‘रिकामटेकडी’ हा पूनम सिंग-बिष्ट यांचा लेख (४ जानेवारी) वाचला. हल्लीची तरुण पिढी ‘वर्कोहोलिक’ आहे आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासाठी ‘अल्कोहोलिक’ही होत चालली आहे याची चिंता वाटते. ‘निवांत’ आणि ‘एकांत’ हे दोन शब्द हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात गायब झाल्याचे जाणवते. कोणाशी साधे बोलायचे असले तरी ‘तुम्हाला दोन मिनिटे वेळ आहे का?’ असा प्रश्न विचारावा लागतो. परदेशी (कॉर्पोरेट) कंपन्यात ‘जीम’ व दोन-तीन बेडची रेस्टरूम व्यवस्था केल्याचे बघितले आहे. तुम्ही जर १० मिनिटे शवासन (सुखासन) केलेत तर पुढचे ३-४ तास तुमच्या कामाचा काळ-काम-वेग (परफॉर्मंन्स)वाढतो असे सिद्ध झाले आहे. आवड आणि निवड ही ‘सवड’ दिल्यावरच सुचतात हे लक्षात घ्यायला हवे. स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर १० मिनिटे डोळे मिटून नुसते बसले तरी महत्त्वाच्या गोष्टींची आठवण होते किंवा सुचतात. ५ मिनिटांची तंद्री किवा डुलकी तुम्हाला ताजेतवाने करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– श्रीनिवास स. डोंगरे, दादर

असीम आनंद अनुभवतोय

पूनम सिंग बिष्ट यांच्या लेखाची मांडणी आवडली, पण ‘रिकाम टेकाडे’पणाची संकल्पना म्हणजे आपल्या राहून गेलेल्या छंदाची/ गोष्टीची जोपासना करणे अजिबात नाही. ‘डोल्से फार नियांते’ (dolce far niente) म्हणजे अगदी शांत, काहीही न करता निवांत बसून राहाणे. खरं तर आनंद देणाऱ्या आळशीपणाचा अनुभव खरंच तुमचं मन ताजेतवानं, उत्साहित आणि प्रचंड ऊर्जावान बनवतं. मला ही दिक्षा एका व्यक्तीने एका बगिच्यामध्ये दिली. निवृत्त वरिष्ठ नागरिक संध्याकाळी बागेत येऊन राजकारण किंवा एखाद्या तत्सम विषयावर तावातावाने चर्चा करत असताना, ही व्यक्ती बागेच्या एका बाकावर थंडपणे, हाताची घडी घालून डोळे सताड उघडे टाकून (मिटले म्हणजे तुम्ही झोपलात) बसून असायची. कसलीही हालचाल नाही, कसलाही जप पुटपुटणारी ओठांची हालचाल नाही. काही नाही. नि:शब्द सभोवताल निरखत, पण त्याबाबतचा कोणताही विचार मनात येऊ न देता तासनतास फक्त हाताची घडी घालून बसून रहाणे म्हणजे ‘रिकामटेकडेपणा’. मी या आळशीपणातून मिळणारा असीम आनंद गेले कित्येक वर्षे नियमितपणे अनुभवतो आहे. प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला हवा.

– अॅड. एम आर सबनीस, अंधेरी

समर्थ लेखणीतील ऊर्जायात्रा !

४ जानेवारीच्या अंकातील डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा लेख वाचला. वैफल्यग्रस्त शेतकरी, शैक्षणिक क्षेत्रांतील ताणतणावाची प्रचंड चढाओढ, आयटी क्षेत्रातील प्रचंड पगार वाढीने आलेली व्यसनाधीनता, विलक्षण वेगाने वाढणारी बेकारी, पौष्टिक अन्नाअभावी व वेळेवर उदरभरण न करण्यामुळे व्याधींच्या आहारी जाणारी आजची तरुणाई, नवतरुणांच्या आतताई समजुतींमुळे होणारे घटस्फोट, या संघर्षातून दु:खाचे चटके खाणारे कलियुगातील समाजमन, सध्या वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे. या सर्वांना ऊर्जा देऊन, योग्य मार्गस्थ करणारे, नाडकर्णींच्या समर्थ लेखणीतून मार्गदर्शन करणारे लेख यांतून प्रसिद्ध होणार असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण ठरणार आहे. भविष्यात ही लेखमाला निश्चितच स्वागतार्ह ठरणार आहे.

– प्रदीप करमरकर, ठाणे</p>

अप्रतिम सदरांची झलक

नवीन वर्षाची (४ जानेवारी) ‘चतुरंग’ पुरवणी हातात पडताच पुढील वर्षभरात मिळणाऱ्या अप्रतिम सदरांची झलक पाहायला मिळाली. डॉ. आनंद नाडकर्णी यांची ऊर्जायात्रा मनाला उभारी देणारी आहे तसेच अॅड. रंजना पगार – गवांदे यांचा लेख वाचून पुरोगामी महाराष्ट्राचे भीषण वास्तव नजरेसमोर आले. स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या लेखिका अॅड. रंजना पगार – गवांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून सलाम.

– शुभांगी पवार

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang padsad loksatta readers response letteramy