गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी भारतामध्ये करोनाची तिसरी लाट येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये झुनझुनवाला यांनी, “मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये इतक्यात (करोनाची) तिसरी लाट येणार नाही,” असं म्हटलं आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारामध्ये मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. याचसंदर्भात बोलताना गुंतवणुकदारांनी घाबरण्याची आणि तिसऱ्या लाटेमुळे मंदी येईल यासंदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचं झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे. “कोणीही दोन लाटांचं भाकित व्यक्त केलं नव्हतं. मात्र आता सगळेजण तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी करत आहेत. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे ते पाहता आपल्या सर्वांना हर्ड इम्युनिटी मिळेल. त्यामुळेच तिसरी लाट येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही,” असं झुनझुनवाला यांनी आपलं मत मांडताना म्हटलं आहे.

समजून घ्या >> संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

पुढे बोलताना झुनझुनवाला यांनी तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असं मतही व्यक्त केलं आहे. मात्र काही बदल करण्याची गरजही झुनझुनवाला यांनी बोलून दाखवलीय. “लाट येवो अथवा न येवो भारतीय अर्थव्यवस्था ही कोणत्याही संकाटाचा सामना करण्यासाठी तयार आहे. तिसरी लाट येणार नाही यासाठी मी पैजेवर पैसे लावण्यासाठीही तयार आहे. सोशल नेटवर्किंगवर सर्वच हुशार लोक तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत असल्याने आपण घाबरुन गेलो आहोत. आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. मात्र मला वाटत नाही की तिसरी लाट येईल,” असं झुनझुनवाला म्हणालेत.

समजून घ्या >> Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

एकूण लसीकरण किती झालं आहे?

२० जूनपर्यंत भारतामध्ये २८ कोटी लोकांनी करोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस तरी घेतला आहे. एकूण ३४ लाख २४ हजार ४०८ टप्प्यांमध्ये २८ कोटी ३६ हजार ८९८ जणांना लस देण्यात आल्याचं २१ जून रोजी सकाळी सात वाजताच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. करोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी (२१ जून २०२१ रोजी) सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण ठरलं.

समजून घ्या >> ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?

२१ जूनचा दिवस संपेपर्यंत देशात एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. यापूर्वी एकाच दिवशी ४८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम होता, तो आज मागे टाकत दिवसभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरणात आले.