काही वर्षांपूर्वी कै. वा. रा. कांत यांनी लिहिलेले, स्व. सुधीर फडके यांनी गायलेले व यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेले ‘त्या तरूतळी विसरले गीत’ या भावगीतांबद्दल लिहितांना मी ‘लोकसत्ते’तीलच एका लेखात लिहिले होते, मराठी गेय कविता अधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय झाली ती त्यातील भावप्रधान रचनेच्या सहजशैलीमुळे. एखादं भावगीत सर्वतोमुखी व लोकप्रिय होण्यासाठी त्यातील सहजगेयता, सरळ सोपी पण भावस्पर्शी शब्दरचना, अर्थवाही अभिव्यक्ती या गोष्टी जितक्या आवश्यक आहेत तितकेच महत्त्वाचे आहे भावगीत गायकाचे कसब, सुरेल आवाज, तरबेज गायकी अन् जोडीला मिळालेलं श्रवणमधूर संगीत. अशा गीतातील शब्द रसिकांच्या ओठावर सहजी येतात अन् मग हे लोकप्रिय गीत अजरामरपणे आपलं अमरत्त्व मोठय़ा प्रेमानं मिरवीत असतं. माझ्या वडिलांच्या ‘सखी शेजारिणी’ या भावगीताचाही मोठय़ा आदरभावानं मी उल्लेख केला आहे. १९४४ साली लिहिलेलं हे भावगीत संगीतकार कै. वसंत प्रभू यांच्या बरोबर अरुण दाते यांनी १९६७ साली एच. एम. व्ही.साठी गायलं होतं. शुक्रतारा प्रमाणेच ‘सखी शेजारिणी’ हे भावगीतही आज ४६ वर्षांनंतरही मराठी रसिकांच्या मनात हिंदोळत असतं. याचं सर्व श्रेय तिघांचं मिळून असलं तरी दाते यांनी मनाच्या मोठेपणानं ते श्रेय इतर दोघांना देऊ केले आहे. ऑक्टोबर २०१३ पर्यंत कै. वा. रा. कांत यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू आहे. या काळातच एका दिग्गज अन् तितकाच निर्मळ मनाच्या गायकानं त्यांच्या नावाचं स्मरण केलं ही त्यांनी वा.रा. कांतांना वाहिलेली एक आदरांजलीच आहे. अन् यासाठी मी अरूण दाते यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
-मु. वा. कांत, मालाड मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा