देशात पुन्हा एकदा करोनाने कहर केला असून केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे तसंच काय उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच तज्ञांसोबतही चर्चा करत आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. दरम्यान काही राज्यांनी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवरही निर्बंध आणले आहेत. यादरम्यान अनेकांना प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार अशी चिंता सतावत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु असतील असं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली असून घाबरण्याची किंवा अंदाज बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. प्रवासी तिकीट बूक करुन आरामशीर आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी प्रवास करुन शकतात असं रेल्वेने म्हटलं आहे.

आणखी वाचा- रुग्णवाढीबरोबर मृत्यूचं तांडव! २४ तासांत १.७६१ रुग्णांचा मृत्यू

सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील असं स्पष्ट करताना रेल्वेने नागरिकांनी तिकीट कंफर्म असेल किंवा आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकावर यावं अशी विनंती केली आहे.

दरम्यान अनेक राज्यांनी रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध वाढवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याचं सांगत सोमवारी एका आठवड्यासाठी लॉकडाउन जाहीर केला. तर राजस्थानमध्येही दोन आठवड्यांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. तसंच गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात न्यायालयाने राज्य सरकारला लॉकडाउनसंबंधी विचार करण्यास सांगितलं आहे.

आणखी वाचा- “पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरी भारतात जाणं टाळा, कारण…”

दरम्यान भारतात रविवारी २४ तासात दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले. तर १६१९ जणांचा मृत्यू झाला. देशात सध्या १९ लाख २९ हजार ३२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १२ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे.