उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात सध्या लव जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर प्रदेश सरकारनं लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरू केली असून, त्यावरून टीका होऊ लागली आहे. चर्चेत असलेल्या लव जिहाद प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

भाजपाकडून लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीवर जोर दिला जात आहे. भाजपाकडून कायद्याची मागणी होत असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी भाजपाला सुनावलं आहे. “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम १४ व २१ मोठं उल्लंघन होणार आहे. त्यांनी (भाजपा) घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपा शासित काही राज्यांमध्ये लव जिहादच्या घटना आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. मात्र, शिवसेनेसह काँग्रेसकडून या मागणीला विरोध होताना दिसत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लव जिहादच्या घटना वाढल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यात लव जिहादचा मुद्दा चर्चेत आला होता.