अरुणा अंतरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, हे एक प्रसिद्ध कविवचन, तर ‘प्रेमात मरणं सोपं आणि जगणं महाकठीण’, हे दुसरं कविवचन, अधिक वास्तव आणि नात्यातली तडफड व्यक्त करणारं. प्रेमातल्या मरणाभोवती एक रोमँटिक वलय आहे, झगमग (ग्लॅमर) आहे. दिव्यता, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीदेखील आहे. ज्यांच्या कथा आजही आवडीनं वाचल्या जातात, ते प्रेमी मृत्यूला कवटाळूनच अमर झाले आहेत. हा विरोधाभास खरा, पण हेच सत्य आहे; पण जे कर्तव्याशी बांधील आहेत म्हणून मरणाचा विचारसुद्धा करायला मोकळे नाहीत, ज्यांचा विवाह होण्याची शक्यता संपली आहे आणि तरीही रोज ज्यांना एकमेकांबरोबर असण्याची सक्ती आहे, त्यांचं काय होत असेल?.. असे अभागी प्रेमी रोजच मरणाची वाट चालत असतील? रोजच अग्निपरीक्षा देत असतील? ती देण्याची वेळ येते, तेव्हा परक्या गावात एकटी राहणारी एक अविवाहित तरुणी या सर्वस्वी कल्पनातीत परिस्थितीचा कसा सामना करते याची ‘अजीब दास्ताँ’, ‘दिल अपना और प्रीतपराई’ हा चित्रपट सांगतो.

डॉ. सुशील वर्मा (राजकुमार) आणि त्याची नायिका करुणा (मीनाकुमारी), दोघंही खऱ्याअर्थानं वेगळी आहेत आणि विशेष म्हणजे तितकीच साधी आहेत. आपला वेगळेपणा मिरवणं राहिलं दूर; त्यांना त्या वेगळेपणाची जाणीवदेखील नाही. आपल्याला मात्र तिचं आगळेपण तिच्या पहिल्यावहिल्या दर्शनातच लक्षात येतं. उत्तर प्रदेशातल्या एका छोटय़ा गावातून ही मध्यमवर्गीय तरुणी नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी शहरातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये येते, एकटीच. तिच्याजवळ आहे एक छोटीशी बॅग अन् ताठ मान! या चित्रपटाचा काळ आणि त्या वेळीची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, तिचं एकटं येणं ही अप्रूपाचीच घटना होती. सहाव्या दशकाच्या त्या काळात मध्यमवर्गीय स्त्रियाकॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागल्या होत्या; पण पदवी मिळवल्यावरसुद्धा नोकरी करत नव्हत्या. स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता या शब्दांचा उच्चारही होत नव्हता. स्त्रियांबाबतचे सर्व निर्णय त्यांच्या घरातली पुरुष मंडळीच घेत होती. अशा काळात करुणा आर्थिक स्वावलंबनासाठी आपलं घरदार सोडून परक्या शहरात आली होती. तिच्यापाशी फक्त शालेय शिक्षण आणि नर्सिगच्या अभ्यासक्रमाची पदवी होती. तिला खरं म्हणजे तिच्या वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचं होतं; पण काळानं तिच्या स्वप्नांवरून नांगर फिरवला. करुणाचे आई-वडील हिरावून घेऊन त्यानं तिला कोवळय़ा वयात अनाथ केलं. हे दु:ख फक्त पोरकेपणाचं नव्हतं. तो शाप होता, कधीही न संपणाऱ्या एकटेपणाचा; पण त्या राक्षसी आघातानं करुणा कोलमडली नाही, की मुळुमुळु रडत बसली नाही. स्वत:च स्वत:ला सावरून ती आपल्या पायांवर उभी राहिली, मोठी झाली, शहाणी बनली, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागली. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचे पंख तिनंकातरले आणि नर्सिगच्याकोर्सला नाव घातलं. इथे तिनं पहिला क्रमांक पटकावला आणि त्याचं फळ म्हणून ती त्या मोठय़ा शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागली. करुणा हे तिचं नाव किती सार्थ आहे हे सिद्ध करत ती डॉक्टर आणि रुग्ण या सर्वाची मनं जिंकून घेते. कुणालाच न जुमानणारा एक नाठाळ आणि संतापी रुग्ण एकदा तिच्या चेहऱ्यावर औषध फेकतो; पण करुणा चिडत नाही, की त्या रुग्णाचे हात-पाय पकडून त्याच्या तोंडात औषध घालण्यासाठी वॉर्डबॉयची मदत घेत नाही. ती अगदी शांतपणे औषधाचा नवा ग्लास भरून त्या रुग्णाच्या हातात देते आणि म्हणते, ‘‘तुझं समाधान होईपर्यंत फेक माझ्या तोंडावर; पण तू औषध प्यायलाखेरीज मी इथून हलणार नाही.’’ तो त्रस्त समंध शांत होत होत एका दमात औषध पितो आणि त्याला चक्क हुंदका फुटतो. हिंदी चित्रपटात नर्स बऱ्याचदा पडद्यावर दिसली; पण बहुतेकदा‘सेन्सॉर’च्या नाकावर टिच्चून तंग, आखूड कपड्यातली बाई साळसूदपणे पडद्यावर दाखवता येते म्हणून!

