डॉ. अंजली जोशी

anjaleejoshi@gmail.com

Thane municipal administration implemented Air Quality Management System
ठाणेकरांना ७२ तासआधी हवा गुणवत्ता कळणार? हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Growth at reasonable price is the investment formula of Baroda BNP Paribas Large and Midcap Fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र : बडोदा बीएनपी पारिबा लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड
cyber fraud of 88 lakh with company manager
मुंबई : कंपनी व्यवस्थापकाची ८८ लाखांची सायबर फसवणूक
India, justice system, reforms, instability, IPS Officer, Meeran Chadha Borwankar, Kolkata case, badlapur child abuse case, rape case, assam rape case, Indian judicial system,
मोडक्या व्यवस्थेचे कठोर वास्तव
recession in india latest news in marathi
मंदीच्या कृष्णछाया दिसत आहेत?
ATM theft in pune
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामुळे बँकेवरील ‘आपत्ती’ टळली!  कुरकुंभमधील ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न फसला
upsc preparation loksatta
UPSC ची तयारी: पंचायती राज व्यवस्था

सद्ययुगातील काही आव्हाने ही वैयक्तिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला व्यापून राहिलेली दिसत आहेत. नराश्य व चिंतेचा समाजमनावरचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतो आहे. एका बाजूला वैश्विक होत जाताना दुसऱ्या बाजूला संकुचित होत जाणारी सामाजिक मानसिकता अनेक प्रसंगांतून प्रत्ययाला येत आहे. म्हणूनच मानसिक आरोग्य व आत्मव्यवस्थापनाची अधिक खोलात जाऊन माहिती देणारी ‘सायक्रोस्कोप’ ही लेखमाला दर पंधरवडय़ाने.

मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सूक्ष्मदर्शकातून जे पाहिले जाते ते त्याच्या सगळ्या बारकाव्यांसकट मोठय़ा आकारात दिसते. आपल्या मानसिक प्रक्रिया मोठय़ा आकारात पाहू शकणारा एखादा मायक्रोस्कोप असला तर? असा प्रश्न एका मानसशास्त्रज्ञाला पडला व या मायक्रोस्कोपला त्याने नाव दिले, ‘सायक्रोस्कोप’, म्हणजे आपले विचार, भावना व वर्तन यांची सूक्ष्मातून पाहणी करणारा सूक्ष्मदर्शक!

हा ‘सायक्रोस्कोप’ दृश्य नाही. त्यातून पाहणी करण्याची सवय स्वत:स जडवून घ्यावी लागते. हाच ‘सायक्रोस्कोप’  आपण या लेखमालेसाठी वापरणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असलेल्या अनेक मानसिक घडामोडी बारकाव्यानिशी दाखविणारा हा ‘सायक्रोस्कोप’ त्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यास तुम्हाला मदत करेल. आपण विकासाच्या वाटेवर आहोत का धोक्याच्या, हे तुम्हाला पडताळून पाहता येईल व त्यानुसार तुम्ही स्वत:मध्ये उचित बदल घडवून आणून सुयोग्य आत्मव्यवस्थापन करू शकाल.

मानसिक आरोग्य व आत्मव्यवस्थापन या विषयांशी संबंधित अनेक विषय आपण या सदरात हाताळणार आहोत. व्यावहारिक जीवनात तुम्ही आचरणात आणू शकाल अशी काही उपयुक्त वर्तनकौशल्ये, काही विचारपद्धती, संशोधनांतून गवसलेली काही तंत्रे, या क्षेत्रांतील काही उपयुक्त कृतिप्रणाली यांची ओळख या सदरातून करून दिली जाईल. जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक अंतर्दृष्टी त्यातून तुम्हाला मिळू शकतील. या क्षेत्रांतील तज्ज्ञ मानवी व्यवहारांकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात, हेही तुम्हाला कळू शकेल. मानवी व्यवहारांमागच्या मानसिक प्रक्रियांचा ऊहापोह मानसशास्त्रात केला जातो व व्यवस्थापन क्षेत्रात या व्यवहारांच्या उपयोजनाचा ऊहापोह प्रामुख्याने होतो. या दोन्ही क्षेत्रांचे उद्दिष्ट हे व्यक्तीस अधिक कार्यकुशल कसे करावे, हे आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून हे सदर लिहिले जाणार आहे. मानसशास्त्र व व्यवस्थापन या क्षेत्रांतील माझे अनुभव, या क्षेत्रांतील उपयुक्त माहिती, समुपदेशन करताना जाणवलेले मानवी मनाचे कंगोरे यावर हे लिखाण आधारलेले असेल.

‘सेल्फ-केअर’ हा हल्ली चर्चिला जाणारा विषय आहे. आत्मनिर्भरतेचा नवीन मंत्र म्हणजे ‘सेल्फ-केअर’ असेही म्हटले जाते. ‘सेल्फ-केअर’मध्ये शारीरिक व भावनिक आरोग्य सुस्थितीत ठेवणे अभिप्रेत असते. शारीरिक आरोग्याच्या बाबतीत हल्ली बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. वजन थोडे जरी जास्त झाले तरी आपण लगेच डाएट सुरू करतो किंवा व्यायाम चालू करतो. वजनाचा काटा पुढे सरकणार नाही याची काळजी घेतो. शारीरिक व्याधींच्या बाबतीतही आधीच दक्षता घेतो किंवा वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून किंवा योग्य औषधोपचार घेऊन शारीरिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो; परंतु भावनिक आरोग्याची काळजी आपण शारीरिक आरोग्याप्रमाणे घेतो का? शारीरिक आरोग्याप्रमाणे ते ठरावीक काळाने चाचपणी करतो का? किंवा ते सुस्थितीत असले तरी अधिक उन्नत करण्यासाठी ठोस प्रयत्न करतो का? याचे उत्तर बहुधा नकारार्थीच येईल. खरे तर, अनेकदा भावनिक आरोग्य सुस्थितीत नसल्याचे दुष्परिणाम शारीरिक आरोग्याच्या दु:स्थितीच्या परिणामांपेक्षा जास्त भयंकर असतात. तरीही आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो किंवा भावनिक आरोग्य गृहीत धरतो. त्यामुळे प्रत्येक अवघड वळणावर आपली मानसिक पडझड किती झाली आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही. या प्रत्येक वळणावरची पडझड ही आपल्या कार्यक्षमतेची भरून न निघणारी हानी करत असते.

हल्ली भावनिक आरोग्याबद्दल पूर्वीपेक्षा जास्त बोलले जाते. त्यासाठी कृती चळवळी आखल्या जातात, त्यांची चर्चा केली जाते; परंतु भावनिक आरोग्य हा विषय मानसिक समस्या असलेल्या लोकांनाच उपयोगी आहे, ही समजूत समाजमनात खोल आहे. म्हणजेच भावनिक आरोग्य हे प्रतिबंधापेक्षा (प्रिव्हेंटिव्ह) निवारणाचे (क्युरेटिव्ह) काम जास्त करते, अशी धारणा प्रबळ आहे. त्यामुळे आपल्याला एखादी मानसिक समस्या नसली तरीही भावनिक आरोग्याचे संवर्धन आपण करू शकतो; किंबहुना ते केलेच पाहिजे, याबाबत पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. त्यामुळे समुपदेशकांची मदत घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असली तरी अगदी कडेलोट झाला तरच धाव घेणाऱ्यांची संख्या त्यात जास्त आहे, हे नाकारून चालणार नाही.

भावनिक आरोग्याची ही गरज लक्षात घेऊन या विषयाशी निगडित काही लेख या सदरात तुम्ही वाचू शकाल. अपराधीपणा, आत्मकरुणा, चिंता यांसारख्या भावना आपल्या मनात नकळत कसा शिरकाव करतात व भावनिक स्वास्थ्य कसे हिरावून घेतात याची माहिती व त्यासंबंधीचे उपाय याची चर्चा त्यात होईल. स्वत:च्या मनात मूळ धरून बसलेल्या आरोग्यविघातक दृष्टिकोनाचे परीक्षण करण्याची संधी त्यामुळे तुम्हाला मिळू शकेल. हल्लीचा काळ हा अनेक आघाडय़ांवर पूर्वीपेक्षा जास्त गुंतागुंतीचा आहे. मानवी व्यवहारांना अनेक परिमाणे लाभलेली आहेत. दैनंदिन जीवन निभावून नेताना समायोजनाची नवनवीन आव्हाने उभी ठाकत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे निर्णयप्रक्रिया सुलभ होण्याऐवजी त्यांची गुंतागुंत वाढत चालली आहे. तंत्रज्ञानापासून ते राहणीमानापर्यंत समाजात इतक्या झपाटय़ाने आणि वेगाने बदल होत आहे, की त्यांच्याशी जुळवून घेताना आपली दमछाक होऊ शकते. अनेक भूमिका एकाच वेळी निभावून नेताना फरफट होऊ शकते. असंख्य स्रोत उपलब्ध असल्यामुळे अनेक माहितीकणांचा मारा आपल्यावर होत राहतो व त्यातले काय घ्यावे व काय नाही याबाबत मन द्विधा होते. दोन पिढय़ांत झपाटय़ाने वाढत जाणारे मानसिक अंतर पाहताना हतबुद्धता येऊ शकते. नवीन युगातल्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वत:स मानसिकदृष्टय़ा कसे सक्षम करावे, कुठले मार्ग आचरणात आणावेत, कुठली तंत्रे वापरावीत, याची चिकित्सा काही लेखांत केली जाईल. यानिमित्ताने या क्षेत्रातील नवीन प्रवाहांचीही ओळख करून दिली जाईल.

