे आपल्या मनात कमतरतेची, अभावाची आणि असमाधानाची जाणीव मूळ धरू लागते. यातूनच आपल्याला त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं वाटण्याची, चांगलं दिसण्याची आणि चांगलं करण्याची गरज वाटू लागते. आजूबाजूचे लोक, परिस्थिती आणि इतर गोष्टींच्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्या सुखासाठी ज्या ज्या गोष्टी करतो त्यावर त्यांनी मान्यतेची मोहर उमटवली की आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं!

अनन्या आणि राज हे एका अत्यंत निसर्गरम्य गावात राहणारे मित्र-मैत्रीण! दोघांचीही आनंदाची व्याख्या अगदी वेगवेगळी. अनन्या आयुष्य अगदी मजेत, धमाल मस्तीत घालवणारी तरुणी. दिमाखदार सोहळ्यांची आणि समारंभांची आवड असणारी अनन्या कायम स्वत:मध्ये रमलेली. प्रत्येक सणासुदीला वेगळी साडी आणि मॅचिंग दागिने यांची तिची खरेदी ठरलेली असायची. त्यामुळे सातत्याने ती काही ना काही खरेदी करत राहायची. प्रत्येक वेळी नवीन काही घेतलं की, तिच्या आनंदाला उधाण यायचं, जणू काही दिवाळीतली फटाक्यांची आतषबाजीच! पण सणासुदीचे दिवस संपले की तिचा आनंदही मावळून जायचा, आणि मग हा आनंद पुन्हा मिळवण्यासाठी पुढच्या सणाची ती अगदी आतुरतेने वाट पाहत राहायची.

राजला मात्र रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टीतूनदेखील आनंद मिळायचा. गावकऱ्यांना मदत करणं, नदीच्या काठाने वृक्ष लागवड करणं, स्थानिक शाळेतल्या मुलांना शिकवणं, पाडवा, गणपतीसारख्या काही खास सणाच्या दिवशी मोठ्या संख्येने गावकऱ्यांना जेवू घालणं अशा सगळ्या गोष्टी करायला त्याला मनापासून आवडायचं. देण्यात, वाटून घेण्यात त्याला खरा आनंद मिळायचा! शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की त्याला समाधान मिळायचं, आपल्या कष्टाचं सार्थक झालं असं वाटायचं!

एकदा गावात पीक कापणीच्या वेळी मोठा समारंभ करायचं गावकऱ्यांनी ठरवलं. त्या वेळी आपल्या नवीन साड्यांनी आणि दागिन्यांनी सगळ्यांचे डोळे दिपवून टाकायचे, असं अनन्याने ठरवलं. त्यासाठी कित्येक आठवडे आधीपासूनच तिची लगबग सुरू झाली होती. सगळं काही अगदी ‘परफेक्ट’ असायला हवं असा तिचा अट्टहास होता. समारंभात तिने अगदी छान मिरवून घेतलं आणि तिच्या सुंदर दिसण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं लोकांनी कौतुकही केलं. पण जसा त्या समारंभाचा उत्साह ओसरला, तशी तिला एक प्रकारची पोकळी जाणवू लागली, जणू तिचा आनंद फक्त त्या क्षणांपुरताच होता.

राजचं मात्र संपूर्ण लक्ष त्या समारंभाकडे होतं. त्याने काही पारंपरिक पक्वान्नं बनवली आणि गावातल्या सगळ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. गावकऱ्यांशी गप्पागोष्टी करण्यात आणि सगळ्यांना त्यात सामावून घेण्यात त्याने त्याचा वेळ कारणी लावला. त्याची कृती अगदी साधीच होती, पण त्यामुळे गावात सगळ्यांना एकत्र आणणारं, खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं. त्याच्या कृतीच त्याला न संपणारा आनंदाचा अक्षय घडा भरूभरून देत होत्या. त्याचा हा आनंद लोकांच्या हास्यातूनही ठळकपणे दिसत होता. संपूर्ण गावातली लोकं एकत्र येऊन कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेत होते.

अनन्याने जेव्हा राजचं लोकांशी वागणं पाहिलं, त्यासाठीचे जाणीवपूर्वक केलेले कष्ट पाहिले तेव्हा तिचे डोळे उघडले. ती जसजसा खोलवर विचार करू लागली, तसतसं तिच्या लक्षात येऊ लागलं की, नवीन साड्या आणि दागिने खरेदी करण्यात आनंद होताच, पण तो तात्पुरता आणि वैयक्तिक होता. त्यात दीर्घकाळ टिकणारं समाधान नाही. तिचा आनंद पूर्णपणे तिच्या लोकांकडून असलेल्या कौतुकाच्या, स्तुतीच्या अपेक्षा पूर्ण होण्यावर अवलंबून होता. याउलट, राजला मात्र समाजाप्रति असलेल्या करुणेतून, त्यापोटी आलेल्या समाधानातून लोकांना एकत्र आणण्यातून अक्षय आनंद मिळत होता.

