उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज (मंगळवार) समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. बसपाचे हे सर्व आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनऊ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे आता या भेटीवरून विविध राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. असा देखील अंदाज वर्तवला जात आहे की, हे सर्व आमदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजावादी पार्टीत प्रवेश करतील.

अखिलेश यादव यांची आज भेट घेणाऱ्या बसपाच्या ९ बंडखोर आमदारांमध्ये असलम राइनी (भिनगा-श्रावस्ती), असलम अली चौधरी (ढोलाना-हापुड़), मुज़्तबा सिद्दीकी (प्रतापपुर-इलाहाबाद), हाकिम लाल बिंद (हांडिया-प्रयागराज), हरगोविंद भार्गव (सिधौली-सीतापुर), सुषमा पटेल (मुंगरा बादशाहपुर), वंदना सिंह (सगड़ी-आज़मगढ़), रामवीर उपाध्याय (सादाबाद) व अनिल सिंह (उन्नाव) यांचा समावेश आहे.

पंजाबमध्ये अकाली दलसोबत आघाडी केल्यानंतर बसपा प्रमुख मायावतींनी केलं विशेष ट्विट, म्हणाल्या…

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत बसपाचे १९ आमदार विजयी झाले होते. मात्र नंतर आंबेडकरनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बसपाने आपली ही जागा गमावली होती. यानंतर रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांना बसपा प्रमुख मायावती यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत, पक्षातून काढून टाकले होते. मागील वर्षी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या सात आमदारांनी बसपा उमेदवारास समर्थन देण्यास नकार दिला होता व दावा केला होता की त्यांची कागदपत्र खोटी आहेत. एवढच नाही तर हे आमदार नंतर समाजवादी पार्टीच्या आमदाराचे समर्थक बनले होते. परिणामी त्यांची देखील मायावतींनी पक्षातून हकालपट्टी केली होती.

काँग्रेसला टक्कर देण्यासाठी मोठी खेळी! २७ वर्षांनंतर अकाली दल, बसपाची आघाडी

यानंतर मागील आठवड्यातच मायावतींनी पक्षातील वरिष्ठ आमदारांपैकी एक रामअचल राजभर आणि लालजी वर्मा यांना पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपात पक्षातून निलंबित केले होते. लालजी वर्मा १९९१ पासून बहुजन समाज पार्टीचं काम करत होते आणि रामअचल राजभर मायावतींच्या चारही कार्यकाळात मंत्री होते.