देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कान असं करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिलेली असतानाच दुसरीकडे काँग्रेसकडून यावर आक्षेप घेतला जात आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून खोचक टीका केली आहे. तसेच, यालाच इंग्रजीमध्ये Meglomania असं म्हणतात, असं देखील त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मोदींच्या निर्णयावर आश्चर्य!

दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात ट्वीटमध्ये मोदींच्या या घोषणेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आधी आहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा त्यांनी मेजर ध्यानचंद जीच्या नावे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव ठेवलं”, असं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

मला वाटलं होतं की…

दरम्यान, या ट्वीटमध्ये दिग्विजय सिंह यांनी मोदींना खोचक टोला देखील लगावला आहे. “मला तर वाटलं होतं की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!” असं देखील दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. आपण सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात निर्माण होणे, याला मेगलोमॅनिया म्हणतात.

 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची विनंती देशभरातून येत होती. नागरिकांच्या या विनंतीनंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे.

 

“देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे” असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.