शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत जहरी टीका केली आहे. “आपला देश सरकारी तालिबानन्यांनी ताब्यात घेतला आहे”, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भाजपा हा ‘सर्वात धोकादायक पक्ष’ असल्याचं देखील म्हटलं आहे. सिरसा येथे किसान महापंचायतीला संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

“भाजप सर्वात धोकादायक पक्ष”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना राकेश टिकैत म्हणाले की, “जेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुका होतील तेव्हा ते निवडणुक जिंकण्यासाठी एका मोठ्या हिंदू नेत्याला मारण्याचा कट रचतील. हिंदू-मुस्लिम संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करून, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील हिंदू नेत्यांना मारून निवडणुका जिंकायच्या आहेत.” टिकैत पुढे म्हणाले कि, “भाजप हा आजपर्यंतचा सर्वात धोकादायक पक्ष आहे. हा पक्ष खऱ्या अर्थाने उभा करणाऱ्या खऱ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

“नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी”; राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

“हाच ‘सरकारी तालिबान’चा पहिला कमांडर”

टिकैत यांनी यावेळी असाही दावा केला आहे कि, “शेतकऱ्यांचं डोकं फोडण्याची सूचना देणारे कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आयुष सिन्हा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच आयुष सिन्हा यांचा भाजपाची शाखा मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंध होता. कर्नाल एसडीएम (आयुष सिन्हा) आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा भाचा आहे. हाच अधिकारी या ‘सरकारी तालिबान’चा पहिला कमांडर आहे.”यासोबतच राकेश टिकैत यांनी यावेळी कर्नालमधील शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अधिकाऱ्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशात शेतकरी संघटनांची भाजपविरोधात मोर्चेबांधणी

शेतकरी मागे हटणार नाहीत!

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राकेश टिकैत म्हणाले की, “हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल हे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी हरियाणातील शेतकऱ्यांना देखील रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु शेतकरी मागे हटणार नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. दिल्लीऐवजी हरियाणा हे शेतकऱ्यांच्या चळवळीचे केंद्र व्हावं अशी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांची इच्छा आहे. म्हणूनच, अशा घटना घडविल्या जात आहेत”