बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपानं, ४३ जागा जदयूनं तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला.

“बिहारच्या प्रत्येकां पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे,” असं अमित शाह म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडणुकीमध्ये जनतेनं ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या करोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला असल्याचं ते म्हणाले.

आणखी वाचा- Bihar Election Result : ओवैसी ‘वोट-कटर’, धर्मनिरपेक्ष पक्षांनी सतर्क राहावं; काँग्रेसची टीका

“बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मुख्यत: बिहारचे तरूण आणि महिलांना धन्यवाद देतो ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिलं,” असंही शाह म्हणाले.

आणखी वाचा- “भाजपा-संघाला सोडा आणि…”; नितीश कुमार यांना काँग्रेसकडून ऑफर

एनडीए, महाआघाडीत चुरस

बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं. मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे.