भाजपाने लोकसभा निवडणुकींसाठी ‘फिर से एक बार मोदी सरकार’चा नारा देत निवडणुक प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी व भाजपाला लक्ष्य करत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच ‘महागठबंधन’च्या नावाखाली तिसऱ्या आघाडीने यंदा निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांकडून मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचा दावा केला जात आहे. २०१४ प्रमाणे यंदा ‘मोदी लाट’ नसल्याने त्याचा भाजपाला काही प्रमाणात फटका बसेल असं राजकीय विश्लेषक सांगताना दिसत आहेत. काही सर्वेक्षणांनुसार तर भाजपाला २०० पेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. असं असलं तरी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये वाचकांनी पंतप्रधान म्हणून मोदींनाच पसंती दिली आहे.

‘लोकसत्ता डॉट कॉम’ने २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये ७ हजार ७७७ वाचकांनी आपले मत नोंदवले. या सर्वेक्षणामध्ये मोदी सरकारच्या कामांपासून ते राहुल गांधीसंदर्भातील अनेक प्रश्न वाचकांना विचारण्यात आले होते. याच प्रश्नांपैकी एका प्रश्नाला उत्तर देताना मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास ७१ टक्क्यांहून अधिक सहभागींनी व्यक्त केला आहे. ‘२०१९ मधील निवडणुकीत मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का?’ या प्रश्नावर ७ हजार ७७७ जणांपैकी ५ हजार ५३४ जणांनी मोदी नक्कीच पुन्हा पंतप्रधान होतील असं मत नोंदवलं आहे. तर अवघ्या ७३१ जणांनी म्हणजेच ९.४ टक्के वाचकांनी मोदी पंतप्रधान होण्याची ‘शक्यता खूपच कमी’ असल्याचे मत या सर्वेक्षणामध्ये नोंदवले आहे. १०.४ टक्के (८१२) वाचकांनी ‘कदाचित होतील’ हा पर्याय निवडला असून ७०० जणांनी म्हणजेच ९ टक्के वाचकांनी २०१९ च्या निवडणुकानंतर मोदी पंतप्रधान ‘नक्की होणार नाहीत’ असं मत नोंदवलं आहे.

नक्की वाचा >> मराठी वाचकांचा कौल मोदींच्या पारड्यात; गडकरीबद्दल संभ्रम तर पवारांना नाकारले

या सर्वेक्षणामधून वाचकांनी आपण मोदी सरकारच्या कामावरही समाधानी असल्याचे मत नोंदवले आहे. ५,२०१ जणांनी आपण मोदी सरकारच्या कामाबद्दल ‘पूर्णपणे समाधानी’ असल्याचे मत नोंदवले आहे. मोदी सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्या वाचकांची टक्केवारी  ६६.९  इतकी आहे. तर दुसरीकडे १९.२ टक्के म्हणजेच १ हजार ४९३ वाचकांनी मोदी सरकारच्या कामासंदर्भात आपण ‘असमाधानी’ असल्याचे सांगितले आहे. सध्याच्या सरकारच्या कामाबद्दल ‘अंशत: समाधान’ व्यक्त करणाऱ्या वाचकांची संख्या १ हजार ८३ म्हणजेच १३.९ टक्के इतकी आहे.

 

नक्की वाचा >> सर्वात प्रभावशाली मंत्री म्हणून वाचकांची पसंती कोणाला? गडकरी, जेटली, स्वराज की प्रभू?

दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला केला त्यात ४२ जवान शहीद झाले. या घटनेनंतर १३ दिवसांनी २६ फेब्रुवारी रोजी भारतानं बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला. पुलवामानंतर परंतु भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकच्या आधी घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये ‘जनमताची साथ मोदी सरकार के साथ’ आहे असं दिसत आहे.