लग्नापूर्वी सगळं नवंनवं असताना मुलंमुली दोघंही आपला मूळचा स्वभाव बाजूला ठेवतात. समोरच्याला आवडेल असंच वागण्याचा प्रयत्न करतात. लग्नानंतर मात्र एका कुटुंबात राहताना जोडीदाराच्या स्वभावातल्या अनेक गोष्टी खटकू लागतात. पण समोरच्याची विचार करण्याची पद्धत, त्याची हळवी स्थानं कोणती आहेत, हे समजून घेतलं आणि दोघांनी त्याप्रमाणे थोडं जुळवून घेतलं, तर दैनंदिन जीवनातले अनेक वाद टळतील..

विंदाकाका हैदराबादहून परत आल्याचं कळल्यावर सानवीला बरं वाटलं. ते तिच्या बाबांचे सख्खे मित्र. लहानपणीपासून काकांचा हृषिकेशदादा सानवीचा खेळगडी होताच, पण काकांशी तिची खास दोस्ती होती. तिचे बाबा हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला काका-काकूंचा आधार होता. तिच्यासाठी साहिलचं स्थळही त्यांच्याच ओळखीतून आलं होतं. लग्न ठरल्यापासून होईपर्यंत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते सात महिने सानवी-साहिलसाठी जादूई होते. त्यांच्या लग्नानंतर काका-काकू हृषिकेशकडे हैदराबादला गेले, ते आता काही महिन्यांनी परतले होते.
सानवी काकांच्या घरी गेली तेव्हा, ‘‘ये सानू, तुझी वाटच पाहत होतो. ही भिशीला गेलीय.’’ असं म्हणत काकांनीच चहा केला.
चहाचा कप समोर ठेवत, ‘‘काय म्हणतायत आमचे लव्हबर्डस?’’ असं काकांनी विचारलं मात्र, सानवीचे डोळे भरून आले.
‘‘काय गं? ठीक आहे ना सगळं?’’ काकांनी काळजीनं विचारलं.

आणखी वाचा-उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…

‘‘तसं ठीक आहे काका, पण हल्ली साहिल खूप बदललाय. लग्नाआधी आम्ही भेटायचो, तेव्हा त्याच्या मनातली माझ्याबद्दलची ओढ क्षणोक्षणी जाणवायची. खूप मेसेजेस करायचा, रोज भेटायचा. आठवड्यातून दोन-तीनदा मला ऑफिसला घ्यायलासुद्धा यायचा. पण हल्ली सगळंच बदललंय. दिवसभरात एखादा कामापुरता मेसेज असतो. ऑफिसमधून यायला त्याला उशीर होतो आणि आल्यावर कुठलीतरी फालतू सिरीयल पाहायला आई त्याला शेजारी बसवून घेतात. पूर्वी घरी आल्यावर, घरच्यांबरोबर जरासा बसून तो लगेच माझ्याशी बोलायला आत यायचा. एकदा मात्र आई त्याला म्हणाल्या, की ‘लग्न झाल्यापासून तू बदललास,’ तेव्हापासून हा संकोचून तिथेच थांबतो. मी आपली चहा-पाणी, स्वयंपाकाचं बघत असते. त्यांच्याकडे जेवणं उशिरा होतात, मग आवराआवरी. त्यानंतर तो लाडात आला तरी माझा पेशन्स संपतो. चिडचिड होते. मी कधी म्हटलं, की ‘तुझ्या घरच्यांना आपली प्रायव्हसी कळत का नाही रे?’ तर म्हणतो, ‘एकत्र टीव्ही पाहण्याची आमची कुटुंबाची जुनी सवय आहे.’ मी सासूबाईंबद्दल काही सांगितलं, तर अस्वस्थ होऊन चिडतो. छान गप्पाही होत नाहीत आमच्या हल्ली… मला काही किंमतच देत नाही तो!’’
सानवीचे असे बरेच मुद्दे/ तक्रारी होत्या! सासूबाईंचं वागणं पटत नाही, ते सगळे एकत्र असले, की तिला परकं वाटतं, पण हे साहिलला मान्यच नसतं. ‘तुलाच तसं वाटतं’ असं तो म्हणतो. त्याला कामाचा ताण येतोय हे तिला कळतं, पण तो आपणहून काहीच सांगत नाही. तिनं पुन:पुन्हा विचारलं तर चिडतो. एकदा ती आजारी पडली होती, तेव्हाही तिची जुजबी चौकशी करून तो स्वत:च्या कामातच मग्न होता. ती काही सांगायला गेली, तर तो नीट ऐकून न घेता फक्त सल्ले देतो… सानवी खूप वेळ असं काय काय सांगत होती.
शेवटी ती म्हणाली, ‘‘मला तुम्हाला दडपण द्यायचं नाहीये काका, पण हल्ली डोक्यात प्रश्नांचे भुंगे भुणभुणतात! आधीचा प्रेमळ साहिल गेला कुठे? की ते तेवढ्यापुरतं नाटक होतं? खरा साहिल असाच आहे का?…’’