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: त्या रात्री ती कुठे होती?

हॉस्पिटलच्या नोकरीत करुणाला श्रेयसभेटतं आणि प्रेयसदेखील- डॉ. सुशील वर्मा तिच्याचसारखाआदर्शवादी अन् प्रगल्भ आहे. रुग्णसेवा हा त्याचा धर्म आणि रुग्णालय हेच त्याचं जग अन् जीवन. त्या दोघांचं प्रेमदेखील त्यांच्याचसारखं निराळं. संयत, मितभाषी. त्यांच्या भेटीगाठींना चंद्र, चांदणं, बाग-बगिचे यांचा सहवास नाही. ते भेटतात रुग्णालयात आणि तेही कामाच्याच निमित्तानं; रात्रीअपरात्री एखादी इमर्जन्सी केस निपटल्यानंतर कॉफी पिण्यासाठी. ते संभाषणदेखील संक्षिप्त, काहीसंअवघडलेलं. प्रेम या शब्दाचा पुसटसा उच्चारही त्यात येत नाही. निसटत्या स्पर्शासाठी हातांची भेट होत नाही. तो तिला ‘कॉम्प्लिमेंट’ देतो, त्यालाही कामाचा संदर्भ असतो. अधूनमधून करुणा त्याच्या घरी चक्कर टाकते; पण त्याच्या आईच्या भेटीसाठी. तिच्या दुखऱ्या पायांना मालीश करण्यासाठी. घरकामात छोटीमोठी मदत करण्यासाठी. अशाच एखाद्या भेटीत एखादा गोड क्षण अवतरतो. ती त्याच्या शर्टाचं तुटलेलं बटण शिवून देते, तेव्हा दोघं प्रथमच झालेल्या स्पर्शानंसुखावलेली आणि तरीही संकोचलेली दिसतात. कधी तरी अवचित थट्टामस्करीचीअवखळ संधी मिळते. काश्मीरला निघालेली त्याची आई तिला विचारते, ‘‘तिथून काय आणू तुला?’’
‘‘काय मिळतं तिथे?’’ ती प्रतिप्रश्न करते. ‘‘काय मिळत नाही विचार!’’ तो उत्तरतो. ‘‘काश्मीर म्हणजे तर पृथ्वीवरचा स्वर्ग!’’
‘‘अच्छा?..स्वर्गात काय कायमिळतं?’’ तिचा स्वर मिश्कील असतो आणि नजरेत त्याला निरुत्तर केल्याचा खटय़ाळ विजयानंद! तो त्या नजरेत हरवून जातो आणि नजरेनंच पसंतीची पावतीही देतो. मात्र हॉस्पिटलच्या काळोख्या, दगडी भिंतींना न जुमानता फुटलेली ही प्रेमाची वेल अवकाळी पावसाच्या वादळी तडाख्यानं मान टाकते. सुट्टीसाठी काश्मीरला गेलेला सुशील लग्न करून परत येतो. त्याच्या पत्नीच्या गृहप्रवेशाचं दृश्य अपघाताने करुणाच्या नजरेला पडतं आणि ती हादरते; पण क्षणभरच! तिच्यातली कर्तव्यदक्षनर्स लगेच जागी होते आणि हातातला औषधाचा ट्रेहिंदूकळतो, पण खाली पडत नाही. गळय़ातदाटलेला हुंदका गिळून आणि डोळय़ात तरारलेला अश्रू परतवून करुणा पुन्हा कामाला लागते. डॉ. सुशीलदेखील काय घडलं, का घडलं याचा खुलासा करत नाही. ती तर त्याचं अभिनंदनदेखील करते. तोही ते सहजपणे स्वीकारल्यासारखं दाखवतो आणि आईनं तिच्यासाठी काय भेट आणली असेल ते ओळख म्हणून सांगतो, तेव्हा मात्र तिच्याच्यानं राहावत नाही. जीवघेणं कडूशार हसत ती विचारते, ‘‘भेट म्हणजे दुल्हन ना?..’’

