गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्न विचारत केंद्र सरकारला धारेवर धरलं. त्यामुळे केंद्रानं तातडीनं सर्वपक्षीय बैठक घेत, सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. या बैठकीत पंतप्रधानांनी असाही दावा केला की, “चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही.” पंतप्रधानांच्या या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी यांची प्रश्न विचारून कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्यक्ष सीमारेषेवरील ताण कमी करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत व चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू होती. एकीकडे चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. २० जवानांच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर विरोधकांनीही सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारनं तातडीनं विरोधकांशी चर्चा केली. त्याचबरोबर चीनने भारतीय भूभागात प्रवेश केला नसल्याचंही सांगितलं.

आणखी वाचा- चीनची घुसखोरी नाहीच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांनी निवेदन केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले आहेत. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.

आणखी वाचा- मोदीजी, चीनला उत्तर द्यावंच लागेल : जितेंद्र आव्हाड

गलवान खोऱ्यात उडालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी सातत्यानं ट्विट करून केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहेत. यापूर्वीही सीमेवर काय घडलं आहे. देशाला सर्व जाणून घ्यायचं आहे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपल्या भूभागात येण्याची हिंमत चीननं कशी केली आदी प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.