राजकडून प्रेरणा घेत अनन्याने तिचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं की, चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर इतरांना तो देण्यातून, वाटून घेण्यातून आणि इतरांशी मनमोकळ्या संवादातून तो मिळू शकतो. गावातल्याच एका शाळेत तिने स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली, अनेक सामाजिक उपक्रमांत आणि गावच्या विकासकामात ती हातभार लावू लागली.

गुंतागुंतीच्या आधुनिक जीवनात मार्गक्रमण करत असताना खरा आनंद नक्की कशात सामावलाय याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणं महत्त्वाचं आहे. उपभोगवाद आणि इतर लोकांशी होणारी तुलना यामुळे अशा क्षणिक सुखाच्या मागे आपण लागतो. पण यातून ‘आणखी हवे’ ही वृत्ती बळावतच जाणार आहे.

अनन्या आणि राज या दोघांच्या सुखाकडे पाहण्याच्या परस्परविरोधी दृष्टिकोनांचा विचार करून पाहा. जे नवीन ते सर्व हवं आणि त्याचं प्रदर्शन करण्याच्या अनन्याच्या वृत्तीमुळे तिला तात्पुरता आनंद तर मिळाला पण चिरंतन नाही. राजच्या समाधानाचं मूळ मात्र लोकांप्रति असलेल्या संवदेनशीलतेत होतं, त्यातून घडणाऱ्या साध्या साध्या कृतीत, लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्यात होतं. हे समाधान दीर्घकाळ टिकून राहिलं ते लोकांशी असणाऱ्या रोजच्या संवादामुळे आणि सामाजिक कामांना होईल तितका हातभार लावण्यामुळे.

असं सांगतात की, एकदा गौतम बुद्धांकडे एकाने मागणी केली, ‘‘मला आनंद हवाय!’’ यावर गौतम बुद्ध उत्तरले, ‘‘आधी यातला ‘मला’ हा शब्द काढून टाक, त्यानंतर ‘हवाय’ हा शब्द काढून टाक, मग उरतो तो केवळ आनंद!’’ यातला ‘मला’ हा शब्द अहंकार निदर्शक आहे. यामुळे स्वत:चं महत्त्व अनाठायी वाढतं. ‘हवाय’ या शब्दातून इच्छा दिसून येते आणि ‘सुख ही प्राप्त करण्याची गोष्ट आहे’ अशी आपली धारणाही दिसून येते.

आपल्या आयुष्यातसुद्धा आपण हे पडताळून पाहायला हवं की ‘आणखी हवं’च्या दुष्टचक्रात आपण अडकून पडलोय का? देण्यात, वाटून घेण्यात आणि इतरांशी जुळवून घेण्यात खुल्या मनाने आनंद शोधायची आपली तयारी आहे का? स्थावर मालमत्ता गोळा करण्यातून आपण तात्पुरता आनंद मिळवतोय की पुरून उरणाऱ्या समाधानाचे, आनंदाचे अधिक सखोल आणि अर्थगर्भ स्राोत आपण निर्माण करतोय?

इतरांच्या कल्याणासाठी, त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या मागे उभं राहणं यात खरा आनंद आहे. हे राजला आयुष्याच्या तारुण्याच्या टप्प्यावरच कळलं. दीर्घकाळ टिकणारा आनंद हा आतून जाणवतो आणि आपण आपल्या भोवतालाशी जितकं सहजतेने जुळवून घेऊ तितकं ते अधिक वाढत जातं.

भारतीय संस्कृतीबरोबरच इतर अनेक संस्कृतींमध्येसुद्धा अशी मान्यता आहे की वाटून घेण्याची वृत्ती आणि औदार्य यामुळे तुमच्या आनंदात भर पडते. ‘खुशियाँ बाँटने से बढती हैं’, ‘आनंद वाटल्याने वाढतो’ या संकल्पनेतून खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा आपल्या भारतीय जीवनमूल्यांमध्ये जोरदार पुरस्कार केलेला पाहायला मिळतो. या विचारधारेतून सुख हे भौतिक मालमत्तेवर अवलंबून नसून ते देण्यात आणि इतरांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात आहे यावर ठळकपणे प्रकाश टाकला जातो.

आपल्या जीवनप्रवासाचा विचार करताना तुमचं लक्ष कधीही न संपणाऱ्या हव्यासावरून नातेसंबंध जोपासण्यावर, इतरांना मदत करण्यावर आणि यातून आपल्या दैनंदिन जीवनात समाधानाचे क्षण शोधण्यावर केंद्रित करा. असं केल्याने तात्पुरत्या आनंदाचा आभास निर्माण करणाऱ्या भौतिक गोष्टींपेक्षा अधिक खोलवर, दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि तुमचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या आनंदाचा कदाचित तुम्हाला शोध लागेल!

sanket@sanketpai.com