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: ‘अस्तित्व’भान जागवताना..

या कठीण प्रसंगातून दोघांची सुटका करून घेण्यासाठी करुणा हॉस्पिटलमधून जाण्याचा निर्णय घेते; पण वेदनेच्या लिपीत लिहिलेला तिचा ललाट लेख उसळी खातो आणि त्या दोघांना काही ना काही निमित्तानं पुन:पुन्हा एकत्र आणतो. एका अपघाताच्या स्थळी दोघांना एक रात्र एकत्र काढण्याची वेळ येते, तेव्हा ती मन आवरते. यानंतर दुर्दैवाचे तडाखे वाढतच जातात. पावसात भिजलेला तो गंभीर आजारी पडतो आणि त्या भरात पत्नीच्या देखत करुणाचं नाव घेत आपलं मन उघड करतो. त्यामुळे बिथरलेली त्याची पत्नी (नादिरा) मग सोक्षमोक्ष करण्यासाठी करुणाला भेटीला बोलावते. तिला गाडीत बसवून थेट उलटतपासणी सुरू करते. करुणानं हॉस्पिटलच नाही, तर ते शहरच सोडून जावं, अशी धमकीवजा मागणी करते, तेव्हा करुणा ते मान्य करते; पण प्रामाणिकपणे सांगते, ‘‘मी त्याला कधीही भेटणार नाही हे मान्य करते; पण मी कुठेही गेले, तरी त्याला मी कधीही विसरू शकणार नाही.’’ हा अनपेक्षित जबाब ऐकल्यावर सुशीलची पत्नी चवताळते आणि गाडी थेट समुद्रात घालते. त्या वेळी करुणाच्या चेहऱ्यावर विलक्षण स्मित उमटतं.. मृत्यूला आलिंगन द्यायला निघालेलं स्मित.. दैवाशी निरंतर चाललेल्या लढाईतलं स्मित.

या लढाईत करुणा जिंकली की नाही हा सवालच उरत नाही. लक्षात राहतं, ते तिचं विलक्षण धैर्य. तिनं आपल्या जोडीदारावरचा हक्क सोडून दिला आहे; पण त्याच्यावर प्रेम करण्याचा हक्क सोडून द्यायला मात्र ती तयार नाही. रिकाम्या हातानं जगत आलेल्या करुणाला हे दु:ख मान्य आहे, पराभव मान्य आहे.. तरीही ती पहिल्यांदाच स्वत:च्या हक्कासाठी उभी राहते. स्वत:साठी काही तरी मागते. हाच हिंदी चित्रपटातला अपूर्व क्षण आहे! तोवर प्रेमाचे त्रिकोण आणि त्यातून कोणी तरी एकानं त्याग करून जाणं, हा शेवटचा मार्ग होता. जन्मापासून उन्हातच घर असलेल्या करुणाला असे चटके खाण्याची सवय आहे; पण परिस्थितीशी सामना न करता पाठ फिरवण्याची तिची तयारी नाही. वास्तविक जीवनात स्त्री-पुरुषांच्या संबंधांत असे संघर्ष नेहमीच येतात. त्या वास्तवाशी डोळे, नजर भिडवण्याची तयारी असलेला हा पहिला चित्रपट. त्यामुळेच पूर्णत: व्यावसायिक चौकटीत तयार झालेला, नाचगाणी आणि हास्यविनोदपेरणारा हा चित्रपट काळाच्या पुढे धावणारा धाडसी चित्रपट ठरला. त्याच्यानंतर ‘अर्थ’ या एकाच चित्रपटानं एकाच पुरुषाच्या प्रेमात पडलेल्या दोन स्त्रियांचा सामना दाखवण्याची हिंमत केली. प्रदर्शित झाल्यापासून चाळीस वर्षांनी ‘दिल अपना और प्रीतपराई’चा‘अरमान’ या नावानं‘रीमेक’ झाला. ही त्याच्या सर्वकालीनतेची पावती.

