जेवणात कोशिंबीर देण्यास उशीर केल्याने पतीने पत्नीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जलालपूर गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आरोपी मुरली सिंह घरी जेवत होता. त्याची पत्नी सुदेश वेगळ्या कामात गुंतली होती. त्यामुळे मुरली जेवत असताना त्याच्या ताटात पत्नीने कोशिंबीर उशिरा वाढलं. ही बाब आरोपी मुरली सिंहला खटकली आणि त्याच्या रागाचा पारा चढला. यानंतर त्याने क्षणाचाही विचार न करता पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. तसेच हातातील कुदळीने पत्नीवर प्रहार केला. यात पत्नी सुदेशचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला २० वर्षीय मुलगा अजय गंभीर जखमी झाला आहे. भांडण तसेच ओरडण्याचाा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पत्नी सुदेश आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. त्यांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र पत्नी सुदेशचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी मुरली सिंह घटनास्थळाहून फरार झाला आहे.

मुलीला लसीकरणासाठी अमेरिकेत पाठवा; दाम्पत्याची थेट कोर्टात धाव!

या प्रकरणी बाबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुरली विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम ३०२ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पत्नी सुदेश हिचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. तर मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी मुरलीला पकडण्यासाठी तपास सुरु केला आहे.