ग्रीनपीस संस्थेचा निष्कर्ष

नवी दिल्ली : दिल्लीत नायट्रोजन डायॉक्साईड प्रदूषणाचे प्रमाण एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या काळात १२५ टक्के वाढले आहे, असे ग्रीनपीस इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. नायट्रोजन डायॉक्साईडची संहती जास्त लोकसंख्येच्या आठ शहरात वाढली आहे. नायट्रोजन डायॉक्साईड प्रदूषण वाढलेल्या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनौ यांचा समावेश आहे.

नायट्रोजन डायॉक्साईड हा हवेचे प्रदूषण करणारा घटक असून तो इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतो. मोटर वाहनांच्या इंधन ज्वलनामुळे त्याचे प्रमाण वाढते. काही औद्योगिक प्रक्रियातूनही हा वायू बाहेर पडतो. नायट्रोजन डायॉक्साइडमुळे लोकांवर आरोग्यविषयक अनेक दुष्परिणाम होतात त्यात श्वसनाचे रोग प्रामुख्याने असतात. मेंदूचे व रक्ताभिसरणाचे विकारही जडतात. उपग्रहातून करण्यात आलेल्या निरीक्षणाननुसार नायट्रोजन डायॉक्साइडची पातळी एप्रिल २०२० च्या तुलनेत १२५ टक्के वाढलेली दिसले. विश्लेषणानुसार २०२० सारखे हवामान असते तर या वायूची पातळी १४६ टक्के वाढलेली दिसली असती, असे अहवालात म्हटले आहे.

‘बिहाइंड द स्मोकस्क्रीन- सॅटेलाइट डेटा रिव्हील एअर पोल्यूशन इनक्रीज इन इंडियाज एट मोस्ट पॉप्युलस स्टेट कॅपिटल्स’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिल्लीपेक्षा इतर शहरांमध्ये नायट्रोजन डायॉक्साइडचे प्रमाण तुलनेने कमी प्रमाणात वाढले असले तरी परिस्थिती चिंताजनक आहे. नायट्रोजन डायॉक्साइडचे प्रदूषण मुंबईत ५२ टक्के, बेंगळूरुत ९० टक्के, हैदराबादेत ६९ टक्के, चेन्नईत ९४ टक्के, कोलकात्यात ११ टक्के, जयपूरमध्ये ४७ टक्के, लखनौत ३२ टक्के या प्रमाणे एप्रिल २०२१ मध्ये वाढले आहे.