आणखी वाचा-पाहायलाच हवेत : कहाणी जीवनव्यापी मनोभंगाची

आर्थिक स्वावलंबनाच्या बळावर एकटेपण पेलून दाखवणाऱ्या त्याच्या नायिकेनं आपल्या मनाचं कणखरपणदेखील सिद्ध केलं. ते करणारी हिंदी चित्रपटाच्या इतिहासातली ती पहिली नायिका! जन्मत:च वाट्याला आलेलं एकटेपण सोबतीला घेऊन निर्भयपणे जगणारी ही नायिका ‘अजीब दास्ताँ हैं ये’ या तिचं मनोगत सांगणाऱ्या गीताप्रमाणेच मनात घर करून राहिली. चित्रपटातल्या एका प्रसंगात डॉक्टर समोर येतो, ते सहन न होऊन करुणा तिच्या मैत्रिणीचा हात गच्च आवळते. त्या हातावरच्या वळाप्रमाणेच करुणाची कहाणी आपल्याही मनात पुन:पुन्हा ठुसठुसत राहते. त्याचं एक कारण म्हणजे हा चित्रपट पडद्यावरच्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे, तसाच पडद्यामागेही तो स्त्रीशक्तीचा विजय आहे.

दोन स्त्रियांचा सामना दाखवणारा हा चित्रपट एक आठवडाही चालणार नाही, असं वाटल्यामुळे कमाल अमरोहींनी या चित्रपटावर निर्माता म्हणून आपलं नावही दिलं नाही; पण त्यांची पत्नी मीनाकुमारी हिनं हट्ट धरून तो प्रदर्शित करायला लावला आणि तिचे आडाखे बरोबर ठरले. दुसऱ्या दिवसापासून हा सिनेमा सलग दहा आठवडे तीनही खेळ ‘हाऊसफुल’ चालला. चित्रपटाच्या नायिकेप्रमाणे प्रेक्षकही काळाच्या पुढे चालू लागल्याची ती सुखद निशाणी होती!

(सदर समाप्त)

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, हे एक प्रसिद्ध कविवचन, तर ‘प्रेमात मरणं सोपं आणि जगणं महाकठीण’, हे दुसरं कविवचन, अधिक वास्तव आणि नात्यातली तडफड व्यक्त करणारं. प्रेमातल्या मरणाभोवती एक रोमँटिक वलय आहे, झगमग (ग्लॅमर) आहे. दिव्यता, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीदेखील आहे. ज्यांच्या कथा आजही आवडीनं वाचल्या जातात, ते प्रेमी मृत्यूला कवटाळूनच अमर झाले आहेत. हा विरोधाभास खरा, पण हेच सत्य आहे; पण जे कर्तव्याशी बांधील आहेत म्हणून मरणाचा विचारसुद्धा करायला मोकळे नाहीत, ज्यांचा विवाह होण्याची शक्यता संपली आहे आणि तरीही रोज ज्यांना एकमेकांबरोबर असण्याची सक्ती आहे, त्यांचं काय होत असेल?.. असे अभागी प्रेमी रोजच मरणाची वाट चालत असतील? रोजच अग्निपरीक्षा देत असतील? ती देण्याची वेळ येते, तेव्हा परक्या गावात एकटी राहणारी एक अविवाहित तरुणी या सर्वस्वी कल्पनातीत परिस्थितीचा कसा सामना करते याची ‘अजीब दास्ताँ’, ‘दिल अपना और प्रीतपराई’ हा चित्रपट सांगतो.

