मधुचंद्राचे दिवस पुढे कायम राहणारे नसणं हा त्या नातेसंबंधाचा स्वाभाविकपणा आहे. सगळं काही मधुचंद्रानंतर बदलून जातं. आतापर्यंत ज्या प्रकारची स्वप्नं पाहिली होती त्याचं खरं स्वरूप काही
दिवस गेल्यानंतर स्पष्ट व्हायला लागतं. कारण ती फक्त स्वप्नंच असतात; सत्यस्वरूप त्यात काहीच नसतं. पण हे समजून न घेतल्यामुळे दोघंही निराश होतात, ते नैराश्य दोघंही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात आणि ‘भांडण’ हा स्थायीभाव
होऊन बसतो.
परंतु या नरकसमान परिस्थितीलासुद्धा सगळे स्त्री-पुरुष आयुष्यभर चिकटून राहतात. त्या चिकटण्याचं कारण म्हणजे एकाकीपणाची भीती. एकाकीपणापेक्षा.. दु:खी का असेना पण बरोबर कोणी तरी असणं ही गरज असते. या एकाकीपणाची एवढी भीती तरी का वाटते? तर एकटेपणात स्वत:ला स्वत:शी सामना करावा लागतो. जोपर्यंत तुम्ही ध्यानधारणेत उतरत नाही. तुमचा एकाकीपणा हा एकटेपणात परिवर्तित करीत नाहीत, स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहात नाही. तोपर्यंत यातनामय का असेना पण त्याच जीवनाला तुम्ही चिकटलेले राहता.. ही खरी अडचण!
तुम्हा मंडळीचं सांत्वन करणं मला आवडत नाही.. गोष्टी फारच कडवट होत चालल्या आहेत असं माझ्या ध्यानात आलं तर सरळ वेगळं राहण्याचा मी सल्ला देता. वेगळे होताना शांतपणे, एकमेकांविषयी आदर बाळगून, शत्रुत्व न राखता वेगळे व्हा.. म्हणजे निदान तुम्ही एकमेकांचे मित्र तरी राहाल. म्हणूनच एकमेकांचा तिरस्कार न करता वेगळे व्हा.. कारण एक लक्षात घ्या. ज्या व्यक्तीवर तुम्ही एकेकाळी जीव तोडून प्रेम केलेलं असतं ती व्यक्ती अगदी तिरस्काराला पात्र तरी होऊ नये. परंतु तुम्ही, अगदी आहे त्या परिस्थितीला चिकटूनच राहायचं म्हणाल तर मात्र प्रेम नष्ट होऊन जाईल, सगळे सुंदर क्षण विसरले जातील फक्त दु:ख- दु:ख आणि दु:खच आठवत राहील आणि नंतर मग प्रेमाचं रूपांतर तिरस्कारात होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट विषासमान वाटायला लागेल. नंतर मग वेगळे होताना तुम्ही एकमेकांबद्दल आदर राखून वेगळे होऊ शकणार नाही आणि नंतर एकमेकांचे मित्रही होऊ शकणार नाही. अविचारी माणसाला माझ्या या कल्पनेचा राग येईल. कारण कुणालाही असं वाटू शकतं की मी तुम्हाला मोडतोड करण्यासाठी भाग पाडतोय म्हणून; परंतु तुम्हालाच कळेल की वेगळे झाल्यानंतर आपण जास्त आनंदी झालो आहोत.
– ओशो
(मेहता पब्लिशिंग हाऊसच्या ‘स्वत:चा शोध-ओशो’ अनु. प्रज्ञा ओक या पुस्तकातून साभार)

Story img Loader