पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बसपा प्रमुख मायवतींनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

“पंजाबमध्ये आज शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी, ही एक नवी राजकीय व सामाजिक सुरूवात आहे. जे की नक्कीच इथं राज्यात जनतेचा बहुप्रतीक्षित विकास, प्रगती व आनंदाच्या नव्या युगाची सुरूवात करेल. या ऐतिहासिक पावलासाठी लोकांचे हार्दिक अभिनिंदन व शुभेच्छा.” असं मायावती म्हणाल्या आहेत.

तसेच, “तसं तर पंजाबमध्ये समाजातील प्रत्येक घटक काँग्रेस सरकारच्या काळात इथं निर्माण झालेली गरिबी, भ्रष्टाचार व बेरोजगारी आदींशी झगडत आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका, दलित, शेतकरी, तरूण व महिलांना बसला आहे. ज्यातून सुटका मिळवण्यासाठी या आघाडीला यशस्वी बनवने अतिशय आवश्यक आहे.” असं मायावतींनी सांगितलं आहे.

याचबरोबर “पंजाबच्या जनतेला आवाहन आहे की, अकाली दल व बसपामध्ये आज झालेल्या ऐतिहासिक आघाडीला आपला संपूर्ण पाठिंबा देत, इथं २०२२ च्या सुरूवातीस होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या आघाडीचे सरकार तयार करण्यासाठी आतापसूनच संपूर्ण तयारीला लागा.” असं देखील मायावतींनी म्हटलं आहे.

काँग्रेसला टक्कर देण्यासाठी मोठी खेळी! २७ वर्षांनंतर अकाली दल, बसपाची आघाडी

पंजाबमध्ये सध्या काँग्रेस सत्तेत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असून, पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या दोन्ही नेत्यांच्या गटात सध्या तणाव आहे. काँग्रेस ही गटबाजी संपवण्याचा प्रयत्न करत असून, शिरोमणी अकाली दलाने शनिवारी २०२२मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा करत काँग्रेस धक्का दिला आहे.