डॉ. सुशील वर्मा (राजकुमार) आणि त्याची नायिका करुणा (मीनाकुमारी), दोघंही खऱ्याअर्थानं वेगळी आहेत आणि विशेष म्हणजे तितकीच साधी आहेत. आपला वेगळेपणा मिरवणं राहिलं दूर; त्यांना त्या वेगळेपणाची जाणीवदेखील नाही. आपल्याला मात्र तिचं आगळेपण तिच्या पहिल्यावहिल्या दर्शनातच लक्षात येतं. उत्तर प्रदेशातल्या एका छोटय़ा गावातून ही मध्यमवर्गीय तरुणी नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी शहरातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये येते, एकटीच. तिच्याजवळ आहे एक छोटीशी बॅग अन् ताठ मान! या चित्रपटाचा काळ आणि त्या वेळीची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, तिचं एकटं येणं ही अप्रूपाचीच घटना होती. सहाव्या दशकाच्या त्या काळात मध्यमवर्गीय स्त्रियाकॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागल्या होत्या; पण पदवी मिळवल्यावरसुद्धा नोकरी करत नव्हत्या. स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता या शब्दांचा उच्चारही होत नव्हता. स्त्रियांबाबतचे सर्व निर्णय त्यांच्या घरातली पुरुष मंडळीच घेत होती. अशा काळात करुणा आर्थिक स्वावलंबनासाठी आपलं घरदार सोडून परक्या शहरात आली होती. तिच्यापाशी फक्त शालेय शिक्षण आणि नर्सिगच्या अभ्यासक्रमाची पदवी होती. तिला खरं म्हणजे तिच्या वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचं होतं; पण काळानं तिच्या स्वप्नांवरून नांगर फिरवला. करुणाचे आई-वडील हिरावून घेऊन त्यानं तिला कोवळय़ा वयात अनाथ केलं. हे दु:ख फक्त पोरकेपणाचं नव्हतं. तो शाप होता, कधीही न संपणाऱ्या एकटेपणाचा; पण त्या राक्षसी आघातानं करुणा कोलमडली नाही, की मुळुमुळु रडत बसली नाही. स्वत:च स्वत:ला सावरून ती आपल्या पायांवर उभी राहिली, मोठी झाली, शहाणी बनली, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागली. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचे पंख तिनंकातरले आणि नर्सिगच्याकोर्सला नाव घातलं. इथे तिनं पहिला क्रमांक पटकावला आणि त्याचं फळ म्हणून ती त्या मोठय़ा शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागली. करुणा हे तिचं नाव किती सार्थ आहे हे सिद्ध करत ती डॉक्टर आणि रुग्ण या सर्वाची मनं जिंकून घेते. कुणालाच न जुमानणारा एक नाठाळ आणि संतापी रुग्ण एकदा तिच्या चेहऱ्यावर औषध फेकतो; पण करुणा चिडत नाही, की त्या रुग्णाचे हात-पाय पकडून त्याच्या तोंडात औषध घालण्यासाठी वॉर्डबॉयची मदत घेत नाही. ती अगदी शांतपणे औषधाचा नवा ग्लास भरून त्या रुग्णाच्या हातात देते आणि म्हणते, ‘‘तुझं समाधान होईपर्यंत फेक माझ्या तोंडावर; पण तू औषध प्यायलाखेरीज मी इथून हलणार नाही.’’ तो त्रस्त समंध शांत होत होत एका दमात औषध पितो आणि त्याला चक्क हुंदका फुटतो. हिंदी चित्रपटात नर्स बऱ्याचदा पडद्यावर दिसली; पण बहुतेकदा‘सेन्सॉर’च्या नाकावर टिच्चून तंग, आखूड कपड्यातली बाई साळसूदपणे पडद्यावर दाखवता येते म्हणून!

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: त्या रात्री ती कुठे होती?

हॉस्पिटलच्या नोकरीत करुणाला श्रेयसभेटतं आणि प्रेयसदेखील- डॉ. सुशील वर्मा तिच्याचसारखाआदर्शवादी अन् प्रगल्भ आहे. रुग्णसेवा हा त्याचा धर्म आणि रुग्णालय हेच त्याचं जग अन् जीवन. त्या दोघांचं प्रेमदेखील त्यांच्याचसारखं निराळं. संयत, मितभाषी. त्यांच्या भेटीगाठींना चंद्र, चांदणं, बाग-बगिचे यांचा सहवास नाही. ते भेटतात रुग्णालयात आणि तेही कामाच्याच निमित्तानं; रात्रीअपरात्री एखादी इमर्जन्सी केस निपटल्यानंतर कॉफी पिण्यासाठी. ते संभाषणदेखील संक्षिप्त, काहीसंअवघडलेलं. प्रेम या शब्दाचा पुसटसा उच्चारही त्यात येत नाही. निसटत्या स्पर्शासाठी हातांची भेट होत नाही. तो तिला ‘कॉम्प्लिमेंट’ देतो, त्यालाही कामाचा संदर्भ असतो. अधूनमधून करुणा त्याच्या घरी चक्कर टाकते; पण त्याच्या आईच्या भेटीसाठी. तिच्या दुखऱ्या पायांना मालीश करण्यासाठी. घरकामात छोटीमोठी मदत करण्यासाठी. अशाच एखाद्या भेटीत एखादा गोड क्षण अवतरतो. ती त्याच्या शर्टाचं तुटलेलं बटण शिवून देते, तेव्हा दोघं प्रथमच झालेल्या स्पर्शानंसुखावलेली आणि तरीही संकोचलेली दिसतात. कधी तरी अवचित थट्टामस्करीचीअवखळ संधी मिळते. काश्मीरला निघालेली त्याची आई तिला विचारते, ‘‘तिथून काय आणू तुला?’’
‘‘काय मिळतं तिथे?’’ ती प्रतिप्रश्न करते. ‘‘काय मिळत नाही विचार!’’ तो उत्तरतो. ‘‘काश्मीर म्हणजे तर पृथ्वीवरचा स्वर्ग!’’
‘‘अच्छा?..स्वर्गात काय कायमिळतं?’’ तिचा स्वर मिश्कील असतो आणि नजरेत त्याला निरुत्तर केल्याचा खटय़ाळ विजयानंद! तो त्या नजरेत हरवून जातो आणि नजरेनंच पसंतीची पावतीही देतो. मात्र हॉस्पिटलच्या काळोख्या, दगडी भिंतींना न जुमानता फुटलेली ही प्रेमाची वेल अवकाळी पावसाच्या वादळी तडाख्यानं मान टाकते. सुट्टीसाठी काश्मीरला गेलेला सुशील लग्न करून परत येतो. त्याच्या पत्नीच्या गृहप्रवेशाचं दृश्य अपघाताने करुणाच्या नजरेला पडतं आणि ती हादरते; पण क्षणभरच! तिच्यातली कर्तव्यदक्षनर्स लगेच जागी होते आणि हातातला औषधाचा ट्रेहिंदूकळतो, पण खाली पडत नाही. गळय़ातदाटलेला हुंदका गिळून आणि डोळय़ात तरारलेला अश्रू परतवून करुणा पुन्हा कामाला लागते. डॉ. सुशीलदेखील काय घडलं, का घडलं याचा खुलासा करत नाही. ती तर त्याचं अभिनंदनदेखील करते. तोही ते सहजपणे स्वीकारल्यासारखं दाखवतो आणि आईनं तिच्यासाठी काय भेट आणली असेल ते ओळख म्हणून सांगतो, तेव्हा मात्र तिच्याच्यानं राहावत नाही. जीवघेणं कडूशार हसत ती विचारते, ‘‘भेट म्हणजे दुल्हन ना?..’’

आणखी वाचा-पाहायलाच हवेत: ‘अस्तित्व’भान जागवताना..

या कठीण प्रसंगातून दोघांची सुटका करून घेण्यासाठी करुणा हॉस्पिटलमधून जाण्याचा निर्णय घेते; पण वेदनेच्या लिपीत लिहिलेला तिचा ललाट लेख उसळी खातो आणि त्या दोघांना काही ना काही निमित्तानं पुन:पुन्हा एकत्र आणतो. एका अपघाताच्या स्थळी दोघांना एक रात्र एकत्र काढण्याची वेळ येते, तेव्हा ती मन आवरते. यानंतर दुर्दैवाचे तडाखे वाढतच जातात. पावसात भिजलेला तो गंभीर आजारी पडतो आणि त्या भरात पत्नीच्या देखत करुणाचं नाव घेत आपलं मन उघड करतो. त्यामुळे बिथरलेली त्याची पत्नी (नादिरा) मग सोक्षमोक्ष करण्यासाठी करुणाला भेटीला बोलावते. तिला गाडीत बसवून थेट उलटतपासणी सुरू करते. करुणानं हॉस्पिटलच नाही, तर ते शहरच सोडून जावं, अशी धमकीवजा मागणी करते, तेव्हा करुणा ते मान्य करते; पण प्रामाणिकपणे सांगते, ‘‘मी त्याला कधीही भेटणार नाही हे मान्य करते; पण मी कुठेही गेले, तरी त्याला मी कधीही विसरू शकणार नाही.’’ हा अनपेक्षित जबाब ऐकल्यावर सुशीलची पत्नी चवताळते आणि गाडी थेट समुद्रात घालते. त्या वेळी करुणाच्या चेहऱ्यावर विलक्षण स्मित उमटतं.. मृत्यूला आलिंगन द्यायला निघालेलं स्मित.. दैवाशी निरंतर चाललेल्या लढाईतलं स्मित.

