Ram Mandir-Babri Masjid Case Supreme Court Verdict : राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला. न्यायालायाच्या या निर्णयानंतर संयम आणि शांतता बाळगण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींसह विविध राजकीय नेत्यांनी केलं. निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. कोठेही गालबोट लावणारी अनुचित घटना घडली नाही. देशभरात जनजीवन सामान्य होतं.