अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती

‘‘राजकीय क्षेत्रातील लोकांची गुणवत्ता अद्यापही अपुरी आहे. त्यामुळेच पक्षाची अधिकृत भूमिका नसतानाही अनेकजण उठसूट मते मांडत असतात. भाजपमध्येही अशा वाचाळवीरांची संख्या मोठी आहे,’’ अशी स्पष्टोक्ती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.

देशासाठी ‘निर्णायक टप्पा’ ठरतील अशा गेल्या पाच वर्षांतील ‘परिवर्तनशील’ बदलांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे लोकसभा निवडणुकांमध्ये ‘ब्रँड’ ठरले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. जेटली यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केले. मला एक कबुलीजबाब द्यायचा असल्याचे सांगून जेटली म्हणाले की, ‘‘राजकीय जीवनात लोकांची गुणवत्ता अद्यापही अपुरी आहे. त्यामुळे, पक्षाची भूमिका नसलेल्या अनेक गोष्टी बोलणारे नेते तुम्हाला दिसतात. हे लोक खरेतर स्वत:च्या ओळखीच्या शोधात असतात. अशाप्रकारच्या विचित्र प्रतिक्रियांना माध्यमांमध्ये अधिक जागा मिळत असल्यामुळे या वाचाळवीरांना प्रोत्साहन मिळते. अशाप्रकारचे अनेक लोक भाजपमध्येही आहेत, याबद्दल मला खेद वाटतो.’’ एक केंद्रीय मंत्री आणि त्रिपुराचे राज्यपाल यांच्यासह द्वेषपूर्ण वक्तव्ये करणाऱ्या लोकांना जाहीरपणे दरडावणे ज्येष्ठ नेत्यांनी का टाळले आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यास उत्तर देताना जेटली यांनी हे मत मांडले.

भाजपच्या प्रचारमोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाबाबत होणाऱ्या टीकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात जेटली यांनी या निवडणुका म्हणजे वस्तुत: ‘मोदी यांच्याबाबत जनादेश’ ठरवण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. निवडणुकांदरम्यान प्रकाशझोत नेहमीच नेत्यावर असतात. १९९८ व १९९९ च्या निवडणुका वाजपेयीजींवर केंद्रित होत्या. आपण इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याही निवडणुका पाहिल्या आहेत. वर्चस्व असलेले व्यक्तिमत्व असले की निवडणुकांवरही त्यांचे वर्चस्व असते. हाच प्रश्न दुसऱ्या प्रकारेही विचारला जाऊ शकतो. मोदी यांना बाजूला ठेवले, तर विरोधी पक्षनेत्यांची ९० टक्के भाषणे संपून जातील. त्यांना अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे वस्तुत: मोदींबाबतचा जनादेश ठरला असल्याचे मत जेटलींनी व्यक्त केले.

भाजपचे नवे सुरक्षा तत्त्व

लक्ष्यभेदी हल्ला आणि बालाकोटमधील कारवाईमुळे भारत आता दहशतवादाच्या मूळाशी जाऊ शकतो, याचा संदेश गेला आहे. भारताची ही कारवाई हे भाजप सरकारने अंगिकारलेले नवे सुरक्षा तत्त्व आहे, असेही जेटली म्हणाले.