गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीवरुन केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले तरी हरकत नाही. पण आपल्या वक्तव्यांमुळे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तीची उंची कमी करु नये अशा शब्दांत फटकारले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राजकोट जिल्ह्यात महात्मा गांधी संग्रहालयासह विविध योजनांचे लोकार्पण केले. संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील एका सभेत राहुल गांधी यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याविषयी भाष्य केले होते. सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मोदीजी भलेही सरदार पटेल यांचा मोठा पुतळा बनवत असले तरी आपल्या बूट आणि शर्टप्रमाणे तेही ‘मेड इन चायना’ असल्याची टीका त्यांनी केली होती. मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन केले होते. पण ते आता गुजरातच्या लोकांनाच काम देत असल्याचे म्हटले होते.

मोदी म्हणाले, आधीचा भारत आणि आताचा भारत यात मोठा फरक आहे. पूर्वी सामान्य व्यक्ती कच्चा रस्ता झाला तरी त्याला विकास मानून त्यावर समाधानी होत. आता गावातील माणसांच्या विकासाची व्याख्या बदलली आहे. गावातील लोक आता सरकारला रेल्वे, महामार्ग, माहिती मार्ग, गॅस ग्रिड, पॉवर ग्रीड आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कची मागणी करत आहेत.

महात्मा गांधींचे स्मरण करताना मोदी म्हणाले की, २ ऑक्टोबर १८६९ ला महात्मा गांधींचा जन्म हा फक्त एका व्यक्तीचा जन्म नव्हता तर ती एका युगाची सुरुवात होती. गांधींजीच्या सिद्धांतावरच विद्यमान सरकारने लोकांचे जीवन बदलण्याचे काम केले आहे. आता प्रत्येक गरीब व्यक्तीला घर देऊन एक मोठा बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.