दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये नागालँडमधील दोन जणांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर या प्रकरणी तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एअरहोस्टसची तब्येत आइसक्रीम खाल्ल्यानंतर बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर २४ तासाच्या आत तिच्या बहिणीचा मुलगा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या दोघांचा संशयस्पद मृत्यू असल्याचं सांगत वादंग सुरु झाला आहे.

२९ वर्षीय एअरहोस्टेस रोझी संगमा मुळची नागालँडमधील दीमापूर येथे राहणारी आहे. मावशी रोझीसोबत सॅम्युअल संगमा दिल्लीतील बृजवासन परिसरात भाड्याच्या खोलीत राहात होते. २३ जूनच्या रात्री रोजीच्या हात आणि पायांना दुखापत होत होती. तसेच रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर सॅम्युअलने मावशीसा तात्काळ दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिची परिस्थिती नाजूक झाल्यानंतर तिला गुरुग्राम सेक्टर १० मधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे रोझीला आयसीयूत दाखल करण्यात आलं. तेव्हा तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र त्यानंतर तिथे डॉक्टरांच्या उपस्थितीत तिला आइसक्रीम देण्यात आलं. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप मृत्यूपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओत सॅम्युअल याने केला. तसेच व्हिडिओ तयार करताना डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला. तसेच त्याला रुग्णालयाबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर २४ तासाच्या आत सॅम्युअल संगमा हा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दिल्ली पोलिसांनी सॅम्युअलचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असं सांगितलं आहे.

“रोझी संगमाला २४ जूनला सकाळी ६ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यासोबत दोघे जण होते. तिची प्रकृती पाहता आम्ही तिला आयसीयूत दाखल केलं. काही वेळानंतर तिची प्रकृती सुधारली. तेव्हा आयसीयूत भरती असलेल्या दुसऱ्या रुग्णाला आइसक्रीम खाण्यास दिली. तेव्हा रोझीने सुद्धा आइसक्रिमची मागणी केली. तेव्हा तिलाही आइसक्रिम देण्यात आलं. मात्र यावेळी सॅम्युअलसोबत कोणतीही मारहाण झाली नाही. व्हिडिओ तयार करत असताना थोडी धक्काबुक्की झाली. मात्र मारहाण झाली नाही.”, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. दुसरीकडे सॅम्युअलसोबत पुढे काय झालं?, याबाबत काहीच माहिती नसल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.

जेव्हा सुप्रीम कोर्टालाच धक्का बसतो; कारण रद्द कायद्यांतर्गत पोलीस करतायत गुन्हा दाखल

आता दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नॉर्थ-ईस्टमधील नागरिक सोशल मीडियावरुन या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करत आहेत. तसेच मेघालयमधील नेत्यांनी या घटनेच्या तपासासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या मृत्यूप्रकणाची सखोल चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. तर विरोधी पक्षनेते मुकुल संगमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चिठ्ठी लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे.