उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. मूळची पाकिस्तानी असणारी एक महिला इटा येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगमी ग्रामप्रधान (सरपंच) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव बानो बेगम असं असून त्या मूळच्या कराचीच्या आहेत. बानो या मागील ४० वर्षांपासून भारतात राहत आहेत. बानो यांचा विवाह येथील एका स्थानिक व्यक्तीशी झाला असला आहे. बानो यांच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे.

 “बानो बेगम यांना ग्राम प्रधान पदावरुन हटवण्यात आलं असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी बानो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असे आदेशही देण्यात आले आहेत.” अशी माहिती इटाचे जिल्हा पंचायतराज अधिकारी अलोक प्रियदर्शनी यांनी दिल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इटाचे जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांनी बानो यांना आधारकार्ड आणि इतर सरकारी कागदपत्र कशी काय मिळाली यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेशही दिलेत. याच कागदपत्रांच्या आधारे बानो यांना ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडण्यात आलं आणि त्यांनातर त्या गावातील पंचायतीच्या प्रमुख झाल्या.

बानो बेगम या ६५ वर्षांच्या असून त्या ३५ ते ४० वर्षांपूर्वी इटामधील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी येथील अख्तर अली या स्थानिकाशी लग्न केलं. त्यानंतर त्या इटामध्येच राहतात. त्यांच्याकडे व्हिजा असून त्यांनी अनेकदा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केलाय.

गावातीलच एका व्यक्तीने बानो यांच्याविरोधात तक्रार दाखल करत त्या पाकिस्तानी असल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. तपासामध्ये हा दावा खरा असल्याची माहिती समोर आली आणि हे घडलं कसं हे शोधून काढण्यासाठी आता प्रशासनाची एकच धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. “२०१५ च्या पंचायत निवडणुकांमध्ये बानो यांची गौडौ गावातील पंचायत सदस्य म्हणून निवड झाली. ग्राम प्रधान असणाऱ्या सेहनात बेगम यांचा ९ जानेवारी २०२० रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गावतील नागरिकांच्या समितीने बानो बेगम यांच्याकडे हंगामी स्वरुपात ग्राम पंचायतीचं मुख्य पद दिलं,” असं जिल्हा पंचायतराज अधिकारी अलोक प्रियदर्शनी यांनी सांगितलं आहे.

या प्रकरणामध्ये बानो यांना कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी मदत करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.