पश्चिम बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे. या तिन्ही आयपीएस अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमधून दिल्लीत प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आलं आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील बेजबाबदारपणामुळे ही कारवाई केली गेली आहे.

तर, गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर तृणमूल काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गृहमंत्रालयावर पश्चिम बंगालच्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवणं, गृहमंत्रालयाकडून दबाव टाकण्याचा प्रकार आहे. असं करून आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

दुसरीकडे भाजपा नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजवर्गीय यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्यांवर वीटा फेकल्या जात आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावरही हल्ल्याचा कट रचला गेला. मात्र भाजपाचे आपले धोरण आहे. आम्ही आमची सहिष्णुता सोडत नाही. आम्ही दगडाचे उत्तर फुलांनी देऊ, आमचे कमळ राज्याला नवी ओळख देईल.

नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी सात जणांना अटक

जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये दगडफेक झाली होती. ज्यामध्ये नड्डा हे सुरक्षित राहिले. मात्र भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अन्यजण जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआरची नोंद केली आहे. तर, सात जणांना अटक करण्यात आलेली आहे.