मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचं कारण ठरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा ५० अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झालाय. न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली आहे.

शुक्रवारी(दि.१) संध्याकाळी सुभाष यादव (४२) नावाचा व्यक्ती अंडी खाण्यासाठी मित्रासोबत बीबीगंज बाजारात गेले होते. अंडी खाताना, कोण किती अंडी खाऊ शकतं याबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि गंमती गंमतीत दोघांमध्ये अंडी खाण्यावरुन पैज लागली. ५० अंडी आणि एक बाटली दारु पिण्याची ही पैज जिंकण्यास दोन हजार रुपये देण्याचं ठरलं.

सुभाषने पैज मान्य केली आणि अंडी खायला सुरूवात केली. त्यांनी ४१ अंडी खाल्ली, पण ४२ वं अंडं खाताच ते बेशुद्ध झाले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याचं पाहून तेथून सुभाष यांना लखनऊच्या रुग्णालयात हलवलं. तेथे रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष यांनी याच वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्यामुळे मुलासाठी त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यांची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.