या लढाईत करुणा जिंकली की नाही हा सवालच उरत नाही. लक्षात राहतं, ते तिचं विलक्षण धैर्य. तिनं आपल्या जोडीदारावरचा हक्क सोडून दिला आहे; पण त्याच्यावर प्रेम करण्याचा हक्क सोडून द्यायला मात्र ती तयार नाही. रिकाम्या हातानं जगत आलेल्या करुणाला हे दु:ख मान्य आहे, पराभव मान्य आहे.. तरीही ती पहिल्यांदाच स्वत:च्या हक्कासाठी उभी राहते. स्वत:साठी काही तरी मागते. हाच हिंदी चित्रपटातला अपूर्व क्षण आहे! तोवर प्रेमाचे त्रिकोण आणि त्यातून कोणी तरी एकानं त्याग करून जाणं, हा शेवटचा मार्ग होता. जन्मापासून उन्हातच घर असलेल्या करुणाला असे चटके खाण्याची सवय आहे; पण परिस्थितीशी सामना न करता पाठ फिरवण्याची तिची तयारी नाही. वास्तविक जीवनात स्त्री-पुरुषांच्या संबंधांत असे संघर्ष नेहमीच येतात. त्या वास्तवाशी डोळे, नजर भिडवण्याची तयारी असलेला हा पहिला चित्रपट. त्यामुळेच पूर्णत: व्यावसायिक चौकटीत तयार झालेला, नाचगाणी आणि हास्यविनोदपेरणारा हा चित्रपट काळाच्या पुढे धावणारा धाडसी चित्रपट ठरला. त्याच्यानंतर ‘अर्थ’ या एकाच चित्रपटानं एकाच पुरुषाच्या प्रेमात पडलेल्या दोन स्त्रियांचा सामना दाखवण्याची हिंमत केली. प्रदर्शित झाल्यापासून चाळीस वर्षांनी ‘दिल अपना और प्रीतपराई’चा‘अरमान’ या नावानं‘रीमेक’ झाला. ही त्याच्या सर्वकालीनतेची पावती.

आणखी वाचा-पाहायलाच हवेत : कहाणी जीवनव्यापी मनोभंगाची

आर्थिक स्वावलंबनाच्या बळावर एकटेपण पेलून दाखवणाऱ्या त्याच्या नायिकेनं आपल्या मनाचं कणखरपणदेखील सिद्ध केलं. ते करणारी हिंदी चित्रपटाच्या इतिहासातली ती पहिली नायिका! जन्मत:च वाट्याला आलेलं एकटेपण सोबतीला घेऊन निर्भयपणे जगणारी ही नायिका ‘अजीब दास्ताँ हैं ये’ या तिचं मनोगत सांगणाऱ्या गीताप्रमाणेच मनात घर करून राहिली. चित्रपटातल्या एका प्रसंगात डॉक्टर समोर येतो, ते सहन न होऊन करुणा तिच्या मैत्रिणीचा हात गच्च आवळते. त्या हातावरच्या वळाप्रमाणेच करुणाची कहाणी आपल्याही मनात पुन:पुन्हा ठुसठुसत राहते. त्याचं एक कारण म्हणजे हा चित्रपट पडद्यावरच्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे, तसाच पडद्यामागेही तो स्त्रीशक्तीचा विजय आहे.

दोन स्त्रियांचा सामना दाखवणारा हा चित्रपट एक आठवडाही चालणार नाही, असं वाटल्यामुळे कमाल अमरोहींनी या चित्रपटावर निर्माता म्हणून आपलं नावही दिलं नाही; पण त्यांची पत्नी मीनाकुमारी हिनं हट्ट धरून तो प्रदर्शित करायला लावला आणि तिचे आडाखे बरोबर ठरले. दुसऱ्या दिवसापासून हा सिनेमा सलग दहा आठवडे तीनही खेळ ‘हाऊसफुल’ चालला. चित्रपटाच्या नायिकेप्रमाणे प्रेक्षकही काळाच्या पुढे चालू लागल्याची ती सुखद निशाणी होती!

(सदर समाप्त)