निकषांची पूर्तता न करताच चीननं भारतात पीपीई किट्स पाठवल्याचा प्रकार चर्चेत असताना आणखी एक मुद्दा समोर आला आहे. चीननं पाठवलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीच्या आहेत, असा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीनमधून आलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे.

राजस्थान सरकारनं मंगळवारी चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स न वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. “चीनमधून आणण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किट्सनं ९० टक्के अचूक निकाल देणं अपेक्षित आहे. पण, या किट्स फक्त ५.४ टक्केच अचूक निकाल देत आहेत. त्यामुळे या किट्सचा वापर करण्याचा काहीही उपयोग नाही. या किट्सबद्दल आयसीएमआरला (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) माहिती देण्यात आली आहे,” अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दिली.

“राजस्थान सरकारनं याकडे आयसीएमआरचं लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता आम्ही काय करायचं? असा प्रश्नही आम्ही परिषदेकडं उपस्थित केला आहे. सरकारनं परिषदेच्या उत्तरांची प्रतिक्षा करत आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही या रॅपिड टेस्टिंग किट्स निगेटिव्ह दाखवत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर सरकारनं एक समिती स्थापन केली होती. त्या समितीनं किट्सच्या रिझल्टचा अभ्यास केला. त्यानंतर या किट्सचा परिणाम केवळ ५.४ टक्केच असल्याचं समोर आलं,” अशी धक्कादायक माहिती रघू शर्मा यांनी दिली. “चुकीचा रिझल्ट दाखवत असल्यानं कमिटीनं या किट्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राज्य सरकारनं तातडीनं या किट्सचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती शर्मा यांनी दिली.

६३ हजार पीपीई किट्स निकषांची पूर्तता न करताच पाठवल्या

केंद्र सरकारनं जूनपर्यंत देशात किती पीपीई किट, मास्क आणि व्हेटिंलेटर लागतील, याचा अंदाज घेऊन खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. हे साहित्य परदेशातून आयात करण्यात येणार असून, चीननं ६३ हजार पीपीई किट्स भारतात पाठवल्या होतं. या किटची पाहणी केल्यानंतर त्या ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता न करताच पाठवण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं होतं.