लक्षपूर्वक ऐकणाऱ्या काकांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटलं. ऐसपैस बसत ते म्हणाले.
‘‘एवढंच ना? ही लक्षणं खूप कॉमन आहेत सानू! नात्यातला नवथरपणा कमी होऊन ‘संसार’ सुरू होतो ना, त्या काळात बहुतेक जोडपी या ताणातून जातात. जोडीदाराचं वागणं इतकं कसं बदललं? तो (किंवा ती) मला समजूनच घेत नाही… मी त्याला आता आवडत नाही का? असे प्रश्न दोघांनाही पडतात, कारण स्त्री आणि पुरुषांच्या विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात हे लक्षात घेतलेलं नसतं. त्यामुळे जोडीदारही आपल्याच पद्धतीनं विचार करतो असं गृहीत धरतात दोघंही.’’
‘‘म्हणजे?’’ सानवीला काही पटेना.
‘‘पहिलेवहिले दिवस प्रेमाच्या धुंदीत जातात. आवडणारा जोडीदार, जवळीकीचा अनोखा अनुभव… दोघंही एकमेकांसाठी ‘स्पेशल’ असतात, एकमेकांना खूप भाव देतात. पुरुष तर अगदी मोरासारखा पिसारा फुलवून प्रेयसीच्या भोवती नाचत असतो! त्या पिसाऱ्यावर भाळून ती त्याला स्वीकारते. एकदा तिला घरात आणल्यावर मात्र पुरुषाचं प्राधान्य बदलतं. आता त्याला तिच्यापुढे कर्तृत्व सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. पिसारा आवरून तो कामाला लागतो.’’

आणखी वाचा-सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस

‘‘तीन महिन्यांपूर्वी साहिलनं बाहेरचा एक जास्तीचा प्रोजेक्ट घेतलाय खरा… आणखी बिझी झालाय. फक्त माझ्यासाठी वेळ नाही.’’ सानवी फुणफुणली.
‘‘तीच तर गंमत असते. एकदा प्रेम व्यक्त झाल्यावर, प्रेयसीनं स्वीकारल्यावर, तिला काही कमी पडू नये यासाठी तो कामाला लागतो. तिच्या आदर-सन्मानाला पात्र होण्यासाठी धडपडतो. पण उलटच घडतं. तिला ‘खास’ वाटणं दूरच, उलट दुर्लक्षित वाटून ती बिथरते. कारण ज्याला भुलून ती आली होती, तो त्याचा पिसारा या गडबडीत मिटून जातो. ‘त्याच्यासाठी मी जर ‘स्पेशल’ उरले नसेन, मला तो भावही देत नसेल, पिसारा गायब असेल, तर कालपर्यंत अनोळखी असलेल्या त्याच्या कुटुंबाची रोजची जबाबदारी, त्यांचे मूड्स, त्यांनी मला ‘जज करणं’, हे मी कोणासाठी झेलायचं? त्यापेक्षा आधीच्या माझ्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये मी सुखी होते की…’ असं वाटतं तिला!’’
‘‘करेक्ट. असंच वाटतं काका.’’
‘‘असं घडतं, कारण पुरुषांसाठी स्वत:ची ‘ओळख’ त्याच्या कामाशी, कर्तृत्वाशी जोडलेली असते आणि अनेकदा स्त्रीची ओळख तिच्या भावना आणि नातेसंबंधांमध्ये असते. नवऱ्याचं हवं-नको, त्याच्या आवडीनिवडी, घरातल्यांची काळजी घेणं, ही तिला तिची जबाबदारी वाटते. ती कुठेही असली तरी तिच्या प्रदक्षिणेचं केंद्रक नवरा, घर हेच असतं! दोघंही आपापल्या स्व-ओळखीच्या कल्पनांप्रमाणे जोडीदाराला प्रेम देतात आणि त्याच पद्धतीनं प्रतिसादाची अपेक्षा करतात. तिथे गडबड होते!’’ काका म्हणाले.

आणखी वाचा-माझी मैत्रीण : ‘Y’ची मैत्रीण ‘X’!

ते आणखीही बरंच काही बोलत राहिले… ‘‘दुसरं म्हणजे, पुरुष जागतिक गप्पा मारत असले, तरी एकमेकांना सहज म्हणून आपल्या समस्या सांगत नाहीत. स्वत:ची समस्या स्वत: सोडवण्यात त्यांचा आत्मसन्मान असतो. समस्या सुटेपर्यंत काही काळ ते सगळ्यातून तात्पुरते अलिप्त होतात. एकाग्र होऊन विचार करतात. त्या वेळी कुणी थोडासाही व्यत्यय आणलेला त्यांना खपत नाही.’’
‘‘खरंच आहे काका… साहिल विचारमग्न, ताणात दिसला, की काळजीनं मी त्याच्या मागे-मागे करते, ‘मदत करू का?’ विचारते, तर तो माझ्यावरच भडकतो. अनोळखीच वाटतो तेव्हा तो.’’
‘‘स्वाभाविक आहे. स्त्रिया आपुलकी, प्रेम व्यक्त करण्यासाठी नवऱ्याला मदत करायला येतात, पण आपण न मागता कोणी मदत देणं हा पुष्कळदा पुरुषाला त्याच्या क्षमतेवरचा अविश्वास, अपमान वाटतो. आपल्याला जमणार नाहीये, याची खात्री झाल्याशिवाय पुरुष मदत मागत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यानं आपल्याकडे मदत मागणं पुरुषांसाठी सन्मानाचं, विश्वासाचं प्रतीक असतं. त्यातही आवडत्या माणसासाठी तर जास्तच!’’
‘‘अच्छा, साहिलचे सल्ले म्हणजे त्याच्या दृष्टीनं मला केलेली मदत असते तर… पण मी मन मोकळं करण्यासाठी बोलते, भावना शेअर करते. त्यानं फक्त ऐकून घ्यायला हवं असतं मला.’’

‘‘पुरुषांना अशी भावना व्यक्त करण्याची सवय जवळजवळ नसते. त्यामुळे पुरुषांच्या ‘रूढ’ पद्धतीप्रमाणे, तू तक्रार करतेयस याचा अर्थ तुला त्याची मदत हवीय, असा असतो. गंमत म्हणजे त्याच सुमाराला त्याची आईसुद्धा अचानक त्याच्याकडे लाडक्या बायकोबद्दल तक्रारी करायला लागते आणि तो भांबावतो. त्याच्या कामाचा स्वीकार, कौतुक होण्याऐवजी आवडत्या दोघीही नाराज! त्यांनी आपल्यालाच नाकारलंय असं वाटतं त्याला. हे ‘भावनिक सँडविच’ प्रकरण अनोळखी. ते सहजी हाताळता येत नाही. मग ‘मी चांगला नवरा नाही, चांगला मुलगाही नाही,’ असं वाटून तो अस्वस्थ होतो, चिडतो. शिवाय असं होतं, की बहुतेक बायकांना ‘स्टोरी’ सांगायला आवडते. त्यामुळे त्या खूप बोलतात. मुख्य मुद्द्याला इकडचं तिकडचं जोडून त्यांच्या गोष्टी फुगतात. अनेकदा पुरुषांचं याच्या उलट असतं. त्यांना नेमका ‘डेटा’ हवा असतो. असंख्य शब्दांमधून आवश्यक तेवढाच ‘डेटा’ शोधताना ते गोंधळतात. सपशेल हारतात, आणखी चिडतात! मग ‘हा असा का चिडतो? ऐकूनही घेत नाही,’ म्हणून बायको वैतागते. खरं तर दोघंही आपल्याच भूमिकेतून पाहात असल्यामुळे एकमेकांना समजू शकत नाहीत; हो ना?’’

आणखी वाचा-‘भय’भूती : पायात बांधलेला भयाचा दोरा!

आता सानवीला साहिलच्या चिडण्यामागचं ‘मेकॅनिझम’ दिसायला लागलं!
‘‘पण काका, स्त्री-पुरुषांच्या स्वभावातले फरक तुम्हाला कसे समजले?’’ तिनं कुतूहलानं विचारलं.
‘‘अर्थात गरजेतून! लग्नानंतर तुझ्या काकूशी भांडणं व्हायची, तेव्हा मी वाचलं याबद्दल, मार्गदर्शक शोधले. मग तिच्याशी ‘शेअरिंग’ करायला लागलो. काही गोष्टी उलगडत गेल्या. पण थांब सानू, तू समस्या मांडलीस, आता सल्ल्याच्या दोन मुख्य टिप्स ऐक-
१. ‘मला वाटलं’ म्हणून काहीही गृहीत धरायचं नाही! जोडीदाराला विचारायचं. तसंच आपल्या भावना, त्यानं काय करणं अपेक्षित आहे, ते थोड्या शब्दांत, नेमकं आणि चिडचिड न करता सांगायचं.
२. एकमेकांच्या माहेरच्या लोकांवर टीका केल्यामुळे दोघंही दुखावतात. मग उपाय मिळतच नाहीत, हे पक्कं समजून घ्यायचं.’’ काका म्हणाले.
‘‘हे जमण्यासारखं वाटतंय काका. पण असाच साहिललासुद्धा ‘गुरुमंत्र’ द्या ना एकदा!’’ सानवी म्हणाली.
‘‘साहिलला मी सांगणारच आहे, की तुझा पिसारा अधूनमधून फुलवत रहा बाबा! आमच्या सानूची ती अतिशय महत्त्वाची गरज आहे. बदलत्या काळात मुली घराबाहेर पडल्यापासून त्यांना पुरुषांच्या भूमिकेचा अंदाज येतोय. त्यामुळे त्यांची विचारांची पद्धतही मुली समजून घेतील. आणि चांगला जोडीदार होण्यासाठी मुलांनादेखील मुलींचा भावनांचा प्रांत शिकूनच घ्यावा लागेल. ‘तुझं कर्तृत्व महत्त्वाचं आहेच, तरी दिवसातली दहा तरी मिनिटं ‘फक्त तिच्यासाठी’ देत जा, तिच्या भावना ऐकायला शीक,’ हे मी नक्की सांगणार त्याला.’’
काकांनी साहिलशी बोलण्याची जबाबदारी घेतल्यामुळे सानवीच्या मनाची भुणभुण कमी झाली आणि उद्याच्या स्वप्नांत ती रमून गेली.
neelima.kirane1@gmail.com