भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. बॅन कऱण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये Baidu, Baidu Express Edition, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading Tencent Weiyun यांचाही समावेश आहे. या सर्व अ‍ॅप्सचा चीनशी संबंध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचंही म्हटलं आहे.

आम्हाला वेगवेगळे रिपोर्ट तसंच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ज्यामध्ये अ‍ॅड्रॉइड तसंच आयओएसवर उपलब्ध असणारे काही मोबाइल अॅप गैरवापर करत असून बेकायदेशीरपणे युजर्सचा डेटा चोरत असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा टेडा भारताबाहेर असणाऱ्या सर्व्हरवर पाठवला जात होता असंही तक्रारीत सांगण्यात आलं होतं. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती असंही मंत्रालयाने सांगितलं आहे.