करोनाविरुद्धच्या लढ्यात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही असं पंतप्रधान मोदींनी गुरुवारी घेतलेल्या नव्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर येत असल्याचा दाखला देत मोदींनी हा इशारा दिला. मास्क न घालता फिरणे याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात भीती असलायला हवी, असं म्हणताच मोदींनी अप्रत्यक्षपणे मास्क न घालता लोकांनी घराबाहेर पडू नये असं म्हटलं आहे.

देशातील अनेक भागांमधील लोक करोना प्रोटोकॉल्स आणि नियमांचे पालन करत नसल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केल्याचं सुत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. इतकचं नाही तर मोदींनी ही अशी मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरणाऱ्या गर्दीची दृष्य चांगली नसल्याचंही म्हटलं आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर नवीन सहकाऱ्यांसोबतच्या पहिल्याच बैठकीत मोदींनी करोनासंदर्भातील परिस्थितीबद्दलची ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

नक्की वाचा >> पहिल्याच बैठकीत मोदींनी नव्या मंत्र्यांना सांगितली ‘काम की बात’; दिली कामाची त्रिसुत्री

“मागील काही दिवसांपासून आपण असे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहत आहोत जिथे लोक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता फिरताना दिसत आहेत. हे चांगलं दृष्य नाही. या अशा वागण्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे,” असं मोदींनी नेत्यांशी बोलताना म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी देशाने करोनाविरुद्ध दिलेला लढा हा पूर्ण ताकदीने दिल्याचं सांगतानाच याचं श्रेय पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना दिलं. सध्या देशात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु असून चाचण्यांची संख्याही समाधानकारक असल्याचंही मोदींनी अधोरेखित केलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा आपल्याला परवडणार नाही. एक साधी चूक झाली तरी त्याचा मोठा परिणाम करोनाविरुद्धच्या आपल्या लढ्यावर होऊ शकतो, असं मोदी म्हणाले.

नक्की पाहा >> महात्मा गांधी Nation of Father, Happy Indipedent Day अन् बरंच काही…; नव्या आरोग्यमंत्र्यांची Tweets व्हायरल

मागील काही महिन्यांच्या तुलनेत आता करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लोकांना भटकण्याची इच्छा होत असणार. पण करोना अद्याप संपलेला नाही आणि तो पूर्णपणे नष्ट होण्यासाठी बराच काळ आहे. काही देशांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढलीय आणि हा विषाणूही सतत आपले स्वरुप बदलत असल्याने सावध राहण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं.

“मंत्री म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याऐवजी आपण त्यांना करोनासंदर्भातील सर्व खबरदीचे उपाय आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. यामुळे आपल्याला भविष्यात या साथीवर मात करता येईल,” अलं मोदी म्हणाले.

नक्की वाचा >> Modi New Cabinet : अमित शाहांकडे दिलेल्या ‘त्या’ नव्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

तसेच महाराष्ट्र, केरळसोबतच इतर काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दलही त्यांनी बैठकीत चिंता व्यक्त केल्याचं सुत्रांनी सांगितलं.