केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याची घोषणा केली आहे.  याच दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व रस्ते देखील अडवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच,  दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.

शेतकरी संघटनांकडून चक्का जाम आंदोलनाची घोषणा, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीवरून पोलिसांकडून शेतकरी नेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तसेच, अन्य कारवाईच्या विरोधात करण्यात आल्याचे दिसत आहे.

सध्या सिंघु, गाझीपुरसह दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारोंच्या संख्येने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर, सरकारने चर्चेद्वारे या समस्येतून मार्ग काढावा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, किसान मोर्चाच्या ४० संघटनांची जी ४० सदस्यीय समिती आहे, तिच्याशी सरकारने चर्चा करावी. असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटल आहे.