राजस्थानच्या धौलपूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेवर तिच्याच पतीने काही युवकांकडून सलग दोन दिवस बलात्कार करवून घेतला आहे. यावेळी तोही घटनास्थळी उपस्थित होता. एवढंच नाही, या महिलेने त्यांना विरोध केला असता तिच्या खासगी अवयवांना मिरचीपूड आणि बाम लावून तिला बेशुद्धही करण्यात आलं.

पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेतली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. आजतकने याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. हुंड्याच्या हव्यासापायी या महिलेच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. २३ वर्षीय महिलेने याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा- उत्तर प्रदेशात महिला शिपायावर सासऱ्याने केला बलात्कार; पतीने दिला ट्रिपल तलाक

तिने पोलिसांना सांगितलं की, १४ जानेवारी २०२१ रोजी तिचं लग्न झालं. त्यानंतर लगेचच सासरच्यांनी हुंड्यासाठी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. २६ जूनच्या रात्री १२च्या आसपास एक युवक घरी आला. पतीच्या समोरच त्या युवकाने तोंडात कापडाचा बोळा कोंबून या महिलेवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशीही पती इतर काही तरुणांना घरी घेऊन आला होता. या सर्वांनी या महिलेवर सामुहिक बलात्कार केला.

या महिलेल्या सांगण्यानुसार, तिने या प्रकाराला विरोध केला असता तिच्या खासगी अवयवांना मिरची पूड आणि बाम लावून तिला बेशुद्ध करण्यात आलं. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिच्या नवऱ्याने या सगळ्याबद्दल या युवकांकडून पैसेही घेतले होते.