सद्ययुगातील काही आव्हाने ही वैयक्तिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला व्यापून राहिलेली दिसत आहेत. नराश्य व चिंतेचा समाजमनावरचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतो आहे. एका बाजूला वैश्विक होत जाताना दुसऱ्या बाजूला संकुचित होत जाणारी सामाजिक मानसिकता अनेक प्रसंगांतून प्रत्ययाला येत आहे. समाजमानसाच्या अशा विविध पलूंवर प्रकाश टाकणारे लेखही या सदरात तुम्हाला वाचावयास मिळतील. समाजात नकारात्मकता का पसरते, अनेक पूर्वग्रह कसे जोपासले जातात, सह-अनुभूती (एम्पथी)चा विकास समाजात कसा होऊ शकतो असे विषय, त्यावरील तज्ज्ञांची मते, संशोधने यानिमित्ताने तुम्हाला वाचावयास मिळतील.

ही आव्हाने अनुभवताना व त्यांना सामोरे जाताना आपण काय करू शकतो? हल्लीच्या युगाला आपण जबाबदार ठरवणार का? तसे ठरवले तर आपल्या हातात करण्यासारखे फारसे काही राहणार नाही. कारण बाह्य़ परिस्थितीत फारच कमी घटक आपण नियंत्रित करू शकतो. त्यापेक्षा या युगाला तोंड देण्यासाठी स्वत:स प्रभावशाली बनवणे व तद्नुसार स्वत:च्या वर्तनाचे योग्य व्यवस्थापन करणे हे जास्त सयुक्तिक आहे व हे करण्यास ‘सायक्रोस्कोप’ तुम्हाला मदत करेल.

हल्ली व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून सल्ल्यांचा, उपदेशांचा, तत्त्वज्ञानांचा किंवा विचारप्रणालींचा भडिमार आपल्यावर सतत होत असतो व आपणांस ‘सेल्फ-हेल्प’ मिळत असल्याचा आभास निर्माण होतो; परंतु यामुळे मदतीपेक्षा संभ्रम जास्त वाढू शकतो. कारण यातल्या कुठल्याही एका विचारावर मनन करण्यास पुरेसा अवधी मिळण्याअगोदरच त्याचा विसर पडेल असा दुसरा विचार आपल्यावर आदळलेला असतो. मानवी स्मृती अधिकाधिक लघु करण्यास ही माध्यमे हातभार लावत आहेत. एखाद्या विचारावर चिंतन-मनन करणे, त्याचे अवलोकन करणे अशा सवयी या माध्यमांमुळे लोप पावत चालल्या आहेत. या सवयी पुन:जागृत करून विचारमंथन करण्यास ‘सायक्रोस्कोप’ वाचकांना उद्युक्त करेल व ‘चतुरंग’चे चिंतनशील वाचक त्याचे स्वागत करतील अशी आशा आहे.

अंजली जोशी लेखिका , मानसोपचारतज्ज्ञ असून समुपदेशन मानसशास्त्रात पीएच.डी. आहेत. मुंबईतील नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये ‘ह्य़ुमन रिसोर्सेस’ या विषयाच्या त्या ‘असोसिएट डीन’ म्हणून कार्यरत आहेत. अनेक संस्था व कंपन्यांशी त्या ‘कन्सिल्टग सायकॉलॉजिस्ट’ म्हणून संलग्न असून मानसशास्त्र व व्यवस्थापन या विषयांवर त्यांनी देशभरात अनेक व्याख्याने व कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांची आत्तापर्यंत ७ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध मासिके, नियतकालिके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शंभराच्या वर लेख व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ‘मी अल्बर्ट एलिस’ या कादंबरीला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून ‘विरंगी मी, विमुक्त मी’ या कादंबरीला ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘कादंबरी पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय ‘अल्बर्ट एलिस विचारदर्शन’, ‘विवेकी पालकत्व’, ‘लक्षणीय ५१’, ‘आय अ‍ॅम अल्बर्ट एलिस’ ही मानसशास्त्रावरील इतरही प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. ‘आरईबीटी इंटीग्रेटेड’ हे पुस्तक भारताव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व सिंगापूर या देशांत उपलब्ध आहे.