नवे कृषी कायदे मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा करण्यात आली. परंतु त्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, आज शेतकरी या कृषी कायद्याविरोधात उपोषणावर बसले आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्याच ठिकाणी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, शेतकरी नेते जगजीत सिंग यांनी हरयाणाचे शेतकरी २५ ते २७ डिसेंबरदरम्यान टोलही देणार नसल्याची माहिती यापूर्वी दिली होती. तसंच शेतकऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचाही विरोध करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- किसान एकता मंचचं पेज फेसबुककडून ‘ब्लॉक’… संतापानंतर पुन्हा केलं ‘अनब्लॉक’

२७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रसारित केला जाणआर आहे. या कार्यक्रमादरम्यान शेतकरी थाळी वाजवून निषेध करणार आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ डिसेंबर रोजीच्या मन की बात या कार्यक्रमादरम्यान जो पर्यंत ते बोलत असतील तोपर्यंत सर्वांनीच आपल्या घरातून थाळ्या वाजवाव्या,” असं भारतीय शेतकरी संघटनेचे नेते जगजीत सिंह डलेवाल यांनी सांगितलं. तसंच त्यांच्या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनीही ते बोलत असेपर्यंत थाळ्या वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

२३ डिसेंबर रोजी शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. परंतु यावेळी शेतकरी दिवसापूर्वीच शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, शेतकरी दिवसाच्या दिनी लोकांनी आपल्या घरी दुपारचं जेवण तयार करू नये, असं आवाहन राकेश टिकैत यांनी देशवासीयांना केलं आहे. एककीडे नव्या कृषी कायद्यांना विरोध होत असला तरी दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडून त्याला समर्थनही मिळत आहे. रविवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील कृषी भवनात कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. तसंच आपण समर्थन करत असल्याचं पत्रही सादर केलं. तर दुसरीकजे सरकारकडून पुन्हा एकदा ४० संघटनांच्या नावानं पत्र पाठवण्यात आलं आहे. कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी क्रांतिकारी किसान मोर्चासमवेत ४० शेतकरी संघटनांना पत्र लिहून पुन्हा एकदा चर्चेचं आमंत्रण दिलं आहे.