देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी कौतुकही केलं आहे.

जगातल्या ५० देशांमधील समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्येच आता भारतातील समुद्र किनाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासोबतच देशातील समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषण नियंत्रणासाठी ‘आंतरराष्ट्रीय बेस्ट प्रॅक्टीस ‘पुरस्कारसाठीदेखील भारताची निवड करण्यात आली आहे.

आशिया खंडातील ब्लू फ्लॅगचा पुरस्कार मिळविणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी जपान, द. कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती यांना ब्लू फ्लॅगचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळण्यासाठी या देशांना ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागला होता. विशेष म्हणजे आता या यादीमध्ये भारताचादेखील समावेश झाला आहे.

या भारतीय समुद्रकिनाऱ्यांना मिळाला ब्लू फ्लॅग

शिवराजपूर बीच ( गुजरात), गोल्डन बीच( ओडिसा), घोघाला बीच ( दीव), पादुबिदरी बीच आणि कासरकोड बीच( कर्नाटक), कप्पड बीच( केरळ), रुशिकोंडा बीच( आंध्र प्रदेश) आणि राधानगर बीच ( अंदमान आणि निकोबार).