देशात करोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये करोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजाराहून अधिक करोनाबाधित आढळून आले आहेत.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात करोना रुग्ण आढळून आले आहेत. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६०० करोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून, पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

आणखी वाचा- झोप उडवणारी वाढ! देशात २४ तासांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू; १,८४,३७२ करोना बाधित

ना मास्क, ना थर्मल स्क्रिनिंग

इंडियन एक्स्प्रेसनं कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात करोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आलं नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केलं जात नसल्याचं दिसलं. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं.

याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार -अस्लम शेख

सरकार राजकारण करण्यासाठी कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रम घेतंय. याचा विस्फोट होणार आहे. हे करोना रुग्ण किती मोठ्या संख्येनं निघणार याची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतलेली आहे. महाराष्ट्र सरकारलाही याचा विचार करावा लागेल. जेव्हा हे परप्रांतीय मुंबईत येतील, त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्याचाही विचार नव्या गाईडलाईन्स तयार करताना केला जाईल. कारण देशात भावूक होऊन काहीतरी करायचं असं सुरू आहे. इतर राज्यात नेते आणि मंत्री वैज्ञानिकांचं ऐकायचं नाही, डॉक्टरांचं ऐकायचं नाही आणि स्वतः मनाने जे काही करत आहे, त्याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार आहे,” असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कुंभमेळ्याविषयी बोलताना दिलेला आहे.