भारतीय उद्योग संघटनेच्या म्हणजे CII च्या वार्षिक बैठकीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योद विश्वाला मार्गदर्शन केलं. यावेळी देशातली परिस्थिती आता उद्योगांसाठी कशी सुधारली आहे आणि उद्योगांनी या परिस्थितीचा कसा फायदा घ्यायला हवा, हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारलेली प्रशासकीय व्यवस्था आणि कायद्यांचं झालेलं सुसूत्रीकरण याचं देखील कौतुक केलं. “एक काळ असा होता, जेव्हा भारतात कामगारांना, उद्योगांना कायद्यांच्या जंजाळात अडकवून ठेवलं जायचं, आता फक्त ४ लेबर कोर्टमध्ये डझनावरी कायदे एकत्र करण्यात आले आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले. तसेच, यावेळी उद्योगांसाठी परकीय गुंतवणूक आणि लोकांची मानसिकता या गोष्टीही अनुकूल झाल्याचं मोदींनी यावेळी नमूद केलं.

…याच जोरावर देशात रेकॉर्डब्रेक परकीय गुंतवणूक!

“जिथे वर्षानुवर्ष कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये गुंतवून ठेवणं ही प्रशासनाची ओळख होती, तो भारत इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी झेप घेत आहेत. जिथे वर्षानुवर्ष कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जंजाळात गुंतवून ठेवलं गेलं, तिथे आज डझनावरी कायदे ४ लेबर कोर्टमध्ये सामावले गेले आहेत. जिथे शेतीला फक्त गुजराण करण्याचं माध्यम मानलं जात होतं, तिथे शेतीला परदेशी गुंतवणुकीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच जोरावर रेकॉर्ड ब्रेक परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“ही भारती उद्योग विश्वासाठी नवी सुरुवात आहे!”

“एक काळ होता, जेव्हा आपल्याला वाटत होतं की जे काही परदेशी आहे, तेच चांगलं आहे. या मानसिकतेमुळे उद्योगांचं नुकसान झालं. आपण तयार केलेल्या ब्रँड्सला देखील परदेशी नावांनीच विकलं जात होतं. आज प्रत्येक भारतीय भारतात बनलेली उत्पादनांना पसंती देत आहे. आता उद्योग विश्वाला यानुसार आपली रणनीती बनवायची आहे. इतक्या मोठ्या संकटात देखील आपल्या स्टार्टअप्सनी हार मानलेली नाही. स्टार्टअपचं रेकॉर्ड लिस्टिंग भारतीय उद्योग विश्वासाठी नवी सुरुवात आहे”, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.