जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० फायदेशीर ठरले आहे की नाही यावर जनतेचे मत घ्यावे, अशी सूचना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली होती. याबाबत संघ परिवाराच्या भूमिकेपेक्षा त्यांनी वेगळी भूमिका मांडली. यावर चर्चेला तोंड फुटल्यावर मोदींनी कलम ३७० बरोबरच काश्मिरी पंडितांच्या वेदनांबाबत चर्चा व्हावी असा आग्रह धरला आहे.
केवळ ३७० वे कलमच नाही तर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वच प्रश्नांबाबत व्यापक चर्चा व्हावी असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. हा मुद्दा आपण उपस्थित केल्यावर प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगत त्याचे श्रेय घेतले. रविवारी जम्मू येथील सभेत मोदींनी महिलांबाबत होत असलेल्या भेदभावाचा मुद्दा ओमर अब्दुल्लांचे उदाहरण देत सांगितल्यावर. अब्दुलांच्या पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मोदींना अपुरी माहिती असल्याचा आरोप केला जात आहे.
आपण जेव्हा जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांच्या वेदनांची चर्चा करतो तेव्हा, या समस्यांमधून लोकांना जोडण्याची भूमिका असल्याचे मोदींनी सांगितले. काश्मिरी पंडितांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मोदींनी सांगितले.  अरुण जेटली यांनी जम्मू आणि काश्मीरमधील भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला असे मोदींनी सांगितले.जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता, एकात्मता आणि विविधतेसाठी प्रयत्न करायला हवेत असे मोदींनी सुचवले आहे.

भाजपची सारवासारव
भाजपने मात्र आपली भूमिका मवाळ केल्याचा इन्कार केला आहे. जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष दर्जा असलेली तरतूद रद्द व्हायला हवी ही पक्षाची भूमिका असल्याचे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांनी जी भूमिका मांडली तीच मोदींनी पुढे नेली असे भाजपने स्पष्ट केले आहे. कलम ३७०चा काय लाभ झाला याची विचारणा मोदींनी केली, अशी सारवासारव भाजपने केली आहे.

नितीश कुमार यांची भाजपवर टीका
सीमेवरील राज्य असणाऱ्या जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या निर्णयाचा देशाच्या जनतेने स्वीकार केला आहे. आपण त्याचा स्वीकार करायला हवा, असे स्पष्ट करीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. कलम ३७० बाबत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ही भूमिका मांडत आहेत, त्यामुळे देशात दुही निर्माण होण्याची भीती असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० चा मी समर्थक आहे. याप्रकरणी ना चर्चा करण्याची गरज, ना बदल करण्याची गरज असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.  मोदी यांचे नाव न घेता नितीश कुमार म्हणाले की, एनडीएत जाताना या मुद्दय़ांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली होती. मात्र आता भाजप नव्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहे. या नव्या शक्ती भावनिक मुद्दय़ांना उचलून धरीत असल्यामुळे देशातील वातावरण बदलत आहे. त्यामुळेच आम्ही गेली १७ वर्षे भाजपशी असलेले संबंध संपुष्टात आणल्याचे नितीश कुमार म्हणाले.

देशात मोदींचे वारे वाहत नाहीत- अखिलेश
पीटीआय, फतेहपूर: भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांना अधिकाधिक नागरिकांची गर्दी होत असल्याने मोदीच पुढील पंतप्रधान होणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात असला, तरी देशात कुठेही मोदी यांचे वारे वाहत नाहीत, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लगावला आहे. केंद्रात पुढील वर्षी तिसऱ्या आघाडीचे सरकार येणार असून, समाजवादी पक्ष त्यात निर्णायक भूमिका निभावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.राज्यात विविध विकासकामे करण्यासाठी समाजवादी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

कलम ३७० रद्दच करा -तोगडिया
अलाहाबाद:कलम ३७०च्या मुद्दय़ावर नरेंद्र मोदींच्या भूमिकेशी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी असहमती दर्शवली आहे. ३७० वे कलम रद्दच केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. देशाला अशा दोन घटना नकोत, त्यामुळे हे रद्दच करावे असे तोगडिया यांनी म्हटले आहे. देशात मुस्लिमांसाठी वेगळा वैयक्तिक कायदा आहे तेही आम्हाला मान्य नाही असे तोगडिया म्हणाले. समान नागरी कायद्याची संघ परिवाराची जुनीच मागणी आहे. मात्र मित्रपक्षांच्या दबावामुळे भाजपला ही बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे.

मोदींना राज्यघटनेचे ज्ञान नाही -पीडीपी
श्रीनगर:राज्यघटनेचे कलम ३७० बाबत चर्चा करण्याच्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणाऱ्या मोदींना राज्यघटनेचे ज्ञान नसून त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दुहीची भावना निर्माण होईल,अशी टीका पीडीपीने केली आहे. पीडीपीचे नेते आणि माजी मुखमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद म्हणाले की, कलम ३७० मुळे जम्मू काश्मीरला घटनेने विशेष दर्जा मिळाला आहे. त्यामुळे कलम ३७० हे कायमस्वरूपी असून ते रद्द करता येणार नाही. त्याचप्रमाणे संसदही घटनेच्या माध्यमातून त्याबाबत सुधारणा वा कलम रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून राज्यघटनेचे ज्ञान नाही, हेच दाखवून दिल्याची टीका सईद यांनी केली.