मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा गुरूवारी (२ जुलै) विस्तार झाल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण तापल्याचं बघायला मिळालं. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा वरचष्मा दिसला. इतकंच काय त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मौन सोडत माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना ‘टायगर अभी जिंदा है’ या शब्दात इशाराच दिला. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनीही वाघाच्या शिकारीला जाण्याचा किस्सा सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांना उत्तर दिलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्यावर निशाणा साधला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या टीकेला आता दिग्विजय सिंग यांनी उत्तर दिलं आहे. दिग्विजय सिंह यांनी तब्बल तीन ट्विट केले असून, यातून वाघाच्या शिकारीपासून ते भाजपात आणखी किती वाघ तयार होणार इथपर्यंत समाचार घेतला आहे.

दिग्विजय सिंह यांनी पहिलं ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात की, “जेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती. तेव्हा मी आणि श्रीमंत माधवराव शिंदेजी वाघाची शिकार करायचो. इंदिरा गांधींनी वन्यजीव संरक्षण कायदा आणल्यानंतर मी आता फक्त वाघाचे फोटो काढत असतो,” असं सिंग म्हणाले आहेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी दोन वाघांचा फोटो शेअर करून वाघाच्या स्वभावाविषयी सांगितलं आहे. ‘वाघाचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. एका जंगलात एकच वाघ राहतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये दिग्विजय सिंग यांनी मंत्रिमंडळ विस्तारवरून टीका केली आहे. शिवराज सिंह चौहान व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “वेळ सर्वात शक्तीशाली आहे. भाजपाचं भविष्य… या मंत्रिमंडळ विस्ताराने भाजपाचे किती वाघ जिवंत केले आहेत, माहिती नाही. आता पाहत रहा,” असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते ज्योतिरादित्य शिंदे?

मध्य प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर दिलं होतं. “मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतंही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी १५ महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है,